Thursday, December 8, 2011

जगावेगळा जनसागर : चैत्यभूमीचा


Add caption
दादर म्हटलं की, नजरेसमोर येतो तो सिद्धिविनायक, पोर्तुगीज चर्च आणि स्वामी समर्थांचा मठ. त्याचबरोबर मोठमोठ्या नेत्यांच्या भाषणाने गाजलेले शिवाजी पार्क आणि मराठी संस्कृतीचे जणू पंढरी असलेले शिवाजी मंदीर नाट्यगृह. पण याचबरोबर दादरची अजून एक ओळख मी काल दिनांक ५ डिसेंबरला अनुभवली. ही ओळख होती काळाच्या पटलावर नुकतीच स्वत:ची ओळख निर्माण करु पाहणाऱ्यांची.
कुणी विदर्भातून, तर कुणी मराठवाड्यातून, काहीजण तर चक्क यु.पी, बिहार, अगदी सिक्किम मधून आलेले. सर्वांचे एकच उद्दिष्ट, डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करणे. पण निव्वळ अभिवादन करायचं म्हटलं तर ते आपल्या घरात, आपल्या गावात बाबासाहेबांच्या तसबिरीला हार अर्पण करुन पण करु शकतात. मग इतक्या दूरवर येण्याचा अट्टाहास का? असं वयाच्या सत्तरी पार केलेल्या आणि नंदुरबार मधून आलेल्या खरात आजोबांना मी प्रश्न विचारला. ते म्हणाले. बाबासाहेब आमच्यासाठी फक्त एक नाव नाही, तर ती जगण्याची प्रेरणा आहे, चेतना आहे.
असाच काहीसा सूर होता तो वर्ध्याच्या शेवंता काळेंचा, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या त्या महामानवास कृतज्ञता म्हणून अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे येतो. आपलं संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी खर्ची घालणाऱ्या त्या माणसासाठी आपला एक दिवस दिला नाही तर तो कृतघ्नपणा ठरणार नाही काय? त्यांच्या या प्रश्नाने मी मात्र निरुत्तर झाले. एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणारा जीवक शेगावकर मात्र बाबासाहेबांना मानवंदना देतो ती वेगळ्या पद्धतीने, तो म्हणतो, आम्ही येथे येतो ते बाबासाहेबांचे विचार सोबत नेण्यासाठी, पुस्तकांच्या रुपाने. येथे मिळणाऱ्या पुस्तकांमधून बाबासाहेब आम्हांला पुन्हा एकदा भेटतात.
दिव्य मराठीमध्ये आलेला माझा अनुभव
ना कोणी देव, ना कोणते मंदीर तरी समुद्राला लाजवेल असा उसळणारा हा जनसागर येथे येतो. ते आपल्या बाबांना अभिवादन करण्यासाठी. हा जनसागर पाहून मनात सहज एक प्रश्न येतो, एखादी व्यक्ती निर्वतल्यानंतर पंचावन्न वर्षे उलटून देखील हा जनसागर वाढतच आहे, यासारखे जगात असं दुसरं कोणतं उदाहरण असेल? आणि या प्रश्नासोबतच माझ्या मनात एका वेगळ्या दादरची नव्याने ओळख झाली.  

Friday, September 16, 2011

पाऊस निनाद हा....क्षणभराचा


अशी अचानक धडकी भरते, विजाचा कडकडाट होतो तेव्हा, त्याच्या आठवणी बरसू लागतात हृद्य़ाच्या तापलेल्या जमिनीवर आणि दरवळतो मृण्मयी गंध त्याच्या स्मरणांचा....  

         'तो' ही असाच अल्लड पाऊस वेडा. पावसाचा थेंब नी थेंब टिपताना थेट क्षितिजापल्याड जावून यायचा. आणि तेथून आवाज द्यायचा, “अरे काही थेब सांडलेत वाटले रे’’ मी ही म्हणायची, “तू आहेस तसा वेंधळा. का उगाच या शिरजोर ढगांच्या नादी लागतोस" तो खळखळून रानभर हसायचा. पावसात त्याचं अमृतहास्य विरघळताना एक नवीन काव्य जन्म घ्यायचे.

        आषाढ श्रावणाच्या सीमेवर काल असाच पाऊस बरसला. त्याने आवळलेल्या मेघमल्हारात पावसाच्या सरी ताल धरीत होत्या, बेभान त्याचं पावसात भिजणं, धावणं सरींनाही मागे टाकत होतं. कुठेतरी मधेच अचानक तो थांबत गोल गिरकी घ्यायचा आणि पृथ्वीच्या परीवलनाची गती त्याच्या गतीत एकरूप व्हायची. पावसाच्या कविता गात गात तो स्वतःच एक कविता व्हायचा. बालकविंच्या कवितेतील तोरण त्याच्या पापण्यांवर झुलायचे. मात्र माझ्या अंतरात ग्रेस यांची विरह वेदना दरवळायची,
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने
          पाऊस थांबेपर्यंत त्याच्या विश्वात कुणालाच कधी प्रवेश नसायचा. जमिनीवर विसावलेला पाऊस रापराप चिरत त्याची पावलं माझ्याजवळ थबकायचा. डोळे भरुन तो सभोवताल बघायचा. हळूच माझ्या मांडीवर ओलेचिंब डोके ठेवीत तो स्वतःशीच गुणगुणायचा,
कड्याकपारीतून पाऊस आला, वेड लावले मला

 धुंद केले रानावना, धुंद केले अवनीला
 मी धुंद नदीच्या काठी वाट पाहतो तुझी
ये माझ्या मिठीत आता, डोलणा-या रानफुला
  त्याचं गुणगुणनं थांबल्यावर मी थोडीशी हसायचे. तो खोटेच चिडून म्हणायचा, ‘‘जाऊदे, तुला काहीच नाही कळायचं यातलं. आजचा पाऊस रोजच्या पेक्षा अगदी निराळा होता.’’ त्याच्या डोळ्यात बरसणारा पाऊस अजुनही दिसत होता. त्याचे मनदेखील पावसासारखे नदी झ-यातून वाहत होते कधी रिमझिम तर कधी धो धो बोलताना संपूर्ण पावसाळा त्याच्या वाणीतून पाझरायचा. सूर्य मावळतीला आल्यावर तो थोडासा भानावर यायचा, अन म्हणायचा,“ चल निघुया, मला उद्या सकाळचा पाऊस लवकर टिपायचा आहे. पाऊस आणि आभाळ विसावले असले तरी, त्याचा पाऊस मात्र अविरत कोसळत होता. रानातल्या पाऊलवाटेने आंम्ही घराकडे निघायचो. त्याच्या चालण्याचा वेग धो-धो पावसासारखा, मी मात्र त्याच्या रिमझिम पाऊलखुणांवर कोसळलेला पाऊस टिपायची. दिवेलागणीला उंबरठ्यावर पोहोचताच तो बाहेरुनच म्हणाय़चा, “ अगं! पाऊस आहेच मुळी खट्याळ. किती ही टाळलं तरी कोसळलाच माझ्यावर. याला किनई चांगलीच अद्दल घडविली पाहीजे.’’ मग मात्र मला त्या निष्पाप पावसाची दया यायची. आता मात्र मी एकटीच निघालेली असायची. पाऊस देखील अंधार पडल्यामुळे चिऊताईच्या खोप्यात विसावलेला. सर्वत्र शुकशुकाट असला तरी पाऊस कोसळण्याचा ध्वनी त्याच्या घरातून यायचा. मी मागे वळून बघितले तर त्याच्या खिडकीतून दोन काळेभोर ढग माझ्या वाटेवर डोळे लावलेले दिसायचे. हळूहळू खोलीतील दिवे मंदावयाचे. मी मात्र चालतच असायचे नकळत पुन्हा आलेल्या पावसात. आता मात्र सोबतीला चंद्र असायचा. तोही पावसाचा आनंद घेत चिंब भिजलेला. मी चालत असताना हळूच एखाद्या डबक्यात उतरुन तो माझी वाट अडवायचा “निघालीस परत?’’ या प्रश्नातून चंद्राचं एकटेपण मला जाणवायचं. त्याचा विरह त्याच्या दिवसभरच्या शिणापेक्षा जास्त जाणवायचा. मी त्याच्या वेदनेचं कारण विचारावं अशी पुसटची अपेक्षा त्याच्या डोळ्यात तरळायची. “आजचा पाऊस छान होता, नाही?’’ माझ्या या वाक्याला ‘हो’ असा ढिम्म प्रतिसाद. “ चांदण्यांची आठवण येतेय?’’ या प्रश्नासोबत तो स्वतःशीच हरवायचा. आणि मी त्याच्यात. पाऊस ओसरला तरी मातीची ओल कायम होती अगदी त्याच्या आठवणींसारखी. छताकडे लागलेल्या डोळ्यांमधून त्याचं हसणं भटकायचं. तर तिच्या आठवणींच आणि झोपेचं भांडण सुरू व्हायचं. मी म्हणायचे,“ जाऊ दे, हे तर रोजचच आहे.’’ तरी देखील कान मात्र पहाटेच्या चिवचिवाटावर असायचे. 
मंदिरात चाललेल्या काकड आरतीच्या नगा-यासारखे ढगांनी आज मला पुन्हा उठविले आभाळ थोडं मोकळं असलं तरी ढगांचे घोळके टोळी टोळीने आमची वाट बघत उभे होते. कळपातून भटकलेल्या मेंढीसारखा एखादा मोठा ढग छोट्या ढगाला बोलवत होता. मी हळूहळू त्या माळाकडे आपले पाऊल वळवले जिथे कालचा पाऊस कोसळला होता. आज माळरान, नदिचा काठ, थकलेला वटवृक्ष माझ्या सारखाच तिची वाट बघत होता.‘तो आला...’ या भासाने पानांमध्ये कुजबुज व्हायची. आळस झटकून आभाळामध्ये गर्दी झाली होती. धनुष्यावर ताणलेल्या तिरासारखे सर्वच त्याच्या प्रतिक्षेत. माझे डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले. आणि सर्वांचे माझ्याकडे. आज बराच उशीर झाला होता. त्याची वाट बघत पाऊस देखील एखाद्या ह्र्षीसारखा संयमी झाला होता. झाडांच्या गर्दीतून एखादं पाखरू उडालं की, सर्वांच्या नजरा झटदिशी तिकडे वळत. आज मध्यांन्हापर्यंत पाऊस आलाच नाही. आणि तो देखील. कालच्याच जागेवर जाऊन बघितले तर, त्याच्या पावलाचे ठसे जमिनीशी एकरूप झालेले. आज तो आलाच नाही. खरच आज तो आलाच नाही. म्हणूनच कदाचीत आज पाऊस देखील आला नसेल. बाहेर ढगांची आक्रंदने सुरु होती. आणि माझ्या आत त्याच्या आठवणींचा पाऊस. डोळ्यांतून अविरत झिरपू लागले त्याच्या आठवणींचे डोहाळे. तो यायला हवा होता. कदचित पावसाची एखादी नवीन कल्पना तो कल्पीत बसला असावा. पण त्यासाठी पाऊसभेट का टाळायची? वाटलं आज तो परत रमला असेल कालच्याच पावसासोबत. एव्हाना ढगांनीही आभाळावरची आपली मक्तेदारी सोडली होती. मी मात्र नदीच्या पात्रात एकेक खडा टाकीत त्याच्या सोबत घालविलेले क्षण मोजत बसले. दुपार टळली संधीकाळापर्यंत देखील तो आलाच नाही.
         आता मात्र पाऊस बरसायला लागला, मेघांतून नव्हे तर माझ्या डोळ्यांमधून त्याची प्रतिमा ओघळत यायची पापण्यांच्या कडांपाशी. थेंबासारखा उध्वस्त व्हायचे त्याच्या पावसात... 
तुझ्या सारखा अल्लड, अवचित दारी आला पाऊस

  वाट पाहती डोंगर, द-या, माघारी नको जाऊस
मातीच राहीलो असतो, जर का नसता तू सख्या
बरस पुन्हा एकदा मजवर, भिजव मला होवून पाऊस

टीप : हे सर्व लिखाण आणि विचार माझा मित्र निकेश झिलटे याने केलेले आहे. मी फक्त त्याला काहीशा रचना देण्याचे काम केले आहे. 

Thursday, September 15, 2011

भ्रष्टाचार...

बापूंची’ छबी
            मंगळवार, वेळ- सकाळी ११.१५, स्थळ : माहीम स्टेशन... एक पोलिसांची बोलेरो जीप येते. पाठोपाठ कानात टिपीकल मारवाडी बाळी घातलेला चहावाला धावत येतो. जीपमध्ये पोलीस ड्रायव्हर, एक अधिकारी आणि एक शिपाई असे तिघे असतात. चहावाला आपल्या जवळची डायरी खिडकीशेजारी बसलेल्या अधिकाऱ्याला देतो. पाठीमागच्या सीटवर बसलेला शिपाई त्या चहावाल्याला काहीतरी पुटपुटतो. तो पर्यंत अधिकारी त्या डायरीत काहीतरी लिहून चहावाल्याला डायरी परत करतो. त्यानंतर तो अधिकारी मोबाईलवर बोलत असणाऱ्या पानवाल्याला इशारा करतो. पानवाला मोबाईलवरच बोलत हातात डायरी घेऊन येतो. त्या डायरी मध्ये असते ‘बापूंची’ छबी असलेली शंभराची नोट. डायरी अशाकरिता की जी कोणी पोलिसांची गाडी येईल ती पैसे घेऊन गेल्याची नोंद त्यामध्ये होते, कारण अशा भरपूर गाड्या या परिसरात फूटपाथवर बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून पैसे उकळतात. बेकायदेशीर धंदे लपविण्यासाठी मार्ग वापरला जातो तो देखील...बेकायदेशीरच. शेवटी काय हो, बडी मछली, छोटी मछली को खाकर ही बडी होती है...है ना...! आता प्रश्न असा आहे की अण्णांच्या आंदोलनाचा तो प्रभाव संपला का? हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी लोकपाल काय करणार? ‘मी अण्णा’ चे ते भूत फक्त आझाद मैदान वा रामलीला मैदानापर्यंतच सिमीत होते का?

Tuesday, July 5, 2011

‘उत्तरायण’


आपल्या आयुष्यात नव्यानेच नाती जुळतात तर काही जुनीच नाती आपण नव्याने पुन्हा जगू लागतो. असंच काहीस जुनं नातं नव्याने जगणारे जोडपे मला भेटले. आजकाल मला शनिवारी ऑफिस सुटल्यावर एखाद्या शांत आणि रम्य ठिकाणी जाण्याची सवय लागली आहे...माझ्या ऑफिसपासून काही अंतरावर आहे दादर चौपाटी ...दररोज नाही पण आठवड्यातून एकदातरी आपण रिलॅक्स होण्यासाठी जावं असं प्रत्येकाला वाटते....आपल्या सोबतीला कोणी नाही म्हणून आपण असं एकटं फिरणं खरंतर टाळतो....पण एकट्यानं असा अनुभव प्रत्येकानं घ्यावा....दादर चौपाटीलगतच एक ज्ञानेश्वर पार्क आहे....अप्रतिम पार्क आहे हा, इकडे येणारा अगदी लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यत सगळेच काही ना काही विचारात, गप्पा करण्यात, मस्ती करण्यात गुतंलेला असतो. त्या दिवशीच अशाच वातावरणात मी एकटी होते,आजुबाजुच्या सगळ्या हालचाली मी पण न्याहाळत होते...समोरच एक मुलांचा ग्रुप होता...त्यांच्या बोलण्यावरुन कळाले नुकतेच दहावी पास होऊन कॉलेजला जाण्याची तयारीत आहेत...मस्त गप्पा टप्पा मस्ती करण्यात दंग असलेला हा घोळका मला माझ्या फ़्रेंन्ड्ची आठवण करुन गेला...या पार्क मध्ये येणारा प्रत्येक हा वेगवेगळ्या वयोगटातला आहे...फक्त प्रेमीयुगुलंच गार्डनचा पुरेपुर वापर करतात असे अजिबात जाणवत नाही....दोन मैत्रिणी..किंवा दोन मित्र अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर बोलतायेत...आजी आजोबा शांत बसले आहेत असं चित्र नेहमीचंच.... या पार्क मध्ये माझी नेहमीची जागा तिथे बसून अथांग समुद्र पाहता येतो... अशा वातावरणात स्वतःला रमवताना अचानक एक दृश्य पाहायला मला मिळाले ते म्हणजे...आजकालच्या तरुण पिढीलाही लाजवणारे असं...एका व्हिलचेयर वर बसलेली एक सुंदर अशी अगदी उतारवयात आलेली स्त्री आणि तिच्या सोबत तिचा सोबती....दोघांनी समुद्र कडे तोंड केले होते...या वयात पण ते नवीन स्वप्न रंगवण्यात दंग होते....माझं मन हे त्यांनाच पाहण्यात गुंतले होते....त्यांचे काही फोटो काढण्याचा पण मी प्रयत्न केला पण हवे तसे काही जमले नाही...त्यांच्याकडे लक्ष देण्याचा विचार पण केला पण फार कुतुहल वाटत होते मला त्यांचे...मग त्यांचाशी बोलण्यासाठी मी त्यांना नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली...तसे लांबून पाहताना वाटणारे ते रागीट आजोबा मनाने फारच हळवे निघाले ...आजीचे नाव सुमती तर आजोबाचे नाव विश्वास...मला त्याच्याशी बोलताना खूप मस्त अनुभव आला...माझ्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ होती की एका अनोख्या लोकांशी जाऊन बोलण्याची... ते दोघेही अगदी भारावून गेले होते...बोलता बोलता आजोबा मला सांगून गेले की सुमतीला कॅन्सर आहे... दोन मिनीटासाठी अगदी मी स्तब्धच झाले होते. पण आजीच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देणारे होते....त्या एकटक समुद्राकडे पाहत होत्या...नंतर आमच्यात गप्पा रंगत आल्यावर आजोबा म्हणाले आम्ही रोज इथे येतो... इथे वेळ घालवायला सुमतीला फार आवडते...आणि त्याचं कारणही तसंच आहे ...आमचं लव्ह मॅरेज आहे, मी इकडेच दादर चौपाटीवर प्रपोझ मारला होता... त्या दिवसापासून हिची ही सगळ्या आवडती जागा आहे... इकडेच बसून आमच्या आयुष्याची सुरवात आम्ही केली... स्वप्नवत जग जगायला शिकलो... आणि आज म्हातारपणी देखील आहे ते आयुष्य जगतोय जुन्या आठवणी सोबत....हे सगळे ऐकताना आजीचे डोळे पाणावले होते...पण त्या काही बोलू शकत नव्हत्या...आजीने आजोबाचा हात घट्ट हातात धरला आणि एक स्मितहास्य केले... आता मला कळत नव्हते, आजी काय म्हणतेय... पण आजोबा लगेच म्हणाले...अगं ती म्हणतेय खरंच जुने दिवस खूपच मस्त होते. आपण अजूनही तसेच आहोत... आणि तेच दिवस आपण पुन्हा या वयात जगतोय... खरंतर त्यांचे बोलणे ऐकून मला फारच ऑकवर्ड वाटत होते... ते दोघे आता रोमॅन्टिक मूड मध्ये आले होते... हळूहळू दोघेही जून्या आठवणीत गुंतले... ."चला आजोबा निघते, आजी येते मी...जमल्यास पुन्हा भेटु असं म्हणत त्यांच्या नकळत मी त्यांचा निरोप घेतला...
सूर्यनारायणाच्या साक्षीने त्या दोघांच्या नात्याचे जणू काही ‘उत्तरायण’ सुरु झाले...

Wednesday, June 8, 2011

गिरणी कामगाराची नवीन आवृत्ती...


गोदरेज... घराच्या छोट्या कुलुपापासून ते पैशाच्या तिजोरीपर्यंत. प्रत्येक गरजू वस्तूंचे उत्पादन करणारे गोदरेज गेल्या आठवड्यात मात्र एका वेगळ्याच वादात अडकले. गेल्या तीस वर्षापासून गोदरेज कंपनीला आपलं सर्वस्व मानणाऱ्या कामगारांवर गोदरेज कंपनीच्या व्यवस्थापनाने निलंबनाची कुऱ्हाड उगारली. आपल्या विविध मागण्यांसाठी आठ कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले. ११४ वर्षाच्या गोदरेजच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत होते.


माझे वडील देखील गोदरेजमध्येच काम करतात. वयाच्या १९ वर्षापासून माझ्या बाबांनी गोदरेज मध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि आजही वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांचा तो जोश तसाच आहे. बाबांसारखे कित्येक कामगार गोदरेज मध्ये ३० वर्षांहून अधिक काळ गोदरेज मध्ये कार्यरत आहेत. गोदरेज कंपनीशी या कामगारांचाच नव्हे तर त्या कामगारांच्या कुटुंबियांचा देखील एक स्नेहबंध जुळला आहे. मी शाळेत जात असतानाची गोष्ट. आम्हांला शाळेत टी. व्ही वर सकाळच्या बातम्या दाखवत. त्या बातम्यांच्या दरम्यान कधी कधी गोदरेजच्या उत्पादनाची जाहिरात येई आणि मग मी माझ्या मैत्रिणींना मोठ्या अभिमानाने सांगे की हे उत्पादन माझ्या बाबांनी बनविले आहे. त्या लहान वयात देखील माझ्या सारख्या लहान मुलीला गोदरेज विषयी किती अभिमान होता हे तुम्हांला कळले असेलच.

मुंबई तरुण भारत
गोदरेज कंपनीच्या जोरावरच कित्येक कामगारांचे संसार बहरले. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. गोदरेज कंपनीने उपलब्ध करुन दिलेल्या सभागृहात अनेक कामगारांच्या मुला- मुलींचे विवाह सोहळे निर्विघ्न पणे पार पडले. कंपनीच्या जोरावर भावी स्वप्ने रंगविणारा आजचा कामगार मात्र उद्याच्या भितीने पार उध्वस्त झाला आहे. कंपनी बंद पडेल अशा वावड्या उठतात. कंपनी बंद पडल्यावर आपल्या कुटुंबाचं कसं होणार? मुलांच्या शिक्षणाचं काय? मुलीचे लग्न कसं करणार? वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर इतरत्र काम तरी मिळेल का? या आणि अशा असंख्य प्रश्नाने त्याची रात्रीची झोप उडाली आहे. घरी आल्यानंतर देखील बायको हाच प्रश्न विचारते, तिला काय उत्तर देणार? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे सरकार, मिडीया आणि एनजीओवाले सहानुभूतीने तरी पाहतात. पण गोदरेज मध्ये काम करणाऱ्या या कामगारांकडे पाहण्यास कोणालाच वेळ नाही.

तीस वर्षांपूर्वी काहीशी अशीच अवस्था गिरणी कामगारांची देखील झाली होती. गिरण्या हळूहळू बंद पडल्या आणि गिरणीकामगार देशोधडीला लागले. आज गिरणी कामगाराचे अस्तित्व उरले आहे ते फक्त म्युझियम पुरते. गिरणी कामगाराची नवीन आवृत्ती ही गोदरेजच्या कामगाराची तर नसेल ना, या कल्पनेनेच पोटात गोळा उठतो.

Thursday, June 2, 2011

पहिला पाऊस आणि तो



















खरं तर आतापर्यत मी भरपूर लोकांच्या पहिल्या पावसाच्या आठवणी वाचल्या होत्या. सगळं काही फालतू वाटायचे वाचताना. असं थोडीच असतं , असं नेहमीच वाटायचं. पण यावर्षीचा पाऊस मला एक मस्त अनुभव देऊन गेलाय माझ्या आयुष्यभर आठवणीत राहण्यासारख्या...इनफॅक्ट न विसरता येण्यासारख्या हा माझा ‘पहिला पाऊस’ त्याच्या सोबतचा...बाहेर मस्त पाऊस पडत होता पहिला पाऊस म्हणून सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंदच . रस्त्यावर राहणाऱ्यांची घर आवरण्याची तारांबळ चालू होती. स्वयंपाक करता करता अवेळी आलेल्या या पाहुण्याने त्या गृहिणीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले, आधी चिमुकल्यासाठी जेवण बनवू की या पावसापासून घराला आवरु.
अचानक आलेल्या या पावसाचा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो म्हणजे लहान मुलांना. आम्ही जून महिना उजाडला की ‘सांग, सांग भोलानाथ... पाऊस पडेल काय...? अशी विचारणा थेट त्या पावसाकडेच करु पण जूनच्या दुसऱ्याच दिवशी पडलेल्या या पावसाने बाळगोपाळांना हे गाणे गाण्याची संधी मात्र दिली नाही. कदाचित तो देखील ‘लिटील चॅम्प’ पहात असावा.
पहिला पाऊस म्हटला की आठवण होते ती पावसाचे दवबिंदू पिऊन तृप्त होऊ पाहणाऱ्या आणि आनंदाने आपला सुगंध आसमंतात उधाळणाऱ्या मृदगंधाचा अर्थात मातीचा. ही सुगंधित माती जगातील कोणत्याही सुगंधित परफ्युमला मात देईल अशी. निसर्गाचं हे देणं आपण कपाळकरंटे मात्र दुर्लक्षित करतो. उगाचच अडकतो त्या कृत्रिम सुगंधी कुपींच्या जाळ्यात. अशा या ओल्या झालेल्या मातीचा सुगंध सगळीकडे दरवळलेला असतानाच, रोज घरी जाताना असणारे वातावरण आज मात्र अचानक बदलून गेले होते.
स्टेशनवरुन जाताना नुकतेच लग्न झालेल्या एका जोडप्याचे बोलणे मला ऐकू आले . ती( आनंदाने, आणि थोडी लाजून देखील) - अहो, खूप छान गारवा वाटतोय ना, आज रात्री मस्त थंड वाटेल ना... !!! हे सांगताना जणू तिच्या अंगावर प्रणयीभावनेने काटाच उभा राहिला. आणि तो म्हणतो... हो ना, आज आपल्याला एसी लावावा लागणार नाही. हे ऐकून मला तर फार हसू आले. बिच्चारी ‘ती’ प्रणयरुपी पावसात चिंब होऊ पाहणारी आणि ‘हा’ तिला वास्तवात आणू पाहणारा साधा सरळ नवरा. पावसात मुली लवकरच रोमॅन्टीक होतात पण मुले, आनंद घेतच नाहीत पावसाचा. क्वचितच कुठेतरी असा मुलगा मिळेल ज्याला तिच्याबरोबर पाऊस पण आवडतो. पण या जोडप्यामध्ये ती पावसाला पाहण्यात, त्याला न्याहाळण्यात रमली होती आणि तो बिचारा तिची बॅग अन तिला सांभाळण्यात मग्न... तिला पाहताना त्याच्या चेहऱ्यावर एकच लय होती की तुला पाऊस आवडतो आणि मला तु, तुला पावसात भिजायला आवडते आणि मला पावसात भिजताना तु...या सगळ्या भावनांना मनात ठेवून त्याने तिचा हात घट्ट पकडला होता, जणू मी तुझ्या सोबतच आहे असं सांगण्यासाठी.

पुढारी युथ कॉर्नर मध्ये
आलेला लेख
असंच काहीसं आज माझं झालं होतं...त्याला मी आज भेटणार होते. हे आमचे आधीच ठरले होते. पण मला उशीर झाला ऑफिसमधून निघायला. मग ठरवलं मी, नको जायला खूप उशीर झालाय, संध्याकाळचे सात वाजले होते...पण मन काही मानायला तयार नव्हते. त्याला इगनोर करण्याचा खूप प्रयत्न केला पण जमलेच नाही...शेवटी त्याला विचारले फोन करुन... मला नेहमीच मनाला जे वाटते ते करण्याची सवय आहे आणि आज पण मी तेच केले..त्याला भेटण्याची ओढ मला जाणवतच होती...कशाचाही विचार न करता, वेळेचे भान न ठेवता. मी भेटले त्याला फक्त मनाला समाधान मिळविण्यासाठी..का माहित नाही पावसाचा आनंद तर होताच पण तो, त्याच्यासोबत अनुभवायचा होता...तो भेटला खरा पण तो मंद छत्री घेऊन आला होता...म्हणे मला नाही आवडत पावसात भिजायला..तुला आवडतं ना तु भिज...रागाने मी त्याला म्हणाले जा मग घरी, मी एकटीच भिजेन...तो येडा परत जायला पण निघाला आणि मला म्हणे "as u wish" जातो मी... थोडे अंतर गेल्यासारखे केले मग "ए नौटंकी" चल ना असं मीच म्हणाले. खरं तर त्याला जास्त भाव खायची सवयच लागली आहे. सुरुवात तर अशीच झाली आमच्या भेटीची. मग तो छत्री घेऊन चालत होता आणि मी त्याच्या सहवासासोबत पावसाचा आनंद घेत होते. काही लोक तर आमच्याकडे पाहून हसत होते. पण जगातलं सगळ्यात मोठं सुख ज्याला म्हणता येईल ते मी अनुभवत होते , ...तेवढ्या वेळासाठी मी सगळं काही विसरले होते...त्याचं बोलणं ऐकण्यात रमलेली मी... तो वेड्यासारखंच काहीतरी बडबडतच असतो...त्याच्याकडून एका गाण्याची अपेक्षा होती पण बोलण्याच्या नादात ती अर्धवटच राहिली. घर, मित्र -मैत्रिण आणि वेळ याचं काही मला भानच नाही राहिले ...पण मनात भरपूर काही चलबिचल चालली होती जी मला यापूर्वी कधीच जाणवली नाही, काय होतयं? काय पाहिजे काहीच कळत नव्हते...माझ्या जवळचे सगळे शब्द त्याच्या सोबतीने नि:शब्द झाले होते. खरंच या वर्षीचा पावसाळा म्हणजे अमेंझिग आहे...माझ्या जगण्याला आणि एक नवीन अर्थ देणारा ...सगळ्यांना पण असाच आनंद देणारा हा पावसाळा असावा.

Thursday, May 26, 2011

हा सागरी किनारा...

ऑफिसच्या मिटिंगच्या निमित्ताने का होईना पहिल्यांदा रत्नागिरीत जाण्याचा योग आला. मित्रांकडून रत्नागिरीच्या सौर्दयांबद्दल ऐकले होते. आता पहिल्यांदाच रत्नागिरीच्या निसर्गाचा गारवा अनुभवला. भाट्ये बीचवर उभारलेल्या रिसॉर्टवर गेलो होतो. ‘रत्नसागर’... तिथे अगदी आपण स्वर्गात आलोय की काय असाच आभास झाला.
प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते समुद्र किनारी आपले घरकुल असावे, पण ते आपल्या खिशाला परवडणारे नाही अशी ही खंत देखील त्याच्या मनामध्ये असते. ही खंत उरी घेऊनच तो झोपी जातो. आयुष्यातले काही क्षण आपण स्वप्नामध्ये जगत असल्यासारखे जगतो. असे काही स्वप्नातले क्षण मला अनुभवायला मिळाले ते रत्नागिरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी भाट्ये बीचवर वसलेल्या रत्नसागर या रिसॉर्टवर. माझा तर अनुभव अप्रतिम होता. प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावा असा. रत्नागिरीचे खरे सौंर्द्य दडलेले आहे ते तिथल्या निखळ आणि स्वच्छ समुद्रामध्ये, अशा ठिकाणी आपण तास न तास रमतो, पण आपल्याला जर समुद्र किनारी काही दिवस राहण्यास मिळत असेल तर सामान्य माणूस ती संधी कधीच गमावणार नाही. आम्ही जिथे थांबलो होतो त्या रत्नसागर रिसॉर्टवर फक्त समुद्राचे सौंर्द्यच नाही, तर मस्त अशी पॉलीश्ड लाकडापासून बनवलेली ठुमदार घरे आपले मन आकर्षित करुन मनात केव्हा घर करुन जातात तेच कळत नाही. मुंबई सारख्या सिमेंटच्या जंगलापासून दूर कुठे तरी नक्कीच आपण एका इको फ्रेंन्डली वातावरणात राहण्याचा आनंद घेतोय असा विचार मनात डोकावूनच जातो. अगदी मानसिक समाधान. पूर्णपणे रिलॅक्स मिळेल असे वातावरण. एकंदर खूप खूप मजा आली.
मुंबईहून किमान सात तास प्रवास करुन आम्हाला कंटाळा आला होता. गेल्या गेल्या रुम वर जाऊन झोपण्याचा विचार केला होता. पण तिथे एन्ट्री केल्यावर फक्त शांतपणे सगळे काही बघतच राहिलो. समुद्र तर रात्रीच्या अंधारामुळे पाहता आला नाही पण समुद्राच्या खळाळणाऱ्या लाटांच्या आवाजाने आम्ही मनाने किनाऱ्यावर पोहोचलो. सगळं वातावरण नैसर्गिक आणि उत्साह देणारं तर होतंच पण मनाला आल्हादायक अनुभव देणारं असं होतं. रत्नसागर रिसॉर्टवर मला मालवणी जेवणाचा आस्वाद अगदी मनसोक्त घेता आला. कोंबडी वडे आणि सोबतीला कोकम सरबत अजून काय हवंय जिभेला..! लहान मुलांसाठी मस्त मजेशीर असे समुद्र किनारी गार्डन आहे, तिथल्या झोक्यांचा आनंद तर लाजवाब होता. मला देखील झोक्यावर बसण्याचा मोह आवरला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे समुद्र्किनाऱ्यावर डॉल्फीन माशांचे दर्शनही आम्हांला सकाळी घडलं.
हा सागरी किनारा...ओला सुगंध वारा... या गाण्याची प्रचिती घ्यायची असेल तर एकदा नक्कीच भाट्ये बीचला भेट द्या. शेवटी काय...‘कोकण आपलाच आसा’..!!!

Monday, May 23, 2011

तुझे नि माझं नातं "अनामिकच"

नातं... आपल्या संपूर्ण आयुष्यात कितीतरी नाती आपण बघतो , लहानपणापासून निर्माण होणारी रक्ताची नाती... शाळेत असताना आणि त्या वयात जुळणारी मैत्रीची नाती... नकळत्या वयात हळूवार फुलणारी प्रेमाची नाती... विश्वासाची, राग-लोभाची, हेव्याची, प्रेमाची... अशी कितीतरी नाती आपल्याही नकळत निर्माण झालेली पण तरीही काही नाती, काही बंध असे असतात की त्यांना कोणते नाव द्यावं हेच उमगत नाही, आणि मग प्रश्न पडतो, ' तुझं नि माझं नातं आहे तरी काय...??

तुझ्यात आणि माझ्यात असंच नातं आहे... काहीसं अनामिक!! सर्व नात्याहून वेगळं आहे ते, थोडंसं खास आहे... प्रेम, विश्वास, आदर या सगळ्यातून फुलून आलेलं आपलं हे नातं नक्कीच त्याचं वेगळेपण जाणवून देतंय... आपण एकत्र घालवलेले क्षण तसे अगदी मोजकेच आहेत, आयस्क्रीम आवडंत म्हणून प्रत्येक भेटीत तू ते घेतोस आणि म्हणतोस आता या नतंर नाही हा खाणार मी!!! पण पुढच्या वेळीही आयस्क्रीमची आठवण तुच करतोस, फार हसू येते तुझ्या या बालिशपणावर... सहज गप्पा मारत आपण फिरतो किंवा नुसते भटकत चालत घालवलेले क्षण असतील पण तरीही त्यातून मनात आनंद निर्माण करणारं, मनात तरतरी निर्माण करणारं काहीतरी असतं हे नक्की...

आपण आठडयातून एकदाच ,कधी कधी तर महिन्याने भेटतो , पण आठवडाभर बोललो नाही, तर मग मनात हुरहूर लागून राहते? कुठेतरी मनात तुझ्या आठवणीनी जागं का व्हावं... तुझ्याशी बोलताना, तुझ्या सोबत असताना मन अगदीच प्रसन्न का असावं... काय आहे रे आपल्यात नातं...

तुझ्या दृष्टीने आपल्या नात्याला काही नाव नाही , असं असलं तरी ही , मैत्रीपेक्षा ते जास्त आणि खास आहे माझ्यासाठी.... मैत्रीपेक्षाही सुंदर, मनापेक्षाही चंचल, नाजूक असलेलं नातं .....कुठले हे नातं? काय नाव त्याचं?
तुला भेटण्याची, तुझ्याशी खूप काही बोलण्याची, तुझ्यासोबतचा सहवास एनजॉय करण्याची ओढ मी कितीही नाही म्हणाले तरी जाणवतेच ...मला वाटतं तु फोन करशील आज,आत्ता आणि त्याचं क्षणी तुझा फोन येतो. माझ्या आवाजात जाणवणारा आनंद तुला सगळं काही नेहमीच सांगून जातो... माझ्या मनातलं तु जाणू शकला याचा आनंद मलाही होतो !!! असं समाधान फक्त तुझ्याशी संवाद साधतानाच का होतं? असा आनंद फक्त तुझ्यासोबत असताना का होतो? तुझ्याशी बोलताना नेहमी माझे बोल हे बोबडे होऊन जातात असं इतर कोणासोबत बोलताना कधीच होत नाही, तुझ्याशीच बोलताना का होतो? हा खरं तर माझ्या मनाल पडलेला सगळ्यात मोठ्ठा अनुत्तरीत प्रश्न ....... अरे, तुझं नि माझं नातं काय...सांग ना?

वेळेचं भान होऊ न देणारं तुझं बोलनं, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या मुली, तुझं घर-घरातली सगळी मंडळी मग ती तुमच्या अगदी आई-बाबा, बहिण, दादा-वहिनी पासून ते तुझ्या शर्ली पर्यत सगळेच किती तुझ्या जवळ आहेत हे सांगणारं तुझं बोलणं, ऑफिसमध्ये केलेली मित्रांशी मस्ती-भांडण. इतकच काय तु घरी आज जेवण काय बनवलेस हे ही सांगायला तु दमत नाहीस. सतत काही ना काही बोलतच असतोस. मध्येच जर तुला "मी" आठवले तर तुझं एकच वाक्य असतं ’तु अभी बच्ची है’ ‘तु कब बडी होगी’ राग तर फार येतो या शब्दांचा पण तुझ्या बोलण्याचा नाही येत. मग मीही तुला म्हणतेच ’कसा आहेस रे तु? वेडा!’ "भगवान ने तुम्हे कितने फुरसत मै और कैसे बनाया है" खरं तर मला म्हणायचं असतं की ‘हे भगवान फुरसत मै बनाया लेकीन गलत बनाया है इसे आप अच्छा दिल देना ही भुल गये जो किसी और के लिये धडके’ या माझ्या बोलण्यावरही तुला हसूच येतं. मी कार्टुन म्हटल्यावर "चूप रे" किंवा कधी कधी "Shut up" म्हणतोस ना खरंच एकदम सॉलिड वाटते एकायला, एकच तर शब्द आहे माझ्याकडे तुला पिडायला, पण खरंच तु कार्टुन आहे हा! स्वतः फार खडूस आहेस असं नेहमीच दाखवतोस. पण तसा तु नाही आहेस हे मलाही माहीत आहे आणि तुलाही...तुझ्याकडे कोणासाठीही वेळ नसतो फक्त कामात मग्न असतोस...असं असलं तरी हे फक्त बहाने आहेत तुझे लोकांना टाळण्याचे...आवड असली की सवड ही मिळतेच रे...!!! पण वेळ नसण्याचे बहाने मला कधी सांगत नाहीस हे माझे नशीब...

असो... वेळात वेळ काढून तुझ्या आठवणी जाग्या करायला लावणारं तुझं बोलणं. प्रत्येकवेळी घडोघडी तुला स्मरणार, तुला आठवणारं, तुला मिस करणारं, तुझ्या छोट्याश्या मेसेज ची आतुरतेनं वाट बघणारं, कुठलं हे नातं? काय नाव आहे या नात्याचं?

मनात आलं की सारं काही बोलून दाखवणारं माझं मन... मनात न ठेवता बिनधास्त खोलून सांगणारं, तरीही अबोल असणारं माझं मन... मनातल्या मनात तुझ्यासोबत आयुष्य जगणार माझं मन... मनातल्या मनात गोड स्वप्नं रंगवणारही माझं मन....प्रत्येक क्षणी तुझं हात हातात धरण्याची इच्छा ठेवणार माझं मन... तुला आनंदी बघतच आनंदी होणारं, तुला दुःखी बघताच दुःखी होणारं माझं मन... आहे का रे तुझं आणि माझं काही नातं?

मला माहित नाही तुला माझं मन कधी समजणार आहे की नाही पण मी तुझ्याकडून अशी अपेक्षाही करत नाही कारण, असंही म्हणतातच ना....नातं निरपेक्ष असेल तर ते जास्त टिकतं! मला फक्त हवं आहे असंच आपलं निरपेक्ष "अनामिक" नातं !!!

Tuesday, May 3, 2011

पुरुषांनी,पुरुषांसाठी, पुरुषांमार्फत चालवलेली समाजशासन व्यवस्था...

देशात झालेल्या १५ व्या जनगणनेचा `जनगणना-२०११’ अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. या अहवालाने स्त्रियांच्या सुरक्षीतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. आईचा गर्भ हा तीच्या अपत्यासाठी सुरक्षीत असतो. या लेखाच्या वाचनानंतर आपली ही समजूत खोटी ठरल्यास त्यात काही वावगं नाही. या अहवालात ० ते ६ वयोगटातील १५ कोटी, ८८ लाख बालके देशात असून या वयोगटातील मुला व मुलींचे असलेली असमान आकडेवारी ही काळाची डोकंदुखी ठरणारी असल्याचं दिसून येत आहे. देशातील मुलींची आकडेवारी जवळ-जवळ सर्वच मोठ्या राज्यात भयावह पध्दतीने घटलेली दिसून येते. यात महत्वाची नोंद घेण्याजोगी बाब आहे जी मला आपणांस प्रकर्षाने येथे सांगावी वाटते ती बाब म्हणजे २९ लाख,६७ हजार,३७६ इतक्या मुली गेल्या दशकात गर्भपात करुन ठार केल्या गेल्यात. महाराष्ट्र राज्यात हा आकडा ४ लाख, ५५ हजार, ३६ एवढा आहे. १००० पुरुषांमागे महाराष्ट्रात ९२२ एवढ्या स्त्रिया आहेत. सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात जवळ-जवळ ८००० सोनोग्राफी (गर्भजल परिक्षण यंत्र) मशिन्स कार्यरत आहेत . दररोज अंदाजे १३० मुली गर्भ स्वरुपातच लिंग निदान व निवड करुन ७५००हून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील गुन्हेगार हजारो कोटींची उलाढाल करुन मारत आहेत,अशी धक्कादायक माहिती लेक लाडकी अभियानाच्या प्रवक्त्या वकील वर्षा देशपांडे व कार्यकर्ते साबू जॉर्ज यांनी एका पत्रकार परिषदेत नुकतीच दिली होती. माननीय महाराष्ट्र राज्याने १९८८ मध्ये गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा राज्यात लागू केला आहे. मागील जनगणनेचा(२००१) विचार केला असता महाराष्ट्रातील परिस्थिती ही चिंताजनकच आहे. कायदे, कारवाया, जाहिराती, समाज प्रबोधन यांसारख्या कार्यक्रमांची सरबत्ती शासनाकडून होत असतांना लिंग-गुणोत्तरात ऎवढा भेद कसा..? असा प्रश्न आपल्यासमोर उभा होऊन ठाकलेला आहे. रत्नागिरी,सिंधदुर्ग व गोंदिया या जिल्हांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. हजारी पुरुषांमागे रत्नागिरी जिल्ह्यात ११२३ ऎवढ्या स्त्रियांचे प्रमाण २०११ च्या जनगणनेत नोंदल्या गेलेले असुन ते प्रथम स्थानवर आहे . तर १०३७ स्त्रिया १००० पुरुषांमागे सिंधदुर्ग जिल्ह्यात नोंदल्या गेलेल्या असुन दुस-या स्थानावर आहे . तर तिसरे स्थान गोंदिया जिल्हाने ९९६ नॊंदवुन पुन्हा जसेच्या तसे राखले आहे. आपल्या खान्देशाची आकडेवारी तर माझ्या लिखाणाची प्रेरणा ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थानमध्ये झालेल्या ५० टक्के महिला आरक्षणाच्या घोषणेची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यापासुनच होणार आहे. अशा जिल्ह्यातील महिलांचे घटते जन्मदर ही नक्कीच आपल्यासाठी डोकेदुखीचा प्रश्न ठरु शकतो. ४२ लक्ष,२४ हजार, ४४२ ऎवढी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या. त्यापैकी २१ लक्ष,९७ हजार,८३५ ऎवढी पुरुषांची तर २० लक्ष, २६ हजार,६०७ ऎवढी महिलांची संख्या मोजल्या गेलेली आहे. जळगाव जिल्हातील स्त्रियांचा जन्मदर दर हजारी पुरुषांमागे ९२२ ऎवढा नोंदविला गेला आहे. आकडेवारीचा विचार केला असता जिल्ह्याचा २८ वा क्रमांक लागलेला आहे. स्मिताताई वाघ,अस्मिता पाटील,मधुभाभी जैन, तनुजा तडवी,ललिता पाटील, सरोजनीताई गरुड यांसारख्य मातब्बर महिला प्रतिनिधी जिल्हाच्या राजकारणात सक्रीय असतांना जिल्ह्यातील स्त्रियांची होणारी गळती नक्कीच शरमेची बाब आहे. स्व.भागिरीथीबाई गरुड, माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श असलेल्या आपल्या खान्देशातील ही अवस्था सामाजिक विषतेला खत-पाणी घालणारी तसेच अनैसर्गिक आहे. दिपावलीच्या सणाला दिवा किंवा पणती मागणारी व प्रज्वलित करणारी प्रवृत्ती आपल्याला सहज आढळून येते मात्र वंशाला पणतीच हवी अशी मागणी करणारा समाज आणि मानसिकता आपल्याकडे अजूनही का तयार झालेली नाही हा चिंतनाचा विषय आहे . पुरुषांनी,पुरुषांसाठी, पुरुषांमार्फत चालवलेली समाजशासन व्यवस्था अजुन कुठल्याही संस्कृती इतिहासात निर्माण झालेली नाही. मग का हा अट्टहास..? आज संधी नागरी समाजाचा पाया हा सामाजिक समतेवर अवलंबून अस. सामाजिक समता ही अधिकारांची विभागणी, त्या शासन व्यवस्थेत असणा-या महिला व पुरुषांची संख्या यांवर अवलंबून असतो. आपल्याला विकासाचा मापदंड ठरणारा खान्देशचे (जिल्हा) पूर्ननिर्माण करायचे आहे . ज्यासाठी (गर्भातील) महिलांची होणारी हत्या थांबवाविच लागेल. दुषीत विचार सोडावाच लागेल. समाजातील प्रत्येक समस्या कायद्याने सोडवता येत नाही. किंवा कायदा हा प्रत्येक. समस्येचे समाधान किंवा साध्य होऊ शकत नाही .


अनुक्रमांक

जिल्ह्याचे नाव

स्त्रियांचे प्रमाण(१००० पुरुषांमागे)

रत्नागिरी

११२३

सिंधुदुर्ग

१०३७

गोंदिया

९९६

नंदुरबार

९७२

धुळे

९४१

जळगाव

९२२