![]() |
Add caption |
दादर म्हटलं की,
नजरेसमोर येतो तो सिद्धिविनायक, पोर्तुगीज चर्च आणि स्वामी समर्थांचा मठ.
त्याचबरोबर मोठमोठ्या नेत्यांच्या भाषणाने गाजलेले शिवाजी पार्क आणि मराठी
संस्कृतीचे जणू पंढरी असलेले शिवाजी मंदीर नाट्यगृह. पण याचबरोबर दादरची अजून एक
ओळख मी काल दिनांक ५ डिसेंबरला अनुभवली. ही ओळख होती काळाच्या पटलावर नुकतीच
स्वत:ची ओळख निर्माण करु पाहणाऱ्यांची.
कुणी विदर्भातून, तर
कुणी मराठवाड्यातून, काहीजण तर चक्क यु.पी, बिहार, अगदी सिक्किम मधून आलेले.
सर्वांचे एकच उद्दिष्ट, डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करणे. पण निव्वळ
अभिवादन करायचं म्हटलं तर ते आपल्या घरात, आपल्या गावात बाबासाहेबांच्या तसबिरीला
हार अर्पण करुन पण करु शकतात. मग इतक्या दूरवर येण्याचा अट्टाहास का? असं वयाच्या
सत्तरी पार केलेल्या आणि नंदुरबार मधून आलेल्या खरात आजोबांना मी प्रश्न विचारला.
ते म्हणाले. बाबासाहेब आमच्यासाठी फक्त एक नाव नाही, तर ती जगण्याची प्रेरणा आहे,
चेतना आहे.
असाच काहीसा सूर
होता तो वर्ध्याच्या शेवंता काळेंचा, माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या
त्या महामानवास कृतज्ञता म्हणून अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे येतो. आपलं संपूर्ण
आयुष्य आमच्यासाठी खर्ची घालणाऱ्या त्या माणसासाठी आपला एक दिवस दिला नाही तर तो
कृतघ्नपणा ठरणार नाही काय? त्यांच्या या प्रश्नाने मी मात्र निरुत्तर झाले.
एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकणारा जीवक शेगावकर मात्र बाबासाहेबांना मानवंदना
देतो ती वेगळ्या पद्धतीने, तो म्हणतो, आम्ही येथे येतो ते बाबासाहेबांचे विचार
सोबत नेण्यासाठी, पुस्तकांच्या रुपाने. येथे मिळणाऱ्या पुस्तकांमधून बाबासाहेब
आम्हांला पुन्हा एकदा भेटतात.
![]() |
दिव्य मराठीमध्ये आलेला माझा अनुभव |
ना कोणी देव, ना
कोणते मंदीर तरी समुद्राला लाजवेल असा उसळणारा हा जनसागर येथे येतो. ते आपल्या
बाबांना अभिवादन करण्यासाठी. हा जनसागर पाहून मनात सहज एक प्रश्न येतो, एखादी
व्यक्ती निर्वतल्यानंतर पंचावन्न वर्षे उलटून देखील हा जनसागर वाढतच आहे, यासारखे जगात
असं दुसरं कोणतं उदाहरण असेल? आणि या प्रश्नासोबतच माझ्या मनात एका वेगळ्या दादरची
नव्याने ओळख झाली.
No comments:
Post a Comment