अशी अचानक धडकी भरते, विजाचा कडकडाट होतो तेव्हा, त्याच्या आठवणी बरसू लागतात हृद्य़ाच्या तापलेल्या जमिनीवर आणि दरवळतो मृण्मयी गंध त्याच्या स्मरणांचा....
'तो' ही असाच अल्लड पाऊस वेडा. पावसाचा थेंब नी थेंब टिपताना थेट क्षितिजापल्याड जावून यायचा. आणि तेथून आवाज द्यायचा, “अरे काही थेब सांडलेत वाटले रे’’ मी ही म्हणायची, “तू आहेस तसा वेंधळा. का उगाच या शिरजोर ढगांच्या नादी लागतोस" तो खळखळून रानभर हसायचा. पावसात त्याचं अमृतहास्य विरघळताना एक नवीन काव्य जन्म घ्यायचे.
आषाढ श्रावणाच्या सीमेवर काल असाच पाऊस बरसला. त्याने आवळलेल्या मेघमल्हारात पावसाच्या सरी ताल धरीत होत्या, बेभान त्याचं पावसात भिजणं, धावणं सरींनाही मागे टाकत होतं. कुठेतरी मधेच अचानक तो थांबत गोल गिरकी घ्यायचा आणि पृथ्वीच्या परीवलनाची गती त्याच्या गतीत एकरूप व्हायची. पावसाच्या कविता गात गात तो स्वतःच एक कविता व्हायचा. बालकविंच्या कवितेतील तोरण त्याच्या पापण्यांवर झुलायचे. मात्र माझ्या अंतरात ग्रेस यांची विरह वेदना दरवळायची,
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने
पाऊस थांबेपर्यंत त्याच्या विश्वात कुणालाच कधी प्रवेश नसायचा. जमिनीवर विसावलेला पाऊस रापराप चिरत त्याची पावलं माझ्याजवळ थबकायचा. डोळे भरुन तो सभोवताल बघायचा. हळूच माझ्या मांडीवर ओलेचिंब डोके ठेवीत तो स्वतःशीच गुणगुणायचा,
कड्याकपारीतून पाऊस आला, वेड लावले मला
धुंद केले रानावना, धुंद केले अवनीला
मी धुंद नदीच्या काठी वाट पाहतो तुझी
ये माझ्या मिठीत आता, डोलणा-या रानफुला
त्याचं गुणगुणनं थांबल्यावर मी थोडीशी हसायचे. तो खोटेच चिडून म्हणायचा, ‘‘जाऊदे, तुला काहीच नाही कळायचं यातलं. आजचा पाऊस रोजच्या पेक्षा अगदी निराळा होता.’’ त्याच्या डोळ्यात बरसणारा पाऊस अजुनही दिसत होता. त्याचे मनदेखील पावसासारखे नदी झ-यातून वाहत होते कधी रिमझिम तर कधी धो धो बोलताना संपूर्ण पावसाळा त्याच्या वाणीतून पाझरायचा. सूर्य मावळतीला आल्यावर तो थोडासा भानावर यायचा, अन म्हणायचा,“ चल निघुया, मला उद्या सकाळचा पाऊस लवकर टिपायचा आहे. पाऊस आणि आभाळ विसावले असले तरी, त्याचा पाऊस मात्र अविरत कोसळत होता. रानातल्या पाऊलवाटेने आंम्ही घराकडे निघायचो. त्याच्या चालण्याचा वेग धो-धो पावसासारखा, मी मात्र त्याच्या रिमझिम पाऊलखुणांवर कोसळलेला पाऊस टिपायची. दिवेलागणीला उंबरठ्यावर पोहोचताच तो बाहेरुनच म्हणाय़चा, “ अगं! पाऊस आहेच मुळी खट्याळ. किती ही टाळलं तरी कोसळलाच माझ्यावर. याला किनई चांगलीच अद्दल घडविली पाहीजे.’’ मग मात्र मला त्या निष्पाप पावसाची दया यायची. आता मात्र मी एकटीच निघालेली असायची. पाऊस देखील अंधार पडल्यामुळे चिऊताईच्या खोप्यात विसावलेला. सर्वत्र शुकशुकाट असला तरी पाऊस कोसळण्याचा ध्वनी त्याच्या घरातून यायचा. मी मागे वळून बघितले तर त्याच्या खिडकीतून दोन काळेभोर ढग माझ्या वाटेवर डोळे लावलेले दिसायचे. हळूहळू खोलीतील दिवे मंदावयाचे. मी मात्र चालतच असायचे नकळत पुन्हा आलेल्या पावसात. आता मात्र सोबतीला चंद्र असायचा. तोही पावसाचा आनंद घेत चिंब भिजलेला. मी चालत असताना हळूच एखाद्या डबक्यात उतरुन तो माझी वाट अडवायचा “निघालीस परत?’’ या प्रश्नातून चंद्राचं एकटेपण मला जाणवायचं. त्याचा विरह त्याच्या दिवसभरच्या शिणापेक्षा जास्त जाणवायचा. मी त्याच्या वेदनेचं कारण विचारावं अशी पुसटची अपेक्षा त्याच्या डोळ्यात तरळायची. “आजचा पाऊस छान होता, नाही?’’ माझ्या या वाक्याला ‘हो’ असा ढिम्म प्रतिसाद. “ चांदण्यांची आठवण येतेय?’’ या प्रश्नासोबत तो स्वतःशीच हरवायचा. आणि मी त्याच्यात. पाऊस ओसरला तरी मातीची ओल कायम होती अगदी त्याच्या आठवणींसारखी. छताकडे लागलेल्या डोळ्यांमधून त्याचं हसणं भटकायचं. तर तिच्या आठवणींच आणि झोपेचं भांडण सुरू व्हायचं. मी म्हणायचे,“ जाऊ दे, हे तर रोजचच आहे.’’ तरी देखील कान मात्र पहाटेच्या चिवचिवाटावर असायचे.
मंदिरात चाललेल्या काकड आरतीच्या नगा-यासारखे ढगांनी आज मला पुन्हा उठविले आभाळ थोडं मोकळं असलं तरी ढगांचे घोळके टोळी टोळीने आमची वाट बघत उभे होते. कळपातून भटकलेल्या मेंढीसारखा एखादा मोठा ढग छोट्या ढगाला बोलवत होता. मी हळूहळू त्या माळाकडे आपले पाऊल वळवले जिथे कालचा पाऊस कोसळला होता. आज माळरान, नदिचा काठ, थकलेला वटवृक्ष माझ्या सारखाच तिची वाट बघत होता.‘तो आला...’ या भासाने पानांमध्ये कुजबुज व्हायची. आळस झटकून आभाळामध्ये गर्दी झाली होती. धनुष्यावर ताणलेल्या तिरासारखे सर्वच त्याच्या प्रतिक्षेत. माझे डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले. आणि सर्वांचे माझ्याकडे. आज बराच उशीर झाला होता. त्याची वाट बघत पाऊस देखील एखाद्या ह्र्षीसारखा संयमी झाला होता. झाडांच्या गर्दीतून एखादं पाखरू उडालं की, सर्वांच्या नजरा झटदिशी तिकडे वळत. आज मध्यांन्हापर्यंत पाऊस आलाच नाही. आणि तो देखील. कालच्याच जागेवर जाऊन बघितले तर, त्याच्या पावलाचे ठसे जमिनीशी एकरूप झालेले. आज तो आलाच नाही. खरच आज तो आलाच नाही. म्हणूनच कदाचीत आज पाऊस देखील आला नसेल. बाहेर ढगांची आक्रंदने सुरु होती. आणि माझ्या आत त्याच्या आठवणींचा पाऊस. डोळ्यांतून अविरत झिरपू लागले त्याच्या आठवणींचे डोहाळे. तो यायला हवा होता. कदचित पावसाची एखादी नवीन कल्पना तो कल्पीत बसला असावा. पण त्यासाठी पाऊसभेट का टाळायची? वाटलं आज तो परत रमला असेल कालच्याच पावसासोबत. एव्हाना ढगांनीही आभाळावरची आपली मक्तेदारी सोडली होती. मी मात्र नदीच्या पात्रात एकेक खडा टाकीत त्याच्या सोबत घालविलेले क्षण मोजत बसले. दुपार टळली संधीकाळापर्यंत देखील तो आलाच नाही.
आता मात्र पाऊस बरसायला लागला, मेघांतून नव्हे तर माझ्या डोळ्यांमधून त्याची प्रतिमा ओघळत यायची पापण्यांच्या कडांपाशी. थेंबासारखा उध्वस्त व्हायचे त्याच्या पावसात...
मंदिरात चाललेल्या काकड आरतीच्या नगा-यासारखे ढगांनी आज मला पुन्हा उठविले आभाळ थोडं मोकळं असलं तरी ढगांचे घोळके टोळी टोळीने आमची वाट बघत उभे होते. कळपातून भटकलेल्या मेंढीसारखा एखादा मोठा ढग छोट्या ढगाला बोलवत होता. मी हळूहळू त्या माळाकडे आपले पाऊल वळवले जिथे कालचा पाऊस कोसळला होता. आज माळरान, नदिचा काठ, थकलेला वटवृक्ष माझ्या सारखाच तिची वाट बघत होता.‘तो आला...’ या भासाने पानांमध्ये कुजबुज व्हायची. आळस झटकून आभाळामध्ये गर्दी झाली होती. धनुष्यावर ताणलेल्या तिरासारखे सर्वच त्याच्या प्रतिक्षेत. माझे डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले. आणि सर्वांचे माझ्याकडे. आज बराच उशीर झाला होता. त्याची वाट बघत पाऊस देखील एखाद्या ह्र्षीसारखा संयमी झाला होता. झाडांच्या गर्दीतून एखादं पाखरू उडालं की, सर्वांच्या नजरा झटदिशी तिकडे वळत. आज मध्यांन्हापर्यंत पाऊस आलाच नाही. आणि तो देखील. कालच्याच जागेवर जाऊन बघितले तर, त्याच्या पावलाचे ठसे जमिनीशी एकरूप झालेले. आज तो आलाच नाही. खरच आज तो आलाच नाही. म्हणूनच कदाचीत आज पाऊस देखील आला नसेल. बाहेर ढगांची आक्रंदने सुरु होती. आणि माझ्या आत त्याच्या आठवणींचा पाऊस. डोळ्यांतून अविरत झिरपू लागले त्याच्या आठवणींचे डोहाळे. तो यायला हवा होता. कदचित पावसाची एखादी नवीन कल्पना तो कल्पीत बसला असावा. पण त्यासाठी पाऊसभेट का टाळायची? वाटलं आज तो परत रमला असेल कालच्याच पावसासोबत. एव्हाना ढगांनीही आभाळावरची आपली मक्तेदारी सोडली होती. मी मात्र नदीच्या पात्रात एकेक खडा टाकीत त्याच्या सोबत घालविलेले क्षण मोजत बसले. दुपार टळली संधीकाळापर्यंत देखील तो आलाच नाही.
आता मात्र पाऊस बरसायला लागला, मेघांतून नव्हे तर माझ्या डोळ्यांमधून त्याची प्रतिमा ओघळत यायची पापण्यांच्या कडांपाशी. थेंबासारखा उध्वस्त व्हायचे त्याच्या पावसात...
तुझ्या सारखा अल्लड, अवचित दारी आला पाऊस
वाट पाहती डोंगर, द-या, माघारी नको जाऊस
मातीच राहीलो असतो, जर का नसता तू सख्या
बरस पुन्हा एकदा मजवर, भिजव मला होवून पाऊस
टीप : हे सर्व लिखाण आणि विचार माझा मित्र निकेश झिलटे याने केलेले आहे. मी फक्त त्याला काहीशा रचना देण्याचे काम केले आहे.
No comments:
Post a Comment