मानवी व्यवहारांशी ती अपरिहार्यपणे संबंधित असलेल्या भाषासंबंधी उपलब्ध असणारी करिअरची क्षेत्रे असंख्य आहेत. या सर्व भाषिक कौशल्यांना आपल्या शैक्षणिक विश्वात पुरेसे स्थान नसले तरी ही कौशल्ये प्रयत्नसाध्य निश्चितच आहेत. भाषेकडे आता जागतिकीकरणाच्या व्यापक परिप्रेक्ष्यात पहायला हवे. मराठीला तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाषेला ज्ञानसमृद्ध व दैनंदिन वापराच्या दृष्टीने पुरेसे अर्थवाही व वापरात आणायला हवे, तरच भाषा टिकेल व भाषेसोबत आपण टिकू.
‘बोलणाऱ्याच्या चिंध्याही विकल्या जातात, न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही’ असे म्हणतात. भाषेचा करिअरशी असणारा संबंध असा सनातन आहे. भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनव्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत भाषा आवश्यक असते. आणि म्हणून भाषेशी संबंधित असणारी करिअरची क्षेत्रेदेखील अक्षरश शेकडो आहेत. आपल्या पारंपरिक भाषा अभ्यासक्रमांतून मात्र त्याचे कुठलेही प्रत्यंतर येत नाही. किंबहुना अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतींनी आपली भाषेबद्दलची समज पार खुरटवून टाकली आहे. कला शाखेतून काही करिअर्स नाहीत, भाषा विषय घेऊन काय करणार, असे वाटावे, इतके आजघडीचे अभ्यासक्रम अपुरे आणि एकांगी आहेत. कुठली का असेना, भाषा उत्तमरीतीने अवगत असायला हवी. केवळ बोलण्या-लिहिण्यासाठी नाही, तर आहे ते जग व त्यासंबंधीचे ज्ञान होण्यासाठी सुद्धा भाषा आवश्यक असते.
भाषेशी संबंधित काही मूलभूत कौशल्ये आणि त्यातून असणारी काही करिअर्स पुढीलप्रमाणे सांगता येतील -
विचारकौशल्य
आपली स्व आणि सभोवतालच्या आकलनाची प्रक्रियाच मुळात भाषेतून घडत असते. भाषेशिवाय व्यापक ज्ञान निव्वळ अशक्य आहे. आपली भाषा जितकी समृद्ध तितका आपला ज्ञानाचा पाया भक्कम. त्यावर इमला उभारायचा तर अर्थातच विचार ही आवश्यक बाब ठरते. विचार करणे म्हणजे साठ(व)लेल्या माहितीची घुसळण करणे. विविध गोष्टींमधील संबंध शोधणे, तुलना करणे, विश्लेषण करणे, कल्पना करणे, अंदाज बांधणे, अर्थ लावणे, मूल्यमापन करणे.. हे सर्व म्हणजे विचारकौशल्य. ही सगळी भाषेतून घडणारी प्रक्रिया आहे. भाषा जितकी समृद्ध तितकी आकलनशक्ती नि विचारशक्ती तीव्र. लेखक, विचारवंत यांकडे तर हे विचारशक्ती असतेच, पण तुम्हा -आम्हा सर्वसामान्यांकडेदेखील ती काही प्रमाणात असते. विचारशक्ती ही काही केवळ दैवी देणगी नव्हे, ती प्रयत्नांनीदेखील साध्य करता येण्याजोगी गोष्ट आहे. कल्पना करणे, संकल्पना विकसित करणे, त्याच्या विविध बाजू न्याहाळणे, विषय सुचणे/सुचवणे, कार्यक्रम वा उपक्रमाचा आराखडा तयार करणे, त्याला ध्येयधोरण बहाल करणे, मुद्देसूद व सुस्पष्ट आखणी करणे.विचारांची ही कौशल्ये सृजनशीलता, नियोजन, व्यवस्थापन व नेतृत्वगुणांशी संबंधित आहेत. हे उघडच आहे. समाजकारण, राजकारण, प्रसारमाध्यमे, उद्योगजगत..यांच्याशी संबंधित अनेक करिअर्स यांतून खुली होतात. विचारकौशल्य यावर स्वतंत्रपणे कुठलाही अभ्यासक्रम नाही. वाचण्यासाठी मात्र भरपूर उपलब्ध आहे. त्याची पहिली पायरी म्हणून जिज्ञासूंनी एडवर्ड ही बोनो यांची पुस्तके जरूर पाहवीत.
श्रवण कौशल्य
लक्षपूर्वक ऐकणे हेदेखील एक भाषिक कौशल्यच आहे. ऐकण्याच्या प्रक्रियेत समोरची व्यक्ती जे बोलते आहे, त्यातील शब्द, उच्चारणातील चढ-उतार, त्यानुसार होणारे अर्थ, नेमके काय म्हणायचे आहे आणि काय बोलले जाते आहे, याबद्दलचे संपूर्ण अवधान (म्हणजेच श्रवण केलेल्या गोष्टींबद्दलचे भाषिक अवधान) अध्याहृत असते. रोजच्या व्यवहारात आणि मानवी नातेसंबंधांत देखील ऐकणे ही गोष्ट महत्त्वाची असते. कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्यांना वेगवेगळ्या अक्सेंटने बोलायला शिकवले जाते. तसेच या कामात इतरांचे अक्सेंट समजून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. जाहिरातीत, चित्रपटांत, नाटकांत विविध प्रकारच्या डायलेक्टस् वापरल्या जातात, त्या त्या काळाची अथवा विशिष्ट भौगोलिक परिसराची विशिष्ट भाषारूपे याविषयीचे मार्गदर्शनही या माध्यमातील लोकांना आवश्यक असते. ‘लगान’ या चित्रपटासाठी आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान यांनी या प्रकारचे मार्गदर्शन घेतले होते, असे म्हणतात. उत्तम शिक्षक, उत्तम वकील, उत्तम समुपदेशक, उत्तम डॉक्टर, उत्तम अभिनेता, उत्तम नेता उदा. सामाजिक कार्यकर्ता तसेच राजकारणी व्यक्तीलाही आपल्या कामात श्रवण कौशल्याचा उपयोगच होतो.
बोलण्याचं कौशल्य
आपल्या बहुतेकांच्या लेखी भाषा म्हणजे बोलणं, ध्वनिरूप उच्चारण. तेच भाषेचे सर्वाधिक प्रचलित असे रूप आहे, म्हणून तर भाषेला वाणी असे म्हटले जाते. बोलण्याच्या या कौशल्याची दोन रूपे सांगता येतील- आवाज आणि वक्तृत्व. ही दोन भिन्न कौशल्ये आहेत.
उत्तम आवाज ही जशी नसíगक देणगी असू शकते, तशीच ती प्रयत्नपूर्वक देखील कमावता येणारी गोष्ट आहे. आवाज गायकाला आवश्यक असतो, निवेदकाला आवश्यक असतो. आवाजाने तुमच्या व्यक्तिमत्त्वाला भरीवपणा, उठावदारपणा मिळतो. विविध प्रकारचे मंचीय कार्यक्रम, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, कॅसेट /सीडी , नाटक, चित्रपट..आदी अनेक माध्यमांमध्ये गायनाइतकेच निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत घेणे, डबिंग, कथाकथन. इत्यादींसाठी उत्तम-वैशिष्टय़पूर्ण आवाज असणे गरजेचे असते. तेव्हा वरील सर्व प्रसारमाध्यमांमध्ये आवाजाच्या अनुषंगाने विविध करिअर्स असतात. अमिन सयानी, अमिताभ बच्चन यांचे आवाज असे सुप्रसिद्ध आहेत. आवाज विकसित करणे व त्याचा योग्य त्या प्रकारे वापर करणे यासंबंधी रीतसर प्रशिक्षणाचे शास्त्र आहे. अलीकडच्या काळात ‘व्हॉइस कल्चर’ यावरच्या कार्यशाळादेखील होतात. डॉ. श्रीराम लागू, डॉ. अशोक रानडे यांनी मराठीत यासंबंधी मूलभूत महत्त्वाचे लेखन केले आहे. ते जिज्ञासूंनी जरूर वाचावे.
उत्तम वक्तृत्वगुण असणाऱ्या व्यक्तीला ‘वक्ता दशसहस्त्रेषु’असे म्हटले जाते. अनेक क्षेत्रांमध्ये वक्तृत्त्वगुणाची आवश्यकता असते. एकवेळ तुमचा आवाज उत्तम नसला तरी चालेल, पण उत्तम वक्तृत्त्वाच्या आधारे तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पाडू शकता. त्याला ज्ञान आणि अभ्यासाची साथ असेल तर सोन्याहून पिवळे. मंचीय कार्यक्रम, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, कॅसेट/सीडी, नाटक, चित्रपट.. आदी अनेक माध्यमांमध्ये वक्तृत्त्वाच्या आधारे करिअर करता येते. निवेदक, सूत्रसंचालक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, कथाकथनकार, अभिवाचनकार, प्रवचनकार, कीर्तनकार, प्रवक्ता ..ही करिअर्स थेटपणे वक्तृत्त्वगुणांशी संबंधित आहेत. पण व्यापार-सामाजिक-राजकीय-कला आदी सार्वजनिक क्षेत्रांत वावरणाऱ्या व्यक्तीलाही यशस्वी होण्यासाठी वक्तृत्त्वगुणांची शिदोरी लागते. ‘वक्तृत्त्वकौशल्य’ या विषयावर अनेक पुस्तके आहेत, परंतु उत्तम वक्त्यांचे निरीक्षण करून स्वतच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप अशी स्वतंत्र वक्तृत्त्वशैली विकसित करणे ही प्रयत्नांनी साध्य करता येणारी गोष्ट आहे.
लिहिण्याचं कौशल्य
लिहिणं हे भाषेचं दुसरं महत्त्वाचं रूप आहे. वक्तृत्त्व कलेइतकंच यातही भाषेचं कसब पणाला लागतं. लेखनाची असंख्य रूपे आणि वापराची शेकडो क्षेत्रे आहेत. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, कविता, ललितगद्य.. ही सृजनशील लेखनाची उदाहरणे झाली. मराठीत या प्रकारच्या लेखनातून फारसा पसा मिळत नसला तरी प्रतिष्ठा, मानमरातब अजून तरी टिकून आहे. उपयोजित स्वरूपाच्या लेखनातून मात्र करिअर करता येणे शक्य आहे. वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, छोटे-मोठे मंचीय कार्यक्रम यांत विविध प्रकारच्या संहितांची आवश्यकता असते. बातम्या, स्फूट, लेख, माहिती, मुलाखत, शब्दांकन, वृत्तांतलेखन, सदरलेखन, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठीचे मनोरंजनपर कार्यक्रम तसेच पटकथा-संवादलेखन, सर्व प्रसारमाध्यमांसाठीचे जाहिरातलेखन, ब्लॉगसाठीचे लेखन, वेबसाइटसाठीचे लेखन, मोबाइलसाठीचे मेसेजेस, शुभेच्छापत्रे, टी-शर्ट यासाठीचे मजकुरलेखन, पत्रके-पोस्टर्स-पुस्तिका यांतले प्रमोशनल लेखन.. अशी उपयोजित लेखनाची नानाविध रूपे आजघडीला करिअरच्या दृष्टीने खुणावत आहेत. डीटीपी, टायिपग यांचाही समावेश लेखनकौशल्यात करता येईल. या सर्व लेखनकौशल्यांसाठी मराठीत तरी पुरेसे अभ्यासक्रम, प्रशिक्षण वा पुस्तके उपलब्ध नाहीत. पण निरीक्षण व सराव व प्रयत्नांतून साध्य करता येणाऱ्या या गोष्टी आहेत.
संपादन कौशल्य
वृत्तपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, वार्षकिे तसेच प्रकाशनसंस्थांमधून संपादक असतात, हे आपणा सर्वानाच परिचित आहे. छापल्या जाणाऱ्या एकूण मजकुराचे प्रारूप ठरविणे, त्यासंबंधीचे ध्येयधोरण आखणे, विषय सुचवणे, तो हवा तसा लिहून घेणे, नवनवे विषय व लेखक हेरणे, आलेले लेखन तपासणे, त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करणे/सुचवणे, आवश्यक तर पुनल्रेखन करवून घेणे, उत्तम-एकसंध-सुसूत्र-निर्दोष लेखनाचा आदर्श निर्माण करणे, हे संपादकाचे काम असते. संपादक केवळ छापील माध्यमांपुरताच असतो, असे मात्र नाही. आकाशवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमांतदेखील विविध प्रकारच्या संहितांसाठी संपादकाची आवश्यकता असते. आपल्याकडे अजून एक फारशी (खरेतर मुळीच) प्रचलित नसलेली गोष्ट म्हणजे चित्रपटसंहितेचा संपादक- त्याला पाश्चात्य देशांत ‘स्क्रिप्ट डॉक्टर’ असे म्हणतात. संपादन हेदेखील एक निसंशय भाषिक कौशल्य आहे.
भाषांतर कौशल्य
सर्वसाधारणपणे प्रत्येक सुशिक्षित भारतीयाला तीन भाषा तरी येतातच- मातृभाषा (जी प्रमुख्याने त्या त्या प्रदेशाची भाषा प्रादेशिक बोली भाषा असते), राष्ट्रभाषा हिंदी आणि ज्ञानभाषा इंग्रजी. केवळ एकाहून अधिक भाषा येणे भाषांतरासाठी पुरेसे नसते. भाषांतर हे द्वैभाषिक कौशल्य आहे. एका भाषेतील अर्थ दुसऱ्या भाषेत नेणे म्हणजे भाषांतर अशी भाषांतराची साधीसोपी व्याख्या सांगता येईल. भारत हा मुळातच बहुभाषिक देश आहे. जागतिकीकरणामुळे तर अधिकच प्रमाणात भाषांतराची आवश्यकता निर्माण झाली आहे. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये विविध प्रकारच्या संहिता भाषांतरीत कराव्या लागतात. बातम्या, लेख, माहिती..ते जाहिरातींपर्यंत. अलिकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात गाजलेली पुस्तके मराठीत त्वरेने भाषांतरीत होताना दिसतात. त्यात इंग्रजीतली तर आहेतच, पण अन्य प्रादेशिक व जगभरातल्या भाषांतून व्हाया इंग्रजी, मराठीत येणारी पुस्तकेही खूप आहेत. इंग्रजीतर भाषांतून थेट मराठीत येणाऱ्या भाषांतरांची संख्याही कमी नाही. त्यात कथा-कादंबऱ्या यांतील पॉप्युलर साहित्याबरोबरच अभिजात व सामाजिक-राजकीय-वैज्ञानिक यांतील माहितीपर व वैचारिक भाषांतरेही विपुल प्रमाणात होत आहेत. दिवसेंदिवस ही भाषांतराची गरज वाढतेच आहे. चित्रपटांच्या संहितादेखील डिबग किंवा सबटायटिलगसाठी भाषांतरीत केल्या जातात. बहुभाषिक पर्यावरणात काम करताना सामाजिक-राजकीय तसेच विविध आस्थापनांच्या कामातदेखील भाषांतराची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता असते. सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांत भिन्नभाषिक समुहांत प्रत्यक्ष आदानप्रदान होताना दुभाषाची आवश्यकता असते. अलिकडच्या काळात विविध अभ्यासक्रमांतून भाषांतरशास्त्र व प्रत्यक्ष उपयोजन शिकवले जाते.
रूपांतर कौशल्य
कलाकृतीला (प्रामुख्याने शब्दसंहितेला) एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात (अन्य रूपांतील शब्दसंहितेत)नेणे म्हणजे रूपांतर. विविध प्रसारमाध्यमांची वाढ ज्या प्रमाणात झाली, त्या प्रमाणात रूपांतराची गरज निर्माण होणेही स्वाभाविक आहे. कथा किंवा कादंबरीवर आधारित एकांकिका, नाटक, आकाशवाणीसाठी श्रुतिका, दूरचित्रवाणी माध्यमातील मालिका अथवा चित्रपटसंहिता ही रूपांतराची उदाहरणे आहेत. कवितेवर आधारित सादरीकरणे हेही रूपांतराचे उदाहरण मानता येईल. एकापेक्षा अधिक कलामाध्यमांची समज ही रूपांतर कौशल्यासाठीची पूर्वअट आहे. हेही करिअरचे एक क्षेत्र आहे.
तंत्रज्ञानाशी संबंधित भाषा कौशल्य
मोबाइल, संगणक, इंटरनेट. या माध्यमांमध्ये आता इंग्रजीतर भाषा वापरणेही सुकर झाले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे डीटीपी, टायिपग यांचाही समावेश लेखनकौशल्यात करता येईल. ही माध्यमे पूर्णत तांत्रिक आहेत. त्यात भाषेच्या अनुषंगाने विविध प्रकारचे फॉन्टस् , स्पेल-चेक, मशिन ट्रान्सलेशन (यांत्रिक भाषांतर).व त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करायचे तर एका बाजूला तांत्रिक ज्ञानही आवश्यक आहे आणि भाषिकही. हे विलक्षण विस्तारणारे करिअरचे क्षेत्र आहे. यासंबंधीचे काही महत्त्वाचे काम आयआयटी मुंबई आणि म्हैसूरच्या भाषा संस्थेत चालू आहे.
भाषा अभ्यासाशी संबंधित विविधकौशल्ये
भाषा अभ्यासाच्या विविध शाखा आहेत. पुरातत्त्वशास्त्राशी निगडित भाषाकौशल्ये- प्राचीन लिपींचा अभ्यास, प्राचीन भाषांचा शोध व अभ्यास. आज प्रचलित असलेल्या भाषांमधील जुनं साहित्य इंटरप्रिट करण्याचं कौशल्य. भाषाशास्त्राच्या अनुषंगाने भाषेचे विविध नमुने गोळा करणे, त्यांचे भाषिक विश्लेषण करणे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आवाजाच्या नमुन्यांचा अभ्यास व विश्लेषण, कोशनिर्मितीसाठी शब्दसंग्रह, त्याचा नेमका अर्थ लावणे..इत्यादी. याला ढोबळमानाने निरूपणकौशल्य म्हणूया. यात खरेतर एकाहून अधिक भाषाकौशल्ये पणाला लागतात. फारसं परिचित नसलं तरी तेही करिअरचं एक क्षेत्र असू शकतं.
इंग्रजी ही आजघडीला लोकसंख्येच्या दृष्टीने नसली तरी ज्ञान आणि व्यवहाराच्या दृष्टीने सर्वाधिक मोठी भाषा आहे. सुमारे अडीचशे-तीनशे वष्रे आधी इंग्लंडने आणि मागील पन्नास-साठ वष्रे अमेरिकेने जगावर राजकीय व व्यापारी पकड निर्माण केली आहे. ही दोन्हीही इंग्रजी भाषिक राष्ट्रे आहेत. परिणामी इंग्रजी वाढली. परंतु इंग्लंड व अमेरिका आजही एकभाषिकच राष्ट्रे आहेत. जागतिकीकरणामुळे मागील २० वर्षांत झपाटय़ाने विविध देश परस्परांशी जोडले गेले आहेत. जागतिकीकरणामुळे इंग्रजी वाढते आहे नि अन्य भाषांसमोर अस्तित्त्वाचेच संकट उभे राहिले आहे, हे खरे असले तरी तंत्रज्ञान व माध्यमबहुलता याचा (योग्य तो वापर केल्यास) झाला तर भाषावाढीला फायदाच होतो आहे. इंग्रजीला देखील अन्य भाषांशी सलोख्याचे संबंध जोडणे जागतिकीकरणामुळे अपरिहार्य बनले आहे. जपान, फ्रान्स, इटली . या देशांतील सुशिक्षित लोक प्रामुख्याने द्वैभाषिक आहेत. त्या त्या देशाची भाषा व इंग्रजी अशा दोन भाषा ते जाणतात. पण भारतीय सुशिक्षित वर्ग मात्र त्रभाषिक आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या भाषिक व सामाजिक उलथापालथींत तगून राहण्याचे सामथ्र्य याच वर्गाकडे इतरांपेक्षा अधिक आहे. हे आपण ओळखायला हवे. बहुभाषिकता (म्हणजे सरमिसळ भाषा नव्हे, तर अनेक भाषांवरील प्रभुत्त्व) ही त्याची सर्वात मोठी किल्ली आहे. याच किल्लीमुळे आपण स्वतला व आपल्या भाषेला वाचवण्याचे सामथ्र्य बाळगून आहोत.
जगातील सुमारे पाच हजार ५०० प्रचलित भाषांमध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक साधारणपणे १२वा आहे. मराठीतील वर्तमानपत्रांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत. गुगलवर मराठीचा पर्याय उपलब्ध आहे. युनिकोड प्रणालीत मराठी भाषा असल्याने इंटरनेटवरील मराठीचा वापर सुकर बनला आहे. मोबाइल हँडसेटमध्ये मराठीचा पर्याय आला आहे. याचाच अर्थ विविध व्यावसायिकांना मराठीचे संख्या व गुणात्मक मोल केव्हाच लक्षात आले आहे. फायदा नसता तर त्यांनी मराठीत एवढी गुंतवणूक केलीच नसती. तेव्हा वर दिलेली विविध भाषाकौशल्ये मराठीतून आत्मसात केल्यास आणि (मराठी टिकवत) बहुभाषिकता अधिक विकसित केल्यास करिअरच्या कितीतरी संधी आपणास सदैव खुल्या आहेत. भाषेतून करिअर करता येत नाही हा निव्वळ आपल्या अभ्यासक्रमांनी पसरविलेला समज आहे. अभ्यासक्रम ठरविणाऱ्या आत्ममग्न विद्वानांनी या वस्तुस्थितीकडे आजतागायत (आणि अजूनही) डोळेझाक केली आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे.
अभिजित देशपांडे ,सोमवार, २ मे २०११