Thursday, July 5, 2012

प्रेमा तुझा रंग कसा...?


येथे येणारं प्रत्येक प्रेमीयुगुल आपल्या मनातील भावना या सागराशी शेअर करण्यासाठी येत असावं जणू...स्वप्न तर फार पाहिली जातात या सागराच्या कुशीत, पण पूर्ण होतात ती यातील काहीच प्रेमीयुगुलांची. हा फोटो टिपण्याचा माझा हा एकच हेतू होता. जस्ट आम्ही मरिन ड्राईव्ह ला पोचलोच होतो. टॅक्सीत असतानाच मी हा फोटो काढला.
त्या दोघांच्या चेहऱ्या वर खूपच आनंद होता. फक्त ते एकमेकांशी काही न बोलता, एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. बहुतेक आजच्या भेटीमध्ये एकमेकांची स्वप्न जाणून घेतायेत. काही न बोलता त्याने मला समजून घ्यावं असं प्रत्येक मुलीला वाटत असंत. तर मुलगा, मीच का नेहमी बोलावं? तु पण काहीतरी बोल... याच विचारात असतो.
आणि मग बघत बसतात ते चेहऱ्याकडे. या सगळ्या मजेला साक्षीला असतो तो हा ‘सागर’. हा फक्त अनुभवत असतो. कधी त्याने माझा हात हातात घेऊन मला काहीतरी म्हणावं, तिने हट्ट करावा काहीतरी मागण्याचा ,चल जाऊ या, उशीर होतोय घरी जायला असं फक्त तिनं सारखं त्याला बोलायचं, पण तिथे तास न तास बसायची इच्छा तर दोघांची असते. असं हे प्रत्येक प्रेमीयुगुलामध्ये घडत असतंच.
प्रत्येक तरल, हळूवार प्रेमकथेला हा मुंबईचा समुद्र किनारा साक्षी आहे. यातील काही प्रेमप्रकरणे लग्नात रुपांतरीत झाल्यानंतर परत या समुद्राच्या भेटीस येतात. पण या वेळी ही पूर्वाश्रमीची प्रेमीयुगुले नवीन बंधनात अडकलेली असतात, ‘जीवनसाथींच्या’. पुन्हा ती आणाभाका घेतात आयुष्यभर साथ निभावण्याच्या. रंगवतात स्वप्ने स्वत:च्या घरकुलाची आणि घरकुलाच्या वेलीवर फुलणाऱ्या दोन फुलांची.
पण काही कमनशिबी प्रेमी देखील येथे येतात. परिस्थितीमुळे ते आयुष्यभर एकमेकांना सोबत नाही देऊ शकत. अशा दुर्दैवी प्रेमींपैकी एखादा येतो समुद्र किनारी आपल्या प्रेमाच्या स्मृती जागवायला. आपल्या अश्रूंना तो सागरा कडेच वाट मोकळी करुन देतो. आणि जो अतिदुर्दैवी असतो तो कशाचाही विचार न करता झोकून देतो स्वत:ला या अथांग सागरामध्येच.
कोण्या कवीने म्हटले आहे, ‘पाणी तेरा रंग कैसा’. जीवनाच्या बाबतीत ही हेच बोलू शकतो. शेवटी प्रवीण दवणेंच्या भाषेत सांगायचं तर, कोणी वाट पाहत असतं मनापासून, म्हणून जाण्यात मजा आहे. कोणी प्रेम करत असतं मनापासून, म्हणून जगण्यात मजा आहे...!!!

Saturday, June 16, 2012

बाप नावाचा माणूस...

खूप दिवसापासून ठरवतेय काहीतरी लिहायचं पण मनस्थिती काही सूचू देत नव्हती.... प्रेम, भावना ,निसर्ग, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, मित्र -मैत्रिण या सगळ्याबद्दल लिहीतच राहते.  पण ज्यांच्या मी खूपच जवळ आहे,  ज्यांच्या शिवाय माझे अस्तित्वच नाही त्यांना मी विसरले....आज खास लिहीण्याचं कारण म्हणजे माझे आई बाबा,  माझं घर, माझे दोन भाऊ...  या चार जणांजवळच  माझं आयुष्य सुरु होतं आणि संपतं देखील .... असं माझंच नव्हे तर प्रत्येकाचं असतं.  प्रत्येकाची आपल्या घरातल्यांशी जवळीक असतेच. प्रेम असतंच...पण कामाच्या व्यापामुळे, गडबडीमुळे, ‘ आपण तर एकाच घरात राहतो ना...!’ असं म्हणून सोडून देतो...आणि मग तयार होत जातो तो दुरावा... काहींच्या घरातले वातावरण अगदीच खेळकर असते, तर काहींच्या घरी अगदीच तणावाचे....

आई... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्याने पृथ्वीतलावर आई निर्माण केली... अशी वेग-वेगळी सुभाषिते, कवने आईवर रचली गेली आहेत. रशियातल्या मॅक्झिम गॉर्कीपासून आपल्या सानेगुरुंजींपर्यंत सगळ्यांनीच आईविषयी लिहीलंय. पण या सगळ्यामध्ये आई च्या समतुल्य असणारी व्यक्ति नेहमीच दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे...बाप.

आई इतकाच किंबहुना तिच्यापेक्षा जास्त राबणारा, आपल्या कुटुंबासाठी सगळ्या जगाशी लढणारा, स्वत: फाटकी बनियन घालून मुलांसाठी जीन्स आणणारा, बसने प्रवास न करता पायी चालणारा व वाचलेल्या पैशांने मुलांसाठी खाऊ आणणारा. स्वत: खस्ता खाऊन मुलांचं भावविश्व उजळवू पाहणारा असा बाप.
तुमचा... माझा... प्रत्येकाचाच काहीसा असाच असणारा... बाप.

माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे, माझे बाबा... आणि मग आई ... मला आजही आठवतेय लहाणपणी मी कधीच आईईई म्हणून रडले नाही ..पप्पाsss म्हणून मोठ्याने रडायचे... लहानपणीचा तो किस्सा आठवला की आजही मला फार हसू येते... दिलीप नारायण सोंडे . माझे बाबा... वयाच्या १९ व्या वर्षी ते गोदरेज कंपनी मध्ये नोकरीला लागले. घरी जॉईंट फॅमिली होती...माझ्या आजोबांनी,  मुलगा आता कामाला लागला म्हणून कामावर जाण्याचंच बंद केले... माझी आत्या त्यावेळी बी.एड करत होती ... मुलीच्या जातीनं शिक्षकंच बनावं असा आजोबांचा हट्ट... आणि माझे मोठे काका डोळ्याने अपंगत्व आलेले,  पण अशाही परिस्थितीत लहान- सहान काम करुन दिवसाचे १०-१५ रुपये कमवायचे. त्यांचं लग्न झालं होतं,  त्यांची २ मुले... रोजचे रोज घरी येणारे पाहुणे, आता एवढे मोठे कुटुंब आणि कमवता एकटा माणूस,  म्हणजे माझे बाबा... काही दिवसांनी आत्याचे देखील लग्न झाले,तिची दोन मुलं... असा गोतावळा पण वाढला... त्याचबरोबर माझ्या पप्पांचे सुद्धा लग्न झाले.. वरळीतील माया बनसोडेशी... ती म्हणजे माझी ‘आई’ या मोठ्या कुटुंबाचा सगळा भार उचलला तो माझ्या बाबांनी. दिवसा नोकरी आणि रात्रभर रिक्षा चालवून...बहीणीला डिएड चे शिक्षण दिले.. भावाचे कुंटुंब सांभाळले...असा सगळा संसाराचा गाडा त्यांनी सांभाळला ...पण त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव ना त्यांच्या बहिणीला राहिली ना भावाला...

आम्ही तीन भांवडं, मी, मोठा भाऊ विजय आणि लहान अनिरुद्ध ... मला माझे बाबा फार जवळचे वाटतात तर माझ्या भावांना आई... पप्पांनी आमच्यासाठी जे काही केले त्याला कशाचेच मोल नाही.... पण आमच्या वाढत्या वयाबरोबर आमच्यात आणि त्यांच्यात जनरेशन गॅप निर्माण होत गेला...आणि आता इतका वाढला आहे की ...घरात कोणाचे काय चालू आहे हे कोणालाच माहीत नसते... माझ्या आणि माझ्या भावामध्ये किमान २ वर्षाचे अंतर असेल पण आमच्या मध्ये फ्रेंडली बोलणे झाले आहे, हे कधीच मला आठवत नाही . आमची चारही जणांची जेवणाची वेळ वेगळी... आई मात्र घर संसार सांभाळण्यात दंग .... पण आता आमचे घर फारच बदलले होते... मनातील भावना व्यक्त कराव्या की नाही हा प्रश्न किमान शंभर वेळा तरी पडत असावा प्रत्येकाला ....कारण आजकाल आमच्यातील संवादच बंद झाला होता.... एकमेकांविषयीचे प्रेम संपल्यासारखे झाले होते....मी मुलगी म्हणून जी काळजी घेतली जायची ती तेवढी जबाबदारी दोन्ही भावांनी बरोबर पाळली... आजपर्यंत जसे चालू आहे तसेच चालू राहू दे असं म्हणून मी सुद्धा गप्पच राहिले....पण त्यादिवशी अचानक सगळे चित्र पालटले होते.... पप्पांच्या हाताला काम करताना मार लागला... त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यास घरामध्ये तु तु- मै मै चालू होती... शेवटी त्यांना प्लॅस्टर करावे लागले...पण ते कधीच आमच्याशी मनमोकळेपणाने बोलले नाहीत ..का बोलत नाहीत ते मला पण कळत नाही... मला आजही आठवतेय त्यांनी आमच्यासाठी काय काय केले आहे... पगार मुलांच्या शिक्षणाला पुरत नाही म्हणून रिक्षा चालवली ..मागेल ती वस्तु आणून दिली, कधी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणाले नाहीत...पण त्याबदल्यात त्यांना आज काय मिळाले. त्यांचीच मुले त्यांचं ऐकत नाहीत. पप्पा सारखा त्रास देतात,  अशीच तक्रार असते. सगळं काही अस्त्यावस्त झाले आहे. बहुतेक घरांमध्ये असेच चित्र आपल्याला दिसते.
पण मी त्यांच्यासाठी खूप स्वप्ने पाहिली...आज मी जे काही बनले आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आणि  त्यांच्यासाठीच ... पप्पांनी आयुष्यभर जी काही मेहनत केली आहे ती त्यांना माझ्या नोकरीनंतर करावी लागणार नाही हे मी आधीच ठरवले होते आणि आज मी त्या स्वप्नपूर्तीकडे पोहोचत आहे... पण त्याआधीच मी त्यांना गमवायला नको याची धास्ती देखील मनामध्ये लागून राहिली आहे... त्यांना ते सगळे सुख द्यायचे आहे जे त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी, भाऊ- बहिणींनी ,दिले नाही ते मला द्यायचे आहे. मला त्यांची मुलगी म्हणून जगायचे नाही तर त्यांचा मुलगा म्हणून जगायचे आहे...पप्पानां नेहमी मला ओरडून सांगावेसे वाटते मला तुमची खूप गरज आहे...प्लीज स्वतःची काळजी घ्या... आमच्यासाठी नाही  तर किमान स्वतःसाठी... आनंदाने जगा <3




Friday, March 9, 2012

शेवटची भेट फिल्मी होती...


दिव्य मराठी
 मध्ये आलेला अनुभव
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते ... मग ते आपले मित्र मैत्रिण असो वा आपल्या आयुष्यात येणाऱ्या खास व्यक्ती असो. तसं माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीशी माझं कोणतच नातं नाही... ना मैत्री ना प्रेमाचे ॠणानुबंध पण तरीही खूप खास, तो म्हणजे कार्टुन..प्रेमाने कार्टुन म्हणते बरं का... मैत्री तर भरपूर जणाशी होते पण ती टिकवायची कोणासोबत हे आपल्याच हातात असते... त्याची आणि माझी शेवटची भेट झाली ती अगधीच फिल्मी. तो नागपूरला घरी जायला मुंबईहून निघाला होता त्याचं लग्न होतं. सहा दिवस आधी निघाला होता लग्नाची तयारी करायला, त्याची सध्याकाळची विदर्भ एक्सप्रेस सात दहाची सीएसटीहून सुटणारी गाडी . माझा तो पूर्ण दिवस त्याच्या फोनची वाट पाहण्यात गेली पण तो सुद्धा घरी जाण्याच्या घाई मध्ये होता. मी साडेपाचला त्याला फोन केला कारण तो दादरहून ट्रेन पकडणार म्हणाला. पण झाले काही वेगळेच तो  सीएसटीला पोहोचला होता. सकाळ पासून मला काय झाले माहीत नव्ह्ते त्याला भेटण्याची एक इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. लगेच मी बॅग उचलली आणि तडक स्टेशनला निघाले. दादर पर्यंत टॅक्सी केली पण ती पण मध्येच बंद पडली. म्हणतात ना आपल्याला जेव्हा लवकर जायचे असते तेव्हा अशी सतरा विघ्न येतच असतात. दादर पोचतात मी सीएसटीसाठी फास्ट लोकल पकडली. साडेसहा पर्यंत पोचले मी पण गावी जाणा़ऱ्या ट्रेन कुठे असतात ते तर मला बापजन्मात माहीत नव्हते. अजून एक विघ्न म्हणून की काय समोर टिसी... तीन महीन्य़ाचा फस्ट क्लास पास घेऊन मी मुलुंड ते माहीम प्रवास करते पण कधी एक टिसी भेटला नाही आणि आजच नेमका भेटला जेव्हा तिकीट जवळ नव्हते... चांगलीच वाट लागली होती पण माहीत नाही त्याने मला तिकीट विचाराच्या आधीच मी त्याला गावी जाणाऱ्या ट्रेन बद्दल विचारले. आणि पटकन निघाले .  त्याला फोन केला त्याने फक्त ए७ एवढेच सांगितले आणि फोन ठेवला .आता हे काय आहे विचार करत पावलं झपाझप पुढे टाकत होते . त्यावेळी पहील्यांदा जाणवले की ट्रेनचा प्लॅटफॉर्म किती मोठा असतो कारण त्यावेळी तो संपतच नव्हता. आता फक्त थोड्याच वेळात डोळ्यातून पाणी टपकेल की काय अशी अवस्था झाली होती... पण समोर तो दिसला आणि सगळा त्राण पळून गेल्यासारखे झाले. माझ्या कडे बोलण्यासाठी काहीच नव्ह्ते... ‘इतना भागके आने की क्या जरुरत है रे’ त्याने विचारले आणि मी त्याला पटकन बोलून गेले की ‘तुझे नही समझेगा’ काय बोलायचं काहीच सुचत नव्हतं. अशा शांततेत वेळ पटकन निघून गेला... तो गाडीमध्ये बसला... अन त्याच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोरुन झपाझप जाऊ लागला... जसजशी ट्रेन दूर जात होती मी त्याच्या नजरेत पाहत होते. अलगत माझ्या डोळ्याची कडा ओली झाली होती. त्याच्या प्रॅक्टिकल वागण्याचा मला फार राग यायचा पण आज मी सुद्द्धा त्याच्या अगदी झाली आहे. नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची, करण्याची,अनुभण्याची त्याची सवय आज मला पण झाली आणि माझ्यातले बदल मलाच आज जाणवू लागले आहे, माझ्यातला आत्मविश्वास त्याने वाढवला खरंच त्याने जाता जाता मला बरंच बदललं होतं. हे अनामिक नातं गमवल्याच्या दुःखापेक्षा मी स्वतःला आज त्याच्यामुळे मिळवलं याचा आनंद होत होता. त्याचा ट्रेनचा प्रवास तर सुरु झाला जाता जाता माझ्या आयुष्याच्या प्रवासही मार्गी लावून गेला .

Thursday, February 23, 2012

Ranichi Baug is dying…


राणीची बाग म्हटलं की लहानपणी मन उचंबळून यायचं. आतापर्यंत निव्वळ पुस्तकातून किंवा फार तर चित्रपटामधून भेटलेले प्राणी थेट आपल्याला भेटणार. सिंहाची डरकाळी, हत्तीचे सुपासारखे कान, माकडाच्या उड्या, लबाड कोल्हा हे सगळं अनुभवायला मिळणार या कल्पनेने शहारुन जायचो. पण  लहानपणी राणीची बाग पहायची राहूनच गेली. त्या दिवशी मात्र तो योग जुळून आला. आम्ही सर्व मित्र राणीच्या बागेजवळ राहणाऱ्या मित्राकडॆ गेलो होतो. अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राणीच्या बागेत जायचं ठरलं. 
तिकीट काढून आम्ही बागेत गेलो. मन अगदी लहान मुलासारखं उंडारत होतं. मी कॅमेरा सोबतच घेतला होता. मनात अगदी यादी देखील तयार होती. एवढंच काय, कोणाचा फोटो कसा काढायचा हे पण ठरवलं होतं. सिंहाच्या पिंजऱ्याजवळ सगळ्यात पहिल्यांदा गेलो. जंगलाच्या राजाला पाहण्यासाठी भरपूर गर्दी होती. राजाची रुबाबदार पोझ घेण्यासाठी मी कॅमेरा सरसावला. लेन्स मधून त्या राजाला शोधू लागले. मनात धडधड चालू होती. कॅमेरातून पिंजरा दिसत होता. तयार केलेली गुहा दिसत होती. पण सिंह...तो मात्र एका दगडामागे पहुडला होता. बिच्चारा! राजाची अवस्था सेवकाहून वाईट झाली होती. केविलवाणा सिंह कॅमेरामध्ये बंदिस्त करायला मन धजावलेच नाही.