खूप दिवसापासून ठरवतेय काहीतरी लिहायचं पण मनस्थिती काही सूचू देत नव्हती.... प्रेम, भावना ,निसर्ग, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, मित्र -मैत्रिण या सगळ्याबद्दल लिहीतच राहते. पण ज्यांच्या मी खूपच जवळ आहे, ज्यांच्या शिवाय माझे अस्तित्वच नाही त्यांना मी विसरले....आज खास लिहीण्याचं कारण म्हणजे माझे आई बाबा, माझं घर, माझे दोन भाऊ... या चार जणांजवळच माझं आयुष्य सुरु होतं आणि संपतं देखील .... असं माझंच नव्हे तर प्रत्येकाचं असतं. प्रत्येकाची आपल्या घरातल्यांशी जवळीक असतेच. प्रेम असतंच...पण कामाच्या व्यापामुळे, गडबडीमुळे, ‘ आपण तर एकाच घरात राहतो ना...!’ असं म्हणून सोडून देतो...आणि मग तयार होत जातो तो दुरावा... काहींच्या घरातले वातावरण अगदीच खेळकर असते, तर काहींच्या घरी अगदीच तणावाचे....
आई... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्याने पृथ्वीतलावर आई निर्माण केली... अशी वेग-वेगळी सुभाषिते, कवने आईवर रचली गेली आहेत. रशियातल्या मॅक्झिम गॉर्कीपासून आपल्या सानेगुरुंजींपर्यंत सगळ्यांनीच आईविषयी लिहीलंय. पण या सगळ्यामध्ये आई च्या समतुल्य असणारी व्यक्ति नेहमीच दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे...बाप.
आई इतकाच किंबहुना तिच्यापेक्षा जास्त राबणारा, आपल्या कुटुंबासाठी सगळ्या जगाशी लढणारा, स्वत: फाटकी बनियन घालून मुलांसाठी जीन्स आणणारा, बसने प्रवास न करता पायी चालणारा व वाचलेल्या पैशांने मुलांसाठी खाऊ आणणारा. स्वत: खस्ता खाऊन मुलांचं भावविश्व उजळवू पाहणारा असा बाप.
तुमचा... माझा... प्रत्येकाचाच काहीसा असाच असणारा... बाप.
माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे, माझे बाबा... आणि मग आई ... मला आजही आठवतेय लहाणपणी मी कधीच आईईई म्हणून रडले नाही ..पप्पाsss म्हणून मोठ्याने रडायचे... लहानपणीचा तो किस्सा आठवला की आजही मला फार हसू येते... दिलीप नारायण सोंडे . माझे बाबा... वयाच्या १९ व्या वर्षी ते गोदरेज कंपनी मध्ये नोकरीला लागले. घरी जॉईंट फॅमिली होती...माझ्या आजोबांनी, मुलगा आता कामाला लागला म्हणून कामावर जाण्याचंच बंद केले... माझी आत्या त्यावेळी बी.एड करत होती ... मुलीच्या जातीनं शिक्षकंच बनावं असा आजोबांचा हट्ट... आणि माझे मोठे काका डोळ्याने अपंगत्व आलेले, पण अशाही परिस्थितीत लहान- सहान काम करुन दिवसाचे १०-१५ रुपये कमवायचे. त्यांचं लग्न झालं होतं, त्यांची २ मुले... रोजचे रोज घरी येणारे पाहुणे, आता एवढे मोठे कुटुंब आणि कमवता एकटा माणूस, म्हणजे माझे बाबा... काही दिवसांनी आत्याचे देखील लग्न झाले,तिची दोन मुलं... असा गोतावळा पण वाढला... त्याचबरोबर माझ्या पप्पांचे सुद्धा लग्न झाले.. वरळीतील माया बनसोडेशी... ती म्हणजे माझी ‘आई’ या मोठ्या कुटुंबाचा सगळा भार उचलला तो माझ्या बाबांनी. दिवसा नोकरी आणि रात्रभर रिक्षा चालवून...बहीणीला डिएड चे शिक्षण दिले.. भावाचे कुंटुंब सांभाळले...असा सगळा संसाराचा गाडा त्यांनी सांभाळला ...पण त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव ना त्यांच्या बहिणीला राहिली ना भावाला...
आम्ही तीन भांवडं, मी, मोठा भाऊ विजय आणि लहान अनिरुद्ध ... मला माझे बाबा फार जवळचे वाटतात तर माझ्या भावांना आई... पप्पांनी आमच्यासाठी जे काही केले त्याला कशाचेच मोल नाही.... पण आमच्या वाढत्या वयाबरोबर आमच्यात आणि त्यांच्यात जनरेशन गॅप निर्माण होत गेला...आणि आता इतका वाढला आहे की ...घरात कोणाचे काय चालू आहे हे कोणालाच माहीत नसते... माझ्या आणि माझ्या भावामध्ये किमान २ वर्षाचे अंतर असेल पण आमच्या मध्ये फ्रेंडली बोलणे झाले आहे, हे कधीच मला आठवत नाही . आमची चारही जणांची जेवणाची वेळ वेगळी... आई मात्र घर संसार सांभाळण्यात दंग .... पण आता आमचे घर फारच बदलले होते... मनातील भावना व्यक्त कराव्या की नाही हा प्रश्न किमान शंभर वेळा तरी पडत असावा प्रत्येकाला ....कारण आजकाल आमच्यातील संवादच बंद झाला होता.... एकमेकांविषयीचे प्रेम संपल्यासारखे झाले होते....मी मुलगी म्हणून जी काळजी घेतली जायची ती तेवढी जबाबदारी दोन्ही भावांनी बरोबर पाळली... आजपर्यंत जसे चालू आहे तसेच चालू राहू दे असं म्हणून मी सुद्धा गप्पच राहिले....पण त्यादिवशी अचानक सगळे चित्र पालटले होते.... पप्पांच्या हाताला काम करताना मार लागला... त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यास घरामध्ये तु तु- मै मै चालू होती... शेवटी त्यांना प्लॅस्टर करावे लागले...पण ते कधीच आमच्याशी मनमोकळेपणाने बोलले नाहीत ..का बोलत नाहीत ते मला पण कळत नाही... मला आजही आठवतेय त्यांनी आमच्यासाठी काय काय केले आहे... पगार मुलांच्या शिक्षणाला पुरत नाही म्हणून रिक्षा चालवली ..मागेल ती वस्तु आणून दिली, कधी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणाले नाहीत...पण त्याबदल्यात त्यांना आज काय मिळाले. त्यांचीच मुले त्यांचं ऐकत नाहीत. पप्पा सारखा त्रास देतात, अशीच तक्रार असते. सगळं काही अस्त्यावस्त झाले आहे. बहुतेक घरांमध्ये असेच चित्र आपल्याला दिसते.
पण मी त्यांच्यासाठी खूप स्वप्ने पाहिली...आज मी जे काही बनले आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आणि त्यांच्यासाठीच ... पप्पांनी आयुष्यभर जी काही मेहनत केली आहे ती त्यांना माझ्या नोकरीनंतर करावी लागणार नाही हे मी आधीच ठरवले होते आणि आज मी त्या स्वप्नपूर्तीकडे पोहोचत आहे... पण त्याआधीच मी त्यांना गमवायला नको याची धास्ती देखील मनामध्ये लागून राहिली आहे... त्यांना ते सगळे सुख द्यायचे आहे जे त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी, भाऊ- बहिणींनी ,दिले नाही ते मला द्यायचे आहे. मला त्यांची मुलगी म्हणून जगायचे नाही तर त्यांचा मुलगा म्हणून जगायचे आहे...पप्पानां नेहमी मला ओरडून सांगावेसे वाटते मला तुमची खूप गरज आहे...प्लीज स्वतःची काळजी घ्या... आमच्यासाठी नाही तर किमान स्वतःसाठी... आनंदाने जगा <3