Friday, March 9, 2012

शेवटची भेट फिल्मी होती...


दिव्य मराठी
 मध्ये आलेला अनुभव
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते ... मग ते आपले मित्र मैत्रिण असो वा आपल्या आयुष्यात येणाऱ्या खास व्यक्ती असो. तसं माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीशी माझं कोणतच नातं नाही... ना मैत्री ना प्रेमाचे ॠणानुबंध पण तरीही खूप खास, तो म्हणजे कार्टुन..प्रेमाने कार्टुन म्हणते बरं का... मैत्री तर भरपूर जणाशी होते पण ती टिकवायची कोणासोबत हे आपल्याच हातात असते... त्याची आणि माझी शेवटची भेट झाली ती अगधीच फिल्मी. तो नागपूरला घरी जायला मुंबईहून निघाला होता त्याचं लग्न होतं. सहा दिवस आधी निघाला होता लग्नाची तयारी करायला, त्याची सध्याकाळची विदर्भ एक्सप्रेस सात दहाची सीएसटीहून सुटणारी गाडी . माझा तो पूर्ण दिवस त्याच्या फोनची वाट पाहण्यात गेली पण तो सुद्धा घरी जाण्याच्या घाई मध्ये होता. मी साडेपाचला त्याला फोन केला कारण तो दादरहून ट्रेन पकडणार म्हणाला. पण झाले काही वेगळेच तो  सीएसटीला पोहोचला होता. सकाळ पासून मला काय झाले माहीत नव्ह्ते त्याला भेटण्याची एक इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. लगेच मी बॅग उचलली आणि तडक स्टेशनला निघाले. दादर पर्यंत टॅक्सी केली पण ती पण मध्येच बंद पडली. म्हणतात ना आपल्याला जेव्हा लवकर जायचे असते तेव्हा अशी सतरा विघ्न येतच असतात. दादर पोचतात मी सीएसटीसाठी फास्ट लोकल पकडली. साडेसहा पर्यंत पोचले मी पण गावी जाणा़ऱ्या ट्रेन कुठे असतात ते तर मला बापजन्मात माहीत नव्हते. अजून एक विघ्न म्हणून की काय समोर टिसी... तीन महीन्य़ाचा फस्ट क्लास पास घेऊन मी मुलुंड ते माहीम प्रवास करते पण कधी एक टिसी भेटला नाही आणि आजच नेमका भेटला जेव्हा तिकीट जवळ नव्हते... चांगलीच वाट लागली होती पण माहीत नाही त्याने मला तिकीट विचाराच्या आधीच मी त्याला गावी जाणाऱ्या ट्रेन बद्दल विचारले. आणि पटकन निघाले .  त्याला फोन केला त्याने फक्त ए७ एवढेच सांगितले आणि फोन ठेवला .आता हे काय आहे विचार करत पावलं झपाझप पुढे टाकत होते . त्यावेळी पहील्यांदा जाणवले की ट्रेनचा प्लॅटफॉर्म किती मोठा असतो कारण त्यावेळी तो संपतच नव्हता. आता फक्त थोड्याच वेळात डोळ्यातून पाणी टपकेल की काय अशी अवस्था झाली होती... पण समोर तो दिसला आणि सगळा त्राण पळून गेल्यासारखे झाले. माझ्या कडे बोलण्यासाठी काहीच नव्ह्ते... ‘इतना भागके आने की क्या जरुरत है रे’ त्याने विचारले आणि मी त्याला पटकन बोलून गेले की ‘तुझे नही समझेगा’ काय बोलायचं काहीच सुचत नव्हतं. अशा शांततेत वेळ पटकन निघून गेला... तो गाडीमध्ये बसला... अन त्याच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोरुन झपाझप जाऊ लागला... जसजशी ट्रेन दूर जात होती मी त्याच्या नजरेत पाहत होते. अलगत माझ्या डोळ्याची कडा ओली झाली होती. त्याच्या प्रॅक्टिकल वागण्याचा मला फार राग यायचा पण आज मी सुद्द्धा त्याच्या अगदी झाली आहे. नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची, करण्याची,अनुभण्याची त्याची सवय आज मला पण झाली आणि माझ्यातले बदल मलाच आज जाणवू लागले आहे, माझ्यातला आत्मविश्वास त्याने वाढवला खरंच त्याने जाता जाता मला बरंच बदललं होतं. हे अनामिक नातं गमवल्याच्या दुःखापेक्षा मी स्वतःला आज त्याच्यामुळे मिळवलं याचा आनंद होत होता. त्याचा ट्रेनचा प्रवास तर सुरु झाला जाता जाता माझ्या आयुष्याच्या प्रवासही मार्गी लावून गेला .

No comments:

Post a Comment