येथे येणारं प्रत्येक प्रेमीयुगुल आपल्या मनातील भावना या सागराशी शेअर करण्यासाठी येत असावं जणू...स्वप्न तर फार पाहिली जातात या सागराच्या कुशीत, पण पूर्ण होतात ती यातील काहीच प्रेमीयुगुलांची. हा फोटो टिपण्याचा माझा हा एकच हेतू होता. जस्ट आम्ही मरिन ड्राईव्ह ला पोचलोच होतो. टॅक्सीत असतानाच मी हा फोटो काढला.
त्या दोघांच्या चेहऱ्या वर खूपच आनंद होता. फक्त ते एकमेकांशी काही न बोलता, एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. बहुतेक आजच्या भेटीमध्ये एकमेकांची स्वप्न जाणून घेतायेत. काही न बोलता त्याने मला समजून घ्यावं असं प्रत्येक मुलीला वाटत असंत. तर मुलगा, मीच का नेहमी बोलावं? तु पण काहीतरी बोल... याच विचारात असतो.
आणि मग बघत बसतात ते चेहऱ्याकडे. या सगळ्या मजेला साक्षीला असतो तो हा ‘सागर’. हा फक्त अनुभवत असतो. कधी त्याने माझा हात हातात घेऊन मला काहीतरी म्हणावं, तिने हट्ट करावा काहीतरी मागण्याचा ,चल जाऊ या, उशीर होतोय घरी जायला असं फक्त तिनं सारखं त्याला बोलायचं, पण तिथे तास न तास बसायची इच्छा तर दोघांची असते. असं हे प्रत्येक प्रेमीयुगुलामध्ये घडत असतंच.
प्रत्येक तरल, हळूवार प्रेमकथेला हा मुंबईचा समुद्र किनारा साक्षी आहे. यातील काही प्रेमप्रकरणे लग्नात रुपांतरीत झाल्यानंतर परत या समुद्राच्या भेटीस येतात. पण या वेळी ही पूर्वाश्रमीची प्रेमीयुगुले नवीन बंधनात अडकलेली असतात, ‘जीवनसाथींच्या’. पुन्हा ती आणाभाका घेतात आयुष्यभर साथ निभावण्याच्या. रंगवतात स्वप्ने स्वत:च्या घरकुलाची आणि घरकुलाच्या वेलीवर फुलणाऱ्या दोन फुलांची.
पण काही कमनशिबी प्रेमी देखील येथे येतात. परिस्थितीमुळे ते आयुष्यभर एकमेकांना सोबत नाही देऊ शकत. अशा दुर्दैवी प्रेमींपैकी एखादा येतो समुद्र किनारी आपल्या प्रेमाच्या स्मृती जागवायला. आपल्या अश्रूंना तो सागरा कडेच वाट मोकळी करुन देतो. आणि जो अतिदुर्दैवी असतो तो कशाचाही विचार न करता झोकून देतो स्वत:ला या अथांग सागरामध्येच.
कोण्या कवीने म्हटले आहे, ‘पाणी तेरा रंग कैसा’. जीवनाच्या बाबतीत ही हेच बोलू शकतो. शेवटी प्रवीण दवणेंच्या भाषेत सांगायचं तर, कोणी वाट पाहत असतं मनापासून, म्हणून जाण्यात मजा आहे. कोणी प्रेम करत असतं मनापासून, म्हणून जगण्यात मजा आहे...!!!
nice..very nice
ReplyDelete