Wednesday, June 8, 2011

गिरणी कामगाराची नवीन आवृत्ती...


गोदरेज... घराच्या छोट्या कुलुपापासून ते पैशाच्या तिजोरीपर्यंत. प्रत्येक गरजू वस्तूंचे उत्पादन करणारे गोदरेज गेल्या आठवड्यात मात्र एका वेगळ्याच वादात अडकले. गेल्या तीस वर्षापासून गोदरेज कंपनीला आपलं सर्वस्व मानणाऱ्या कामगारांवर गोदरेज कंपनीच्या व्यवस्थापनाने निलंबनाची कुऱ्हाड उगारली. आपल्या विविध मागण्यांसाठी आठ कामगारांनी आमरण उपोषण सुरु केले. ११४ वर्षाच्या गोदरेजच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडत होते.


माझे वडील देखील गोदरेजमध्येच काम करतात. वयाच्या १९ वर्षापासून माझ्या बाबांनी गोदरेज मध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि आजही वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांचा तो जोश तसाच आहे. बाबांसारखे कित्येक कामगार गोदरेज मध्ये ३० वर्षांहून अधिक काळ गोदरेज मध्ये कार्यरत आहेत. गोदरेज कंपनीशी या कामगारांचाच नव्हे तर त्या कामगारांच्या कुटुंबियांचा देखील एक स्नेहबंध जुळला आहे. मी शाळेत जात असतानाची गोष्ट. आम्हांला शाळेत टी. व्ही वर सकाळच्या बातम्या दाखवत. त्या बातम्यांच्या दरम्यान कधी कधी गोदरेजच्या उत्पादनाची जाहिरात येई आणि मग मी माझ्या मैत्रिणींना मोठ्या अभिमानाने सांगे की हे उत्पादन माझ्या बाबांनी बनविले आहे. त्या लहान वयात देखील माझ्या सारख्या लहान मुलीला गोदरेज विषयी किती अभिमान होता हे तुम्हांला कळले असेलच.

मुंबई तरुण भारत
गोदरेज कंपनीच्या जोरावरच कित्येक कामगारांचे संसार बहरले. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. गोदरेज कंपनीने उपलब्ध करुन दिलेल्या सभागृहात अनेक कामगारांच्या मुला- मुलींचे विवाह सोहळे निर्विघ्न पणे पार पडले. कंपनीच्या जोरावर भावी स्वप्ने रंगविणारा आजचा कामगार मात्र उद्याच्या भितीने पार उध्वस्त झाला आहे. कंपनी बंद पडेल अशा वावड्या उठतात. कंपनी बंद पडल्यावर आपल्या कुटुंबाचं कसं होणार? मुलांच्या शिक्षणाचं काय? मुलीचे लग्न कसं करणार? वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर इतरत्र काम तरी मिळेल का? या आणि अशा असंख्य प्रश्नाने त्याची रात्रीची झोप उडाली आहे. घरी आल्यानंतर देखील बायको हाच प्रश्न विचारते, तिला काय उत्तर देणार? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे सरकार, मिडीया आणि एनजीओवाले सहानुभूतीने तरी पाहतात. पण गोदरेज मध्ये काम करणाऱ्या या कामगारांकडे पाहण्यास कोणालाच वेळ नाही.

तीस वर्षांपूर्वी काहीशी अशीच अवस्था गिरणी कामगारांची देखील झाली होती. गिरण्या हळूहळू बंद पडल्या आणि गिरणीकामगार देशोधडीला लागले. आज गिरणी कामगाराचे अस्तित्व उरले आहे ते फक्त म्युझियम पुरते. गिरणी कामगाराची नवीन आवृत्ती ही गोदरेजच्या कामगाराची तर नसेल ना, या कल्पनेनेच पोटात गोळा उठतो.

Thursday, June 2, 2011

पहिला पाऊस आणि तो



















खरं तर आतापर्यत मी भरपूर लोकांच्या पहिल्या पावसाच्या आठवणी वाचल्या होत्या. सगळं काही फालतू वाटायचे वाचताना. असं थोडीच असतं , असं नेहमीच वाटायचं. पण यावर्षीचा पाऊस मला एक मस्त अनुभव देऊन गेलाय माझ्या आयुष्यभर आठवणीत राहण्यासारख्या...इनफॅक्ट न विसरता येण्यासारख्या हा माझा ‘पहिला पाऊस’ त्याच्या सोबतचा...बाहेर मस्त पाऊस पडत होता पहिला पाऊस म्हणून सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंदच . रस्त्यावर राहणाऱ्यांची घर आवरण्याची तारांबळ चालू होती. स्वयंपाक करता करता अवेळी आलेल्या या पाहुण्याने त्या गृहिणीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले, आधी चिमुकल्यासाठी जेवण बनवू की या पावसापासून घराला आवरु.
अचानक आलेल्या या पावसाचा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो म्हणजे लहान मुलांना. आम्ही जून महिना उजाडला की ‘सांग, सांग भोलानाथ... पाऊस पडेल काय...? अशी विचारणा थेट त्या पावसाकडेच करु पण जूनच्या दुसऱ्याच दिवशी पडलेल्या या पावसाने बाळगोपाळांना हे गाणे गाण्याची संधी मात्र दिली नाही. कदाचित तो देखील ‘लिटील चॅम्प’ पहात असावा.
पहिला पाऊस म्हटला की आठवण होते ती पावसाचे दवबिंदू पिऊन तृप्त होऊ पाहणाऱ्या आणि आनंदाने आपला सुगंध आसमंतात उधाळणाऱ्या मृदगंधाचा अर्थात मातीचा. ही सुगंधित माती जगातील कोणत्याही सुगंधित परफ्युमला मात देईल अशी. निसर्गाचं हे देणं आपण कपाळकरंटे मात्र दुर्लक्षित करतो. उगाचच अडकतो त्या कृत्रिम सुगंधी कुपींच्या जाळ्यात. अशा या ओल्या झालेल्या मातीचा सुगंध सगळीकडे दरवळलेला असतानाच, रोज घरी जाताना असणारे वातावरण आज मात्र अचानक बदलून गेले होते.
स्टेशनवरुन जाताना नुकतेच लग्न झालेल्या एका जोडप्याचे बोलणे मला ऐकू आले . ती( आनंदाने, आणि थोडी लाजून देखील) - अहो, खूप छान गारवा वाटतोय ना, आज रात्री मस्त थंड वाटेल ना... !!! हे सांगताना जणू तिच्या अंगावर प्रणयीभावनेने काटाच उभा राहिला. आणि तो म्हणतो... हो ना, आज आपल्याला एसी लावावा लागणार नाही. हे ऐकून मला तर फार हसू आले. बिच्चारी ‘ती’ प्रणयरुपी पावसात चिंब होऊ पाहणारी आणि ‘हा’ तिला वास्तवात आणू पाहणारा साधा सरळ नवरा. पावसात मुली लवकरच रोमॅन्टीक होतात पण मुले, आनंद घेतच नाहीत पावसाचा. क्वचितच कुठेतरी असा मुलगा मिळेल ज्याला तिच्याबरोबर पाऊस पण आवडतो. पण या जोडप्यामध्ये ती पावसाला पाहण्यात, त्याला न्याहाळण्यात रमली होती आणि तो बिचारा तिची बॅग अन तिला सांभाळण्यात मग्न... तिला पाहताना त्याच्या चेहऱ्यावर एकच लय होती की तुला पाऊस आवडतो आणि मला तु, तुला पावसात भिजायला आवडते आणि मला पावसात भिजताना तु...या सगळ्या भावनांना मनात ठेवून त्याने तिचा हात घट्ट पकडला होता, जणू मी तुझ्या सोबतच आहे असं सांगण्यासाठी.

पुढारी युथ कॉर्नर मध्ये
आलेला लेख
असंच काहीसं आज माझं झालं होतं...त्याला मी आज भेटणार होते. हे आमचे आधीच ठरले होते. पण मला उशीर झाला ऑफिसमधून निघायला. मग ठरवलं मी, नको जायला खूप उशीर झालाय, संध्याकाळचे सात वाजले होते...पण मन काही मानायला तयार नव्हते. त्याला इगनोर करण्याचा खूप प्रयत्न केला पण जमलेच नाही...शेवटी त्याला विचारले फोन करुन... मला नेहमीच मनाला जे वाटते ते करण्याची सवय आहे आणि आज पण मी तेच केले..त्याला भेटण्याची ओढ मला जाणवतच होती...कशाचाही विचार न करता, वेळेचे भान न ठेवता. मी भेटले त्याला फक्त मनाला समाधान मिळविण्यासाठी..का माहित नाही पावसाचा आनंद तर होताच पण तो, त्याच्यासोबत अनुभवायचा होता...तो भेटला खरा पण तो मंद छत्री घेऊन आला होता...म्हणे मला नाही आवडत पावसात भिजायला..तुला आवडतं ना तु भिज...रागाने मी त्याला म्हणाले जा मग घरी, मी एकटीच भिजेन...तो येडा परत जायला पण निघाला आणि मला म्हणे "as u wish" जातो मी... थोडे अंतर गेल्यासारखे केले मग "ए नौटंकी" चल ना असं मीच म्हणाले. खरं तर त्याला जास्त भाव खायची सवयच लागली आहे. सुरुवात तर अशीच झाली आमच्या भेटीची. मग तो छत्री घेऊन चालत होता आणि मी त्याच्या सहवासासोबत पावसाचा आनंद घेत होते. काही लोक तर आमच्याकडे पाहून हसत होते. पण जगातलं सगळ्यात मोठं सुख ज्याला म्हणता येईल ते मी अनुभवत होते , ...तेवढ्या वेळासाठी मी सगळं काही विसरले होते...त्याचं बोलणं ऐकण्यात रमलेली मी... तो वेड्यासारखंच काहीतरी बडबडतच असतो...त्याच्याकडून एका गाण्याची अपेक्षा होती पण बोलण्याच्या नादात ती अर्धवटच राहिली. घर, मित्र -मैत्रिण आणि वेळ याचं काही मला भानच नाही राहिले ...पण मनात भरपूर काही चलबिचल चालली होती जी मला यापूर्वी कधीच जाणवली नाही, काय होतयं? काय पाहिजे काहीच कळत नव्हते...माझ्या जवळचे सगळे शब्द त्याच्या सोबतीने नि:शब्द झाले होते. खरंच या वर्षीचा पावसाळा म्हणजे अमेंझिग आहे...माझ्या जगण्याला आणि एक नवीन अर्थ देणारा ...सगळ्यांना पण असाच आनंद देणारा हा पावसाळा असावा.