Thursday, October 21, 2010

मराठी साहित्य संमेलनाचा बट्ट्याबोळ...

जर आपल्याला भारतातील राज्यपद्धतीत बदल करायचा असेल, तर नागरिकांना आपली मानसिकता बदलावी लागेल. छोट्या-मोठ्या कारणांसाठी राजकीय नेत्यांची व अन्य वरिष्ठ मंडळींची चमचेगिरी बंद केली पाहिजे. शाळेच्या कार्यक्रमापासून साहित्य परिषदेपर्यंत सगळीकडे राजकीय नेत्यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावण्याची खरच गरज आहे का? प्रगत देशात अशा कार्यक्रमात लेखक, कवी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येते. विशेषत: शिक्षणतज्ज्ञ व प्राध्यापक यांना खूपच मान असतो. आपण राजकीय लोक भ्रष्टाचारी आहेत असे म्हणतो व त्यांच्याकडे सारखी धाव घेऊन त्यांची किंमत वाढवितो*. हे संदीप वासलेकरांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकातील मत अत्यंत योग्य आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला कोणत्याही राजकीय नेत्याला आमंत्रित न करता एखाद्या उद्योजकाच्या वा शास्त्रज्ञाच्या हस्ते उदघाटन करण्याचा मराठी साहित्य मंडळाचा विचार स्तुत्यच म्हणावा लागेल. प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांना हा मान मिळाला देखील. परंतु कुठे कशी माशी शिंकली माहित नाही, गायकवाडांनी पैसे देऊन उदघाटकाचा मान पटकाविला असे आरोप होऊ लागले. या आरोपाने व्यथित झालेल्या संजय गायकवाडांनी उदघाटन करण्यास नकार दिला. एका चांगल्या उपक्रमाची कशी विल्हेवाट लागू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

वासलेकरांनी परदेशात पाहिलेली उदाहरणे आपल्या देशात प्रत्यक्षात कधी उतरतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


एका दिशेचा शोध- लेखक संदीप वासलेकर
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे.
वर्ष- २०१०

1 comment:

  1. saahitya sammelanala 2 mahinyaancha avkash aahe tar ha ghol, ajun pudhe kay hoil kay mahit. khartar navin sahitya nirman hoat aahe ka haa prashna nirman hoto. Waslekaransarkha aantar rashtriy darjacha manus aapalya deshachi hi sthiti paahun vyathit hoat asel.

    ReplyDelete