Tuesday, October 26, 2010

सुट्टे पैसे मागणारा पंतप्रधान

जगाच्या राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्त्व ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आपल्या अरेरावी स्वभावामुळे प्रसिद्ध होते. इराकच्या युद्धात त्यांनी अमेरिकेल साथ दिल्यामुळे सत्तेतील लेबर पक्षाच्या मंत्रीमंडळातील व संसदेतील सदस्यांनी त्यांना याबाबतीत खडसावले आणि सक्तीची निवृत्ती जाहीर करण्यास भाग पाडले. ज्या दिवशी ते पदच्युत झाले, त्या दिवशी ते रेल्वेस्थानकावर सहपरिवार गेले ब साध्या रेलगाडीने इतर प्रवाशांबरोबर रांगेत उभे राहून आपल्या घरी परतले. एकदा ते हिथ्रो विमानतळावर रेल्वेने जात होते, तेव्हा त्यांच्याकडे तिकीटासाठी सुट्टे पैसे नव्हते. सोबत असलेल्या प्रवाशांनी त्यांना तिकीटासाठी थोडे पैसे दिले. त्यामुळेच ते हिथ्रो विमानतळावर पोहोचू शकले.

एका दिशेचा शोध लेखक-संदीप वासलेकर राजहंस प्रकाशन, पुणे.

एक माजी पंतप्रधान इतक्या साधेपणाने जीवन जगतो, याचेच आपल्याला आश्चर्य वाटते. पण भारत वगळता अनेक देशांमधील राजकीय पुढारी किती साधेपणाने राहतात, याची अनेक उदाहरणे संदीप वासलेकर यांनी “एका दिशेचा शोध” या पुस्तकात दिले आहेत. ही उदाहरणे वाचत असताना मनात प्रश्न येतो की आपल्या भारतात हे शक्य आहे का? किंबहुना भारतात या सारखी काही उदाहरणे घडून गेली आहेत. पूर्वोत्तर राज्यातील एका राज्याचा मंत्री १०० रु पगार घेत असे. मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे हे ‘बेस्ट’ने प्रवास करीत असत तर माजी केंद्रीय रेल्वेमंत्री राम नाईक मुंबईत लोकलने प्रवास करीत. ही झाली काही वर्षांपूर्वीची उदाहरणे. अलीकडे मात्र साधा सायकल वापरणारा कार्यकर्ता, नगरसेवक झाल्यानंतर मात्र मोटरसायकल वा मारुती८०० न वापरता थेट स्कोडाच वापरतो. आणि सर्वसामान्यांच्या मनात पण काहीशी अशीच प्रतिमा तयार झाली आहे.

गळ्यात चार-पाच तोळ्याची चेन असलेला, एका हातात १० तोळ्याचे ब्रेसलेट तर दुसऱ्या हातात स्विस घड्याळ असलेला ‘शोमॅन’ आपल्याला अस्सल नेता वाटतो. हे आपल्या बदलत्या सामाजिक- आर्थिक- मानसिकतेचे चित्रण आहे. वासलेकरांनी दिलेली उदाहरणे म्हणूनच उदबोधक ठरतात.

Thursday, October 21, 2010

मराठी साहित्य संमेलनाचा बट्ट्याबोळ...

जर आपल्याला भारतातील राज्यपद्धतीत बदल करायचा असेल, तर नागरिकांना आपली मानसिकता बदलावी लागेल. छोट्या-मोठ्या कारणांसाठी राजकीय नेत्यांची व अन्य वरिष्ठ मंडळींची चमचेगिरी बंद केली पाहिजे. शाळेच्या कार्यक्रमापासून साहित्य परिषदेपर्यंत सगळीकडे राजकीय नेत्यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलावण्याची खरच गरज आहे का? प्रगत देशात अशा कार्यक्रमात लेखक, कवी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येते. विशेषत: शिक्षणतज्ज्ञ व प्राध्यापक यांना खूपच मान असतो. आपण राजकीय लोक भ्रष्टाचारी आहेत असे म्हणतो व त्यांच्याकडे सारखी धाव घेऊन त्यांची किंमत वाढवितो*. हे संदीप वासलेकरांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकातील मत अत्यंत योग्य आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला कोणत्याही राजकीय नेत्याला आमंत्रित न करता एखाद्या उद्योजकाच्या वा शास्त्रज्ञाच्या हस्ते उदघाटन करण्याचा मराठी साहित्य मंडळाचा विचार स्तुत्यच म्हणावा लागेल. प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांना हा मान मिळाला देखील. परंतु कुठे कशी माशी शिंकली माहित नाही, गायकवाडांनी पैसे देऊन उदघाटकाचा मान पटकाविला असे आरोप होऊ लागले. या आरोपाने व्यथित झालेल्या संजय गायकवाडांनी उदघाटन करण्यास नकार दिला. एका चांगल्या उपक्रमाची कशी विल्हेवाट लागू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

वासलेकरांनी परदेशात पाहिलेली उदाहरणे आपल्या देशात प्रत्यक्षात कधी उतरतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


एका दिशेचा शोध- लेखक संदीप वासलेकर
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे.
वर्ष- २०१०

मला आवडलेले पुस्तक

माझ्या स्विस मित्रावर एका महिलेला झुरिक विमानतळावरुन घेऊन ट्रेनने राजधानी बर्न येथे आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तिच्याकडे - बॅगा होत्या. स्त्रीदाक्षिण्य म्हणून मित्राने दोन बॅगा उचलल्या. नंतर दोघेही ट्रेनच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात चढले. तिने दाराजवळ असलेली रिकामी पण आरक्षित असलेली जागा पकडली. माझा मित्र त्या गर्दीत कसाबसा उभा राहिला. थोड्या वेळाने तिकीट निरीक्षक आला त्याने या महिलेला सांगितले की, “ही अपंग लोकांसाठी आरक्षित जागा आहे, येथे तुम्ही बसणे चूक आहे. तिने ताबडतोब माफी मागितली ती गर्दीत उभी राहिली. ही महिला डब्यातील सर्वच प्रवाशांच्या परिचयाची होती. तिचे नाव मिशेलिन काल्मी रे. स्वित्झर्लंड्ची तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सध्याची परराष्ट्रमंत्री. भारतात जसे सध्या सोनिया गांधी, पाकिस्तानात पूर्वी बेनझीर भुत्तो फार पूर्वी इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर यांचे प्रस्थ होते तसेच मिशेलिन काल्मी रे यांचे स्वित्झर्लंडमध्ये स्थान आहे. या अशा अनेक घटना ज्या पुस्तकातून आपल्यासमोर येतात आपल्याला अंतर्मुख करतात ते पुस्तक म्हणजेएका दिशेचा शोध’.
या पुस्तकामध्ये आंतराष्ट्रीय घडामोडींचे भाष्यकार विश्लेषक संदीप वासलेकर यांनी आपले विचार अतिशय उत्तमरित्या मांडले आहेत. संदीप वासलेकर यांनी भेटी दिलेल्या देशांमध्ये त्यांना आलेले अनुभव तिथल्या राजकीय नेत्यांनी त्यांच्या देशातील लोकांसाठी केलेल्या सुधारणा सांगितल्या आहेत. त्या पासून आपल्या राजकीय नेत्यांनी काही शिकायला पाहिजे. जग चौथ्या औद्योगिक क्रांतीला सुरूवात करत असताना आपल्या देशामध्ये, आपल्या नवीन पिढीसाठी, आपल्या शिक्षण पद्धतीत आपण काय बदल केले पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या संधीचा फायदा आपल्या युवकांनी कसा घेतला पाहिजे याची माहिती दिली आहे. त्यांच्या दहशदवाद्यांशी झालेल्या भेटी, अनोळखी ठिकाणी त्यांच्यासमवेत काढलेल्या मध्यरात्री, त्यांच्या गोळ्या कधी वेध घेतील याचा नेम नसतानाही त्यांना हिंसाचारापासून परावृत्त करण्यासाठी केलेली धडपड, काही प्रमाणात त्याला आलेले यश असे बरेच काही अनुभव त्यातून मिळालेले निष्कर्ष आपल्यासमोर ठेवले आहेत. येत्या पाच- सहा दशकांत येणारे धोके नवनिर्मितीची संधी या दोन्ही आव्हानांसाठी आपला समाज कसा तयार होईल या गंभीर विषयावर या पुस्तकात चर्चा केली आहे. प्रत्येक भारतीयाने विशेषत: मराठी तरुणाने हे पुस्तक संग्रही ठेवावे.

Wednesday, October 20, 2010

मुंबईतील नव- माध्यमे आणि किशोरवयीन मुले

गेल्या काही दशकांत मानवी जीवनात यंत्रांचा वापर खूप वाढलेला आपल्याला दिसतो. यात माहिती आणि मनोरंजनासाठीची यंत्रे खूपच वाढली आहेत. विशेषत: गेल्या दोन दशकात यांचे प्रमाण जाणवण्याइतपत वाढ झाली आहे. एकूणच मानवी जीवन तंत्रज्ञानाभिमुख झाले आहे. किशोरवयीन मुले आणि मुंबईतील नव- माध्यमे हा विषय संशोधकाने संशोधनासाठी निवडण्याचे प्रयोजन असे की, सद्यसमाज तंत्रज्ञानाभिमुख होत चालला आहे. व्यक्तीच्या आयुष्यात यांत्रिक वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व आल्याचे निदर्शनास येते. उदाहरणार्थ मोबाईल फोन,संगणक .

आपल्या दैनंदिन जीवनाचा अपरिहार्य भाग म्हणजे माध्यम ही माध्यमे मानवी इतिहासातील एक अद्ययावत फारच नजीकच्या काळातील क्रांतीकारक घटना असून विश्वातले भौगोलिक अंतर कमी करून, जग परस्परांच्या अगदी जवळ आणून सोडणारी क्रांती या नव-माध्यमांमुळे आणि त्यामागील तंत्रज्ञानामुळे घडून आलेली आहे. नजीकच्याच काळात या क्षेत्रात आलेल्या डिजीटल तंत्रज्ञानामुळे तर याहून अभूतपूर्व असे नवेच जग निर्माण होत आहे. असंख्य प्रकारची संकेतस्थळे आणि वेगवेगळ्या सोशल नेटवर्कींग साईट (सामाजिक वैश्विक जाळे) या सर्व संमिश्र माध्यमातून उद्भवणारी परिस्थिती हे आजचे तंत्रज्ञान आपल्याला लवकरच मागास वाटावे एवढे बदल घडवणार आहेत. माध्यमांच्या युगाकडून आपण विशेषीकृत उपयोगाच्या अशा नव-माध्यमाकडे चाललो आहोत.

दूरदर्शन संच, इंटरनेट आणि मुले :

आपण घरामध्ये टीव्ही पाहताना ठराविक गोष्टी पाहाव्यात, काही गोष्टी पाहू नयेत असे काही अलिखित नियमच असतात. तो संकेत बऱ्याच घरांत पाळला जातो; पण टीव्हीवरील कार्यक्रम पाहण्यावर ८० टक्के नियंत्रण असताना संगणकाबाबत मात्र ते पाच टक्के देखील नाही. मुलं संगणकावर काय करतात आणि पालकांचा त्यावर किती अंकुश आहे, याबाबत झालेल्या पाहणीनुसार संशोधकास असे वाटते की, ८५ टक्के पालक हे मुलांशी तोंडी करार करतात. म्हणजे वाईट गोष्टी बघू नयेत, त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होतो अशा गोष्टी जर तु पाहिल्यास तर मी तुला शिक्षा करीन वगैरे, मुलंही पालकांना कबुलीजबाब देतात. वास्तविक जगातील ७० टक्के मुले संगणकावर सर्फिंग आणि चॅटिंग करण्यात आपला वेळ घालवतात, हे उघड झालं आहे. यामध्ये १२ ते १८ या वयोगटातील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. इंटरनेटवरून ५५ टक्के चॅटिंग केलं जातं, ५० टक्के संगीत, गाणी डाऊनलोड होतात.

दूरदर्शन संच,इंटरनेट आणि पालक :

संशोधकाच्या उपरोक्त मतानुसार मुलांचे पालक हे दूरदर्शन संचावर आपला वचक दाखवतात कारण, त्यांना या तंत्रज्ञानाविषयी माहिती असते त्यामुळे ते दूरदर्शन संचावर मुलांनी काय पाहावे काय नाही याविषयक दबाव आणू शकतात, नियंत्रण ठेवू शकतात परंतु संशोधकाने केलेल्या पाहणीनुसार ,पालक दूरदर्शन संचाविषयी परिचित असल्याने त्यांना माहित असते ,पण संगणकाविषयी जास्त ज्ञान नसल्याने मुले संगणकावर काय करतात त्याची त्यांना कल्पनाही नसते म्हणजे किमान २५% पालकांना संगणकाचे ज्ञान आहे तर ६५% पालक संगणक विश्वाशी परिचित नाही. त्यामुळे असे म्हणता येईल की आताची पिढीच डिजिटल युगातली असल्यामुळे ही पिढी जितक्या आत्मविश्वासानं संगणक हाताळते, तितका त्यांचा पालक वर्ग हाताळू शकत नाही. कारण त्यांच्या लहानपणी इंटरनेट हा प्रकारच मुळी अस्तित्वात नव्हता.त्यामुळे मुले संगणकावर काय करतात याबाबत त्यांना काहीही माहिती नाही असे संशोधनकर्त्यास आपल्या संशोधनातून जाणवले आहे.

इंटरनेटने प्रचंड प्रगती केली आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सर्व किशोरवयीन मुलांना माहीत आहे . आताची मुलं डिजिटल वातावरणातच वाढतात. शाळेपासूनच त्यांना संगणकाची ओळख होते त्यामुळे संगणक ही यशाची गुरुकिल्ली समजली जाते, याची १२ ते १६ वयोगट असणाऱ्या मुलांच्या जवळपास प्रत्येक घर आज या डिजिटल युगाशी जोडलं गेलं आहे. उच्च वर्गातील बहुतांश घरांत संगणक असतोच आणि मध्यम वर्गातील ज्यांच्या घरात संगणक नाही वा इंटरनेट उपलब्ध नाही, अशी मुले सायबर कॅफेमध्ये जाऊन संगणक युगाशी स्वतःला जोडतात. आताची पिढीच डिजिटल युगातली असल्यामुळे ही पिढी जितक्या आत्मविश्वासानं संगणक हाताळते, तितका त्यांचा पालक वर्ग हाताळू शकत नाही. कारण त्यांच्या लहानपणी इंटरनेट हा प्रकारच मुळी अस्तित्वात नव्हता. त्यामुळेच आपली मुलं संगणक खूप छान वापरतात, हे पालकांना माहीत असतं. आता इंटरनेट मुळे सोशल साईट्स वापरण्याचा प्रभाव पण या किशोरवयीन मुलांवर पडला आहे. मग ही मुले उच्च वर्गातील असो वा मध्यम वर्गातील सोशल साईट्सचा काही प्रमाणात वापर करतात. संशोधकाने केलेल्या संशोधनावरून, उच्च वर्गातील मराठी आणि इंग्रजी माध्यम हे मध्यम वर्गाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत अधिक प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात कारण,उच्च वर्गातील मुलांना घरीच इंटरनेट वापरता येत असल्याने त्यांचे प्रमाण जास्त आहे तर मध्यम वर्गातील मुलांच्या घरी संगणकच नसल्याने इंटरनेटचा वापर होतच नाही त्यांना शाळेमध्ये इंटरनेटची तोंड ओळख होते आणि सायबर कॅफे मध्ये जाऊन ते इंटरनेट हाताळतात.

भविष्यातील मानसिकता

महागड्या ट्यूशन्स,अनिवासी भारतीयांसाठी बनवलेले सिनेमे, मोठे झाल्यावर पैशाच्या मागे लागण्याची प्रवृत्ती, श्रीमंत वधू अथवा वर संशोधन हे संस्कार आतापासूनच जर मुलावर झाले, तर भविष्यातील मानसिकता संकुचीत राहणार नाही. आपण आणि आपल्या समाजने खऱ्या अर्थाने सर्वागीण प्रगती केली पाहिजे, असे जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर प्रथम अस्मिता म्हणजे काय? संस्कार म्हणजे काय? प्रगती म्हणजे काय? अशा विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे.
पैसा हा एक अदभुत प्रकार आहे. आपण त्याच्यामागे धावलो तर पैसा आपल्यापुढे काही अंतर ठेवून धावतो. सत्तेचेही तसेच आहे आपण सत्तेमागे धावलो तर सत्ता फक्त दुरुन दिसते.आपल्या हाती येत नाही.यासाठी आपल्याला सामाजिक हितासाठी पोषक असलेल्या अनेक उदाहरणाचेही अनुकरण करावे लागेल.

आंधळी कोशिंबीर

आंधळी कोशिंबीर जेव्हा वैयक्तीक पातळीवरुन जागतिक स्तरावर पोचते आणि एक राष्ट्र दुसऱ्यावर कुरघोडी करु पाहते तेव्हा या खेळाचे भयंकर आणि धोकादायक स्वरुप महासत्तेच्या लालसेतून दिसून येते. जगातील संपन्न समजले जाणारे देश ,म्हणजे जर्मनी,स्वित्झर्लंड, जपान, कॅनडा हे महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत नाहीत.अमेरिका रशिया चीन यासारखी राष्ट्रे अशी स्वप्ने बघतात पण त्यापैकी जवळपास सर्वच देशांना अंतर्गत समस्यांनी पोखरले आहे. अमेरिकेत दारिद्र्य वैफल्य वाढत आहे. चीनमध्ये गरिबीचे बऱ्यापैकी निर्मूलन झाले आहे. आजवर अनेकांनी महासत्ता होण्याचा प्रयत्न केला.पण जागतिक महासत्तापद भूषवल्यानंतर आजची त्यांची अवस्था काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.