-
माळशेज ते जुन्नर प्रवास
म्हणजे जन्नतच
पावसाळा आला की फिरण्याची ठिकाणे आपली ठरलेली असतात.
लोणावळा, खंडाळा, खोपोली माळशेज लॉंग
ड्राईव्ह, चहा, भज्जी असा बेत तर सगळ्याच तरुणाईचा असतो. आता पावसाळा तर नाही आहे
मग तरी पावसाळ्याचा विषय कशाला ना? खर तरं आज विषय आहे हिवाळ्यात फिरता येतील अशी
ठिकाणे शोधण्याचा.
माळशेज – माळशेज हे पावसाळ्यात फिरण्यासाठीचे ठिकाण असले तरी त्यावेळेस तिकडे
जाणे धोक्याचे असते. पावसाळ्यात जाण्याचं राहून गेलं असेल तर माळशेजचा छान असा अनुभव
हिवाळ्यातही घेता येऊ शकतो. मस्त हिरवाईने नटलेलं माळशेज, हळुवार स्पर्श करणारा
हवेतील गारवा तर मन वेडं करुन टाकतो. मुबंईच्या जवळ आसपास असल्याची जाणीव जरा
देखील होत नाही. डोंगर दऱ्यातून रस्ता काढत घाट रस्ता बघण्याची मज्जा वेगळीच आहे.
मुंबईच्या काही अंतरावर असलेले हे थंड हवेचे ठिकाण म्हटले तरी चालेल. शुद्ध हवा,
मनाला निर्मळ करेल अशी शांतता, मन प्रसन्न होईल असे वातावरण हिवाळ्यात माळशेज
घाटाचे असते.
मुंबई-कल्याण-मुरबाड मार्गे माळशेज जाता येते. सकाळी ७ वाजता मुंबईहून
निघाल्यावर १० पर्यंत मुरबाड पर्यंत पोहोचतो आपण. सकाळचा नाश्ता करण्यासाठी
मुरबाडला एसटी स्टॅन्ड समोर असलेले हॉटेल राम कृष्ण बेस्ट आहे. तुम्ही मिसळ
खाण्याचे हौशी असाल तर मग काय मज्जाच आहे तुमची. हॉटेल राम कृष्णची मिसळ पाव मस्तच
आहे. येथे भरपेट नाश्ता करायला काहीच हरकत नाही.
आता परत तयारी काही अंतरावरच असलेले माळशेज पाहण्याची. माळशेज घाट जसजसा जवळ
येत जातो तसतसा हवेतील गारवा अधिकच जाणवायला लागतो. दोन्ही बाजूला असणारी झाडे,
नागमोडी वळणे, समोर दिसणारे मोठमोठे डोंगर, स्वच्छ निळंशार ढग मन प्रफुल्लित
करतात. माळशेज घाटात पहिले दर्शन होते ते गणपती बाप्पाचे. मूर्ती नाही तर काही
दगडांचा आकारच आहे की तो पूर्ण असा दूरून पाहिल्यावर आपल्याला त्यात गणपतीची प्रतिकृती
दिसते. आजूबाजूला फक्त डोंगर दऱ्या आहेत आणि मध्ये आपण आहोत असा भास होतो. अत्यंत
निसर्गरम्य ठिकाणचा अनुभव आपल्याला हिवाळ्यात मनसोक्त घेता येतो. असे म्हणतात की
या घाटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माअगोदर जिजाऊमाता
माहुलीगडावरुन माळशेजमार्गे शिवनेरीला गेल्याची ऎतिहासिक नोंद आहे. शिवनेरी गडावर
छत्रपती शिवरायांचा जन्म झाला हा गड या घाटामध्येच आहे.
माळशेजमध्ये एक दिवसासाठी येणारे पर्यंटक खूप असतात. त्यांना फ्रेश होण्यासाठी
माळशेच्या जवळच असणारे एमटीडीसीचे हॉटेल. या घाटात असणारे एकमेव एमटीडिसीचे वॉशरुम
म्हटले तरी चालेल.
माळशेजचा प्रवास एवढ्यापुरताच नाही तर खरी गम्मत आणि जन्नत तर पुढे आहे.
माळशेज घाटाचा चढ चढल्यावर आता उतरत्या रस्त्याने उतरायचे आहे. माळशेजच्या पुढे
ओतुरच्या दिशेने जायचं. थोड्या अंतरावर गेल्यावर आपण जन्नतमध्ये आहोत की काय असा
प्रश्न पडतोच. कारण समोर असणारा निसर्ग वेडं लावणारा असतो. पिवळा- हिरवा- दिसणारा
डोंगर परिसर, अथांग पसरलेले निळे निळे वैतरणा धरणाचे पाणी जणू ढग आणि पाणी एकत्रच
आले आहे. क्षितीजाचा भास होतो. त्याच्या शेजारी असणारे छोटे गाव, गावातील काही
भागात हिरवीगार शेती, तर काही ठिकाणी बैल जोड्याने शेतात काम करताना. हा असा
निसर्ग आपल्यापैकी काहीजणांनी फक्त चित्रांमध्येच पहिला असेल. पण असं खरंच या
ठिकाणांवर पाहायला मिळते. मन तृप्त करणारी जागा म्हणजे जन्नतच म्हणावी. डोळ्यात
किती हा निसर्ग भरावा असं मनाला सारखं वाटतच राहते. दूर कुठेतरी एकटं जावं असं
वाटणाऱ्यांनी तर नक्की या ठिकाणी एक लॉंग ड्राईव्ह करावा. मनाच्या कोपऱ्याला
स्पर्श करणारा गारवा आणि हा निसर्ग पाहता पाहता कधी संध्याकाळ होईल ते कळणारच
नाही.

आता घरी जायची घाई नको. भूक लागली असणारच ना, तर अजून पुढे जुन्नर पर्यंत येऊन
जुन्नरची प्रसिद्ध मिसळ आपण खाणार नाही असं होणारचं नाही. डी. पी खत्री यांची मिसळ आणि डी.पी खत्री कंदी
पेढा जुन्नर मध्ये प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकात, समोरच
खत्रींचे हॉटेल आहे. अगदी छोटीशी जागा आहे पण येथे मिळणारी मिसळ ला-जवाब, तर्री
असलेली लाल भडक मिसळ तुम्ही कधीच खाल्ली नसेल. अफलातून असलेला कंदी पेढा. तिखट
नंतर गोड झालेच पाहिजे असं काहीसं पेढ्यावर देखील मनसोक्त ताव मारता येईल. या
मिसळची जिभेवर रेंगाळणारी चव तुम्हाला नक्कीच पुन्हा मुंबईहून जुन्नरकडे एकदा लॉंग
ड्राईव्हला घेऊन जाईल. अशा एक दिवसाच्या रिफ्रेश प्रवासानंतर परतीच्या वाटेवर
डोंगर दऱ्यातून सूर्यास्त पाहत पुन्हा मुंबई गाठायचे.