क्षणा-क्षणात बदलणारे आपले मन, आता एक विचार तर नंतर एक विचार,
मनाची घालमेल, मनात येणारा राग, मनात येणारे प्रेम, मनात येणारी प्रत्येक भावना
नक्की येते तरी कुठून असा प्रश्न मला नेहमी पडायचा. आपलं असं का होतं आपलं मन
आपल्या ताब्यात नाही का? मन धावेल त्या दिशेने धावायचं आणि आयुष्य जगायचं अशी
आपल्या सवयच झालेली असते. फुलपाखराने जसं मनसोक्त अलगतच विहारावं तसचं आपलं मन
चांगल्या – वाईट अनुभवाच्या विचारामध्ये अगदी अलगतच मनसोक्त विहरत असतं. मग कधी
आपण खूप आनंदी असतो तर कधी आपण खूप दुःखी. मनाच्या या दोन अवस्थामध्ये आपण जगत
असतो. आपल्याला लहानपनापासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा आपण शिकत असतोच.
कसं जगायचं, कसं वागायचं? कुणी सांगेल का मला. असा नेमका प्रश्न हा प्रत्येकाच्या
मनात डोकावत असतोच याचं नेमकं उत्तर कोणाकडेच
आपल्याला मिळत नाही. स्वतःच्या मनाचा शोध घेणारा मार्ग आपल्याला एका साधनेतून
मिळतो आणि ती साधना म्हणजे ‘विपश्यना’.
जगण्याची
कला शिकवणारी विपश्यना साधना. “विपश्यना” हा शब्द जरी आपण ऐकून असलो तरी नेमकं
यामध्ये असतं काय हे फार कमी लोकांना माहित असतं. भगवान बुध्दांनी सुमारे २५००
वर्षापूर्वी विपश्यना साधनाचे पुन:संशोधन
केले. ही एक प्राचीन आध्यात्मिक विद्या आहे. जगण्याची कला म्हणजे आयुष्यात येणारे
सुख-दुःख आणि त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दॄष्टीकोन सकारात्मक असला की आयुष्य
जगण्याचा आनंद आपल्याला घेता येतो. सकारात्मक दृष्टीकोन मिळतो ते स्वतःच्या अंत:रंगात
डोकावल्यावर. जन्मापासून आपण डोळे उघडे ठेवून जे आपल्या दिसेल ते पाहत असतो. नेहमीच
आपण बाह्य:जगाच्या सान्निध्यात असतो. अनुभवाने आपण सगळ्यांना समजण्याचा आणि समजून
घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हेच आपण स्वतः बद्दल करत नाही. आपलं शरीर- आपलं मन काय
करतयं, मनाची अवस्था, मनाची तगमग, आपल्याला विपश्यना मार्गातून जाणून घेता येतात.
‘विपश्यना’
म्हणजे आहे तरी काय ? दहा दिवस सगळ्या सुखसोयी पासून दूर, कुटुंबापासून लांब,
स्मार्ट जगापासून दूर, मौन व्रत, साधी राहणीमान,
ऐकायला जरा अवघड आहे पण दहा दिवस फक्त स्वतःच्या सान्निध्यात राहायचं.
प्रत्येकानं असा अनुभव आताच्या धावपळीच्या जगात घेतलाच पाहिजे. काही दिवसांपूर्वी
नवीन वर्षाची सुरवात काहीतरी नव्याने करावी असे माझ्या मनात आले आणि आपण यंदा
विपश्यनेला जाऊयात असं ठरवलं. स्वतः घेतलेला अनुभव हा विपश्यना बद्दल वाचण्यात
आलेल्या अनुभवापेक्षा कितीतरी पटीने चांगला होता. स्वतःला नव्याने भेटल्याचा माझा
अनुभव, गंज चढलेल्या एखाद्या वस्तूला पुन्हा लकाकी यावी तसं काहीसं आपल्या
व्यक्तीमत्वाचं होतं. आपल्या मनाची वृत्ती बदलण्याचं कार्य जणू काही या
विपश्यनेतून होतं. स्वतःतील बदल हे आपल्याला तर जाणवतातच पण आपल्या आजूबाजूला
असणाऱ्या लोकांकडूनही या बदलाला प्रतिक्रिया येऊ लागतात.
आपल्या
मनात येणारे चांगले वाईट विचार म्हणजे ते आपल्या मनाचे रोग असतात आणि हे मनाचे रोग
बरे करण्यासाठी ’विपश्यना’ या साधनेची मदत होते. मनातील अशांतता, दुखः, अस्वस्थता,
द्वेष, प्रेम, वासना या गोष्टी आपल्याला कधीकधी त्रास देत असतात. पण याच गोष्टी जर
निर्मळ झाल्या तर आयुष्य जगायला सोपं होईल. प्रत्येक विकाराकडे पाहण्याचा दॄष्टीकोन
म्हणजे आपण भोगण्याच्या भावनेने पाहत असतो आणि त्यातून आपल्याला त्रास होतो. पण या
विकारांकडे आपण दॄष्टा भाव म्हणजे फक्त पाहण्याच्या भावनेने पाहिले तर आपण
समानतेच्या भावनेत असतो ज्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. या गोष्टी सांगताना
आपल्याला आपल्याच शरीरामध्ये होणाऱ्या बदलावर लक्ष ठेवायला सांगतात. आपल्या
डोक्यापासून पायापर्यंत क्षणात होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांचे आपण निरिक्षण केले
की आपल्या लक्षात येते की सर्व काही क्षणीक आहे, अनित्य आहे, अनिश्चित आहे. होणाऱ्या
लहान मोठ्या बदलांकडे समता भावनेने पाहण्याचा दॄष्टीकोण विपश्यना मध्ये शिकवला
जातो. उदा. माझ्या डोक्यामध्ये विचारांमुळे मुग्यां आल्यासारखे होत आहे. या
गोष्टीचे आपण फक्त निरिक्षण करायचे आहे त्याच्याप्रती मनात राग किंवा प्रेम
निर्माण नाही करायचे. अशा पूर्ण शरीरात होणाऱ्या कोणत्याही बदलाविषयी मनात कोणतीच
नवी भावना निर्माण होऊ द्यायची नाही. हे शरीरात होणारे चांगल्या- वाईट बदल क्षणीक
असल्याचे आपल्याला समजू लागते आणि आपला त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोणही हळूहळू
बदलू लागतो. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. येणारा आनंद जसा क्षणीक आहे तसेच दुखःही
क्षणीकच आहे. फरक इतकाच की आनंद असेल तेव्हा आपण तो व्यक्त करतो खूपच आनंदी असतो.
आणि जेव्हा दुखः असते तेव्हा आपण खूपच दुःखी होतो आणि मनाच्या विकारांना बळी पडतो.
स्वतःच्या अंतर्मनात होणारे बदल जसे अनित्य असतात तसेच आयुष्यात येणारे चांगले
वाईट क्षण अनित्य असतात फक्त त्याच्याकडे आपण समता भावनेने पाहिले पाहिजे. हे
नेमकं आपल्याला ‘विपश्यना’ मध्ये शिकवले जाते.
दहा
दिवसामध्ये स्वतःचा अहंकार, मी, माझे या सगळ्यातून हळू हळू आपण मुक्त होतो. काही
गुणांचा स्विकार केला की मुक्तीपर्यंत पोहोचतो. हे गुण म्हणजे नैष्र्कम्य- जसे आहेतसे सुखसोयीचा स्विकार
करणे, त्यागाची भावना मनात रुजली जावी. यासाठी दहा दिवस आपल्याला साधकासारखे राहवे
लागते. शील – आपले शील भंग होईल असे काही बोलायचे नाही त्यासाठीच येथे दहा
दिवस मौन व्रत असते. प्रयत्न – चांगला आणि सम्यक प्रयत्न मुक्तीमार्गाकडे
घेऊन जातो. प्रज्ञा – प्रत्यक्ष ज्ञान ज्या गोष्टीतून मिळते म्हणजे
स्व-अनुभवाने अनित्य, दुःख, राग, द्वेश, आत्मनिरिक्षण आपण दहा दिवसात प्रत्यक्षपणे
करित असतो. सहिष्णुता – इतरांबद्दल मनात प्रेम आणि करुणा निर्माण करायची
दहा दिवस समूहात राहत असताना चिडचीड न करता त्याला समजून घ्यावे. सत्य-
यशाच्या मार्गावर चाललेले प्रत्येक पाऊल सत्यावर आधारित असले पाहिजे. अधिष्ठान-
अधिष्ठान म्हणजे दृढसंकल्प. जेव्हा कोणी विपश्यना शिबिरात जातो तेव्हा दृढ संकल्प
करतो की शिबिर पूर्ण करेल मध्येच सोडणार नाही. पंचशीलांचे पालन करण्याचा दॄढ
संकल्प, आर्य मौन, अनुशासनात राहण्याचा संकल्प करतो. मैत्री- मैत्रीचा अर्थ
शुद्ध आणि निःस्वार्थ प्रेम, इतरांच्या सुखाची कामना करायची. उपेक्षा-
संवेदनांचा अनुभव करीत असताना तटस्थ राहतो. जेव्हा आपल्या शरीरात सूक्ष्म आणि
प्रिय संवेदनांची अनुभूती होते तेव्हाही आपण तटस्थ राहतो. आयुष्याच्या प्रत्येक
स्थितीत तो जाणतो की त्या क्षणाचा अनुभव अनित्य आहे जसा हा उत्पन्न झाला आहे तसा
नष्ट होणार. अनुभव घेऊन तटस्थ राहतो उपेक्षा भाव आपण जगतो. दान – दान ही
भावना अहंकार निर्माण करीत नाही. दुसऱ्यांना कोणत्याही रुपाने का होईना मदत
करण्याची चेतना जागृत येथे होते. स्व-अनुभवाने समजायला लागतो की इतरांची सर्वात
मोठी मदत तीच असते जी त्याला दुःख मुक्त करते.
अशा
दहा गुणांचा स्विकार दहा दिवसाच्या शिबिरामध्ये केला जातो आणि आपण आपल्या
व्यक्तिमत्वात बदल घडवित असतो. हे दहा गुण सगळ्यांनाच माहित असतात पण त्यांना
स्वतःमध्ये विकसित करण्याची सुसंधी विपश्यना साधनेतून प्राप्त होते. जेव्हा या दहा
गुणांचा मनापासून स्विकार करुन आपल्यात बदल घडतो तेव्हा आपण स्वतःला नव्याने भेटू
लागतो.
विपश्यना
साधना – दहा दिवसाचे शिबिर हे मोफत असते. कोणत्याही जातीचे, धर्माचे, समाजचे, या
साधनेचा फायदा घेऊ शकतात. गरोदरपणाच्या काळात देखील या साधनेचा लाभ घेता येतो,
आचार्य श्री. सत्यनारायणजी गोयंका यांच्या प्रवचनाने दहा दिवस आपल्याला विपश्यना
ही साधना शिकवली जाते.
मुंबईतील
काही विपश्यना साधना केंद्र –
धम्मविपुल
विपश्यना केंद्र – सयाजी ऊ बा खिन मेमोरियल ट्रस्ट, पारासिक हिल, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई- ४०० ६१४
धम्मपतन
– गोराई खाडी, एस्सल वर्ल्डजवळ, बोरीवली- पश्चिम मुंबई- ४०० ०९१
Great...Amazzing!
ReplyDelete