Tuesday, July 2, 2013

वकिलांच्या उ - ज्वल भविष्याचे उज्ज्वल निकम...



उज्ज्वल निकम पुरस्कार स्वीकारताना  
गेल्या रविवारी म्हणजे ५ मे २०१३ ला कल्याणला जाण्याचा योग आला... खरं निमित्त होतं  मिडियातील एका मित्राच्या वेबसाईटचं उदघाटन... पण कार्यक्रम होता कल्याण डोबिंवली महापालिकेतर्फे  सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या भव्य  नागरी सत्काराचा . महापौर वैजयंती गुर्जर- घोलप यांनी हा जाहिर सत्कार समारंभ आयोजित केला होता. 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट असो, खैरलांजी प्रकरण असो वा कसाबचा खटला असो या सगळ्या खटल्यांत आपल्या वाकचातुर्याने, प्रभावीपणे बाजू मांडण्याच्या  कार्यशैलीमुळे सर्व दोषीना शिक्षेपर्यत पोहचविल्याची उज्ज्वल निकम यांची  कामगिरी आपण सर्वांना परिचित आहेच. 
सदर कार्यक्रमाला कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजयंती गुर्जर-घोलप, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर, प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे, स्थायी समिती सभापती प्रकाश पेणकर, सभागृह नेते रवी पाटील, महिला बाल-कल्याण समिती सभापती वैशाली दरेकर-राणे आणि स्थानिक नगरसेविका उषा वाळंज आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते... या सगळ्यांना ऐकण्याची आणि भेटण्याची माझी पहिलीच वेळ... 

प्रचंड इच्छा होती ती उज्ज्वल निकम यांना ऐकण्याची.... तशी त्यांची आणि माझी भेट आधी ही झाली होती, मी आयबीएन लोकमत मध्ये असताना...एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उज्ज्वल निकम आले होते... एक पत्रकार म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती... परंतु तो कार्यक्रम संगीतावर आधारित असल्याने त्यांच्याशी त्याव्यतिरिक्त संवाद साधता आला नाही.  पण आज तो योग साधता येणार होता... मात्र आज माझी भूमिका वेगळी होती... निव्वळ एक पत्रकारच नव्हे तर एक उद्योजिका या नात्याने मी त्यांना भेटू शकणार होते.... उज्ज्वल सरांना ऐकण्याची त्यावेळची  अपुरी राहिलेली इच्छा आज पूर्ण होणार याचा आनंद होता. 

कसाबला फाशी झाली? कधी, कशी, कुठे... मग त्याला अटक झाल्यावर नक्की काय झाले त्याच्याबाबतचे अनेक प्रश्न जसे माझ्या मनात होते तसेच तिथे कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येकाच्या मनात असतील हे नक्कीच... जणू काही उज्ज्वल सरांनी भरभरुन बोलावे त्यांचे सगळे अनुभव आम्हाला सांगावे असेच सगळ्यांनाच वाटत होते... महापौर वैजयंती गुर्जर- घोलप तर उज्ज्वल सरांना म्हणाल्या देखील,  आज तुम्हाला हवा तितका वेळ घ्या... आम्हा सगळ्यांना तुमचं बोलणं, तुमचे अनुभव ऐकायचे आहेत... आणि सुरुवात झाली मंतरलेल्या क्षणांना...उज्ज्वल सरांच्या व्याख्यानाला...

पुरस्कार स्विकारताना पण तो विचार करुनच आपण स्विकारतो... भविष्यात ज्याच्याकडून आपण पुरस्कार स्विकारला त्यांनाच उद्या कोर्टात  भेटायला नको... असा षटकार मारताच संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले...
लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलांना खूपच डाउन मार्केट... असं म्हणत त्यांनी त्यांना सगळ्य़ात पहीली केलेली कवीता सांगितली बायकोला अनुसरुन केली होती. बराच वेळ बोलून त्यांनी रजा घेतली. त्यांचे अनुभव आम्हाला बरंच काही शिकवून गेले... हा नवा अनुभव आमच्या गाठीशी आल्याने समाधान मिळाले.  


     

Thursday, May 23, 2013

कांदेपोहे

आज असंच सुचलं एका नव्या विषयावर लिहीण्याचं... तसं मी यासंबधी काही लिहीन असं मला स्वतःलाच कधी वाटलं  नव्ह्तं... कारण लग्नाबाबतचा बुळचट विषय मलाच कधी आवडलाच नाही... पण स्वतः कांद्येपोह्याचा अनुभव घेतल्यावर मात्र ... तो अनुभव लिहून ठेवावासा वाटला...

माझं वय सध्या २४ , पहिलं स्थळ पाहिलं ते गेल्यावर्षी तेव्हा मी होती २३ वर्षाची.  तसं म्हणायला गेलं तर हे लग्नाचं वय नाही तरी पण... ते म्हणतात ना!  मुलीचं लग्न योग्य वयातच झालं पाहिजे... तेच हे वय असावं बहुतेक... कारण सध्या माझ्या मित्र- मैत्रिणींच्या लग्नाच्या पत्रिका येत आहेत, कोणी मेसेज करुन लग्नाचं आमंत्रण देतंय तर कोणी फ़ेसबुकवर लग्नपत्रिका टाकून टॅग करत आहेत...  कोणा ना कोणाचं लग्न ठरलंय, साखपुडा झालाय... अशा बातम्या तर रोज ऐकायला मिळ्ताहेत... कोणी जुना मित्र मैत्रिण भेटलं की तोच विषय... काय मग कधी करताय? काय मग तुमचं कधी वाजतंय? शेजारी... त्यांना तर काही कामधंदाच नसतो... बघताय का मग मुलीसाठी स्थळ ? असं घरी येऊन मुद्दाम आई बाबा ला डिवचून जाणार.... हुश्श्श! लग्न लग्न लग्न ... च्यायला सारखं तेच ते... घरात ते बाहेर पण तोच विषय... आपण खरंच एवढं मोठ्ठ झालोय  की आता लग्न केलं पाहिजे... हा नेहमी मला पडलेला  प्रश्न... पण आता बहुतेक मनावर घ्यायला हवं माझ्या लग्नाचं, असं घरच्यांनी ठरवलं... आणि मग सुरु झाला कांदे-पोहे कार्यक्रम...

आतापर्यंत झालेला माझा पहिला आणि शेवटचा कांदे पोहे कार्यक्रम ( मुलगी बघण्याचा कार्यक्रम ) ... अशी लोकं स्थळ आणतात जी मुलीला पण ओळखत नसतात आणि मुलाला पण ओळखत नसतात... पण त्यांचं कौतुक असं करतात की... बस रे बस्स्स... आणि या लोकांचं एक असतं आजच्या या स्वार्थी जगात या लोकांची दोन्ही पक्षाकडून काहीच अपेक्षा नसते...  सारं काही स्वखर्चाने आणि निरपेक्ष वृत्तीने हे लोक करत असतात. यांना पाहिलं की पटतं, लष्कराची भाकरी भाजणे म्हणजे काय... असो, विषयांतर नको.

मला लग्नासाठी मुलगा कसा हवा हा मावशीने मला विचारलेला प्रश्न? (च्यायला असं काही मी ठरवलंच नाही, मुलगा जणू काही मार्केटमध्ये मिळत असल्यासारखाच हा प्रश्न होता... कसा हवा सांगितला की मावशी लगेच आणून देणार... फालतुगिरी नुसती) आता अपेक्षा म्हटलं की तो पांढऱ्या घोड्यावर बसून येणारा राजकुमारासारखा असावा असं वाटायला ही काय फिल्मी लाईफ आहे का? पण काही मुली खरंच स्वप्नाळू असतात. DDLJ मधल्या ‘मेरे ख्वाबों में जो आये... या काजोलने गायलेल्या गाण्याप्रमाणेच काहींची स्वप्न असतात.  मला मात्र कधी अशी स्वप्न सुचलीच नाही...कदाचित माझं प्रेम वेगळं असावं आणि ज्यांच्यावर माझं प्रेम आहे त्यांच्या प्रेमातून इतर गोष्टी सुचल्याच नसाव्यात...  माझं कुटुंब म्हणजे माझं पहिलं प्रेम... आणि  माझा जॉब म्हणजे माझं दुसरं प्रेम... आहे ना अतरंगी... पण खरं सांगू का या दोहोंशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. कदाचित माझं हे प्रेम एका लेखाचा विषय होऊ शकतो.

मुलगा असा हवा, तसा हवा... या मताची मी मुळीच नाही... जशी मी आहे तसाच तोही असावा... मोठ्य़ा पगाराची नोकरी, दिसायला  स्मार्ट वगैरे  अशी माझी मुळीच इच्छा नाही, फक्त मी जशी आहे तशी त्याला आवडावी आणि तो जसा आहे तसा मला आवडावा... फक्त स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची त्याची धडपड असावी... त्याची स्वप्ने ही माझी असावीत आणि माझी स्वप्ने त्याची... मग त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दोघांची एकमेकांना साथ असावी... बस्स्स्स इतकंच नेहमी वाटलं, यापलीकडे जाऊन कधी विचार करायला जमलेच नाही...

माझ्यासाठी पाहिलेलं पहिलं स्थळ... माझ्या मावशीच्या सुनेच्या आईने सुचविलेलं... मी तर त्यांना ओळखतपण नव्हते... पण त्यांनी माझी बरीच माहिती काढली होती मावशीकडून... आणि मावशीची सून  तर माझी मैत्रिणच होती त्यामुळे माझ्याबद्दल बरंच माहित होतं तिला... हा मुलगा माझ्यासाठी बघायचा असं तिनेच सांगितलं... घरच्यांनी सांगितल होतं पण त्यांचं काही मी ऎकलं नाही... मुलगा बघायच्या आधीच नकार देऊन मोकळी झाले होते... मग सगळ्यांचा उत्साह बघून मी पण ठरवलं ठीक आहे ... पाहू या!

आणि मग ठरलं, कांदेपोहे  कार्यक्रम...  लग्नाच्या मार्केटमध्ये जास्त भाव असणारे म्हणजे... इंजिनीयर, डॉक्टर, सरकारी नोकरी करणारा... प्रत्येक आईला आपला जावई इंजिनीयर, डॉक्टरच हवा असतो... तोच प्रकार माझ्या घरी ही झाला.... मुलगा इंजिनियर आहे... चांगला आहे... आणि हो आपल्या गावकडेच त्यांचं गाव आहे... (च्यायला... मी माझ्या गावाला कधी नाही गेले.. आणि तो आपल्या गावाजवळचा आहे म्हणून हे स्थळ आपण बघायचं... तो तरी गेला असेल का कधी त्याच्या गावी ..याचा विचार करुन फक्त हसूच येते.)
कांदेपोहे कार्यक्रम माझ्या मावशीच्या घरीच  घाटकोपरला घ्यायचा ठरला... कारण मुलगा घाटकोपरला राहणारा त्याला यायला जवळ पडेल  म्हणून घरच्याचां हा निर्णय... मुलगा आणि त्याचे आई बाबा असे तीनच जण येणार असं मला कळलं... आमचं घर ठाण्याला ... सकाळपासूनच घरी टिवटिव चालू होती आईची..हे कर ते कर.. साडी घालायची जरा नीट राहा ना ... मी एकदम शांत...  चेहऱ्यावर कसलेच भाव नव्ह्ते त्यामुळे आई अजूनच चिडली... मनाची तयारी नसताना मुलगा बघायला मी तयार झाले होते. तर मुलगा बघायला त्यांच्याकडेच जा त्यांच्या ते ही त्यांच्या सोयीसाठी... ही गोष्टच डोक्यात गेली होती... मुलगा खूप बिझी असतो, त्याला अजिबात वेळ नसतो तरी त्याचे आई बाबा त्याला घेऊन येणार आहेत... ( च्यायला... मी काय रिकामी बसलीये का त्याच्यासाठी, जे त्याला बघायला मी जाऊ ... पुन्हा हा मनात आलेला विचार..) सगळा राग- वैताग करुन पोहोचलो आम्ही मावशीकडॆ... मी माझे आई- बाबा आणि लहान भाऊ.

संध्याकाळी पाच वाजता पाहुणे येणार....  ज्यांनी स्थळ आणलं होतं त्या सुरु झाल्या, मुलाच्या फॅमिलीबद्दल सांगायला... असं तसं बरंच काही... मी बसले होते मोबाईलवर गेम खेळत... मावशीने लगेच प्रश्न करायला सुरवात.. साडी घालणार का? जरा फ्रेश हो जा... कटांळली  आहेस का?... पोहे बनवशील का? तिचे प्रश्न काही केल्या संपतच नव्ह्ते... मी शांत डोक्याने फक्त गेम खेळत बसले तिचे सगळे प्रश्न डोक्यावरुन गेले... पाहुणे येण्याची वेळ जशी जवळ यायला लागली... तशी मग माझ्या मनाची वाट लागली... स्वतःचा राग आला होता खूप... का आपण इतके मोठे झालो... हा फालतुपणा नकोय मला.... बघायचं बिगायचं... आता काय फायदा विचार करुन हा सगळा... तितक्यात माझे दादा( मावशीची मुलं ) मला पिडायला लागले... माझा इंटरव्ह्युव घ्यायला लागले... काय बोलणार तु ? घाबरली आहेस का ? चिडवायला लागले ... जरा मजा मस्ती करुन मग पोहे करायला सांगितले मावशीने ... पोहे करताना हसू आले होते आणि रडू पण आले होते... आपलं काय होणार आता या विचाराने... कसं बसायचं ? कसं बोलायचं? कसं हसायचं?काय सांगायचं? कोणाकडे बघायचं, कसं बघायचं? त्याच्याकडे पाहायचं की नाही? कसा असेल तो? आवडेल का मला तो? न विचार करता पण असे फालतू प्रश्न मला पण पडतच होते... हे विचार मनात आपोआपच यायला लागले... पहिल्यांदा असली बॅण्ड वाजली होती ना... बस्स रे बस्स... अशा पद्धतीचा कार्यक्रम पहिल्यांदाच घरात होत असल्याने घरचे वातावरण अति उत्साही... आणि मी मात्र निरुत्साही!

तितक्यात पाहुणे आले... मावशी सातव्या मजल्यावर राहत होती आणि नेमकी त्या दिवशी लिफ्ट बंद... पाहुणे  खूप थकले होते सात मजले चढून, .मग भाऊ सांगत आला. मुलगा नाही आला त्याचे आई बाबा आलेत... हे ऐकून मला तर खूपच आनंद झाला होता... बरं झालं नाही आला...
मग माझी तयारी झाली... साडी नाही तर एक छानसा ड्रेस घातला होता मी... मेकअप थापलाच नाही जशी आहे तशीच ... बाहेर यायला खरं तर भीती वाटत होती मला पण मी पत्रकार म्हणजे जास्तच ठसकेबाज, हुशार, शूरवीर असल्यासारखे माझे भाऊ मला चिडवत होते.... तु घाबरतेस शीइइइइइ... अगं तु घे त्याच्या आई बांबा चा इंटव्ह्युव्ह... माझी मस्करी, मजा घेत होते...  मावशी ने तोपर्यंत त्यांना पाणी दिले होते... मला चहा आणि पोहे घेऊन जा म्हणाली... मी नाही तु जा मावशी... मी असंच जाऊन बसते ना ... थोडं मावशीला पटवलं पण ती पण ऐकते कसली, पोह्याचं दिलं माझ्याकडे आणि चल माझ्याबरोबर म्हणत घेऊन गेली मला... पाहुणे बसले होते... मुलाचे बाबा खुर्चीत बसले बाजूला माझे काका... आणि मुलाची आई खाली चटईवर भारतीय बैठक मारुन बसल्या होत्या... त्याचे बाबा तर  दिसायला एकदम रुबाबदार,  आई पण मस्त सुंदर आणि सोज्वळ आणि एकदम शांत... मी शांतपणे गेले त्याच्यासमोर, खाली बस असं मला सांगितलं होतं ... पण काकाने  सोफ्यावर बस असं डोळ्यानीच सांगितलं ... त्याचे आई-बाबा माझ्याकडे बघतच होते... तितक्यात पप्पा ने विचारले मुलगा नाही आला का? त्याचे बाबा म्हणाले, आज रविवार ना एक दिवस सुट्टी असते त्याला, त्याला ना फिरायला फार आवडतं... मित्रांबरोबर बाहेर गेलाय त्यामुळे नाही जमले त्याला यायला... ( च्यायला पुन्हा असला राग आला ना... त्याला रविवारी सुट्टी असते फिरायला आवडतं म्हणून फिरायला गेला... मी तर रिकामीच आहे मला तर काहीच आवडत नाही ना? फिरायला गेला म्हणे ) त्याच्या बाबानी मला प्रश्न विचारले
काय शिकली आहेस... माझ्याबद्दल बरंच काही मी बोलले... मी इतकं बोलते हे माझ्या घरचे पहिल्यांदाच बघत होते... आणि मी पण पहिल्यांदाच स्वतःबद्दल एकदम सिरियस होऊन बोलत होते... तसे त्यांना माझ्या क्षेत्राविषयी माहित होतं.. त्यांचं वाचन पण चांगलं असावं असं जाणवलं... मिडियामध्ये त्याचे काही मित्र आहेत असंही ते म्हणाले... आता जरा मला बरे वाटले.. अगदीच फालतू प्रश्न तरी नाही विचारले... त्याची आई फारच शांत .. काहीच बोलल्या नाहीत... पोहे छान झाले आहेत असे त्याचे बाबा म्हणाले...
मग विषय सुरु झाला मुलाचा... आजकालची मुलं माहीत आहेत.. आपलं काही ऐकत नाही आणि आपण त्यांना काही बोलू शकत नाही... मुलगी छान आहे.. दोघांची पसंती असेल तर आपण बघू ! मुलगा तसा माझ्या शब्दाबाहेर नाही ... मुलगा इजिनिअर आहे..नामांकित कंपनीत नोकरीला आहे... असं बरचं सांगितलं... बोलता बोलता... ते आमचे नातेवाईकच आहेत... आजीच्या नात्यातून असं स्पष्ट झालं... (च्यायला आता नातं निघालं म्हणजे माझी तर वाटच ) माझं लक्ष तर नव्हतचं... मुलगा नाही आला ना तेच बरं झालं... माझ्यासाठी ह्या काद्यापोह्याचा विषय इथेच संपणार होता ... आता आई आणि मावशी त्याच्या आईला घेऊन आत गेल्या ... हळदी कुंकुसाठी... तेव्हा बोलता बोलता त्या म्हणाल्या... मला महितच नव्ह्तं मुलगी बघायला जातोय... हे काही बोलले नाही.. मी येताना काही घेऊन तरी आले असते... हे ऐकल्यावर तर माझा राग अनावरच झाला होता... तेव्हा मी काहीच बोलले नाही ... त्यांनी मला माझे नाव विचारले... अर्चना सांगितले.. तर त्याचे नाव पण अर्चनाच आहे असं त्या म्हणाल्या... माझा थोडं कौतुक केलं आणि त्या निघाल्या... मावशी, काका, पप्पा त्यांना सोडायल गेले ... हुश्श्श... संपला एकदाचा कांदेपोहे कार्यक्रम... मला तर खूप भूक लागली होती... वहिनीने मला पोहे दिले मस्त आरामात सोफ्यावर खात बसले मी... तितक्यात वहिनीचा भाऊ म्हणाला मुलगा बघायचा का तुला ... एफ बी वर आहे तो... हो दाखव म्हणाले मी... तर मला म्हणाला तुला बरं त्याला बघायची घाई झाली... त्याला म्हणाले जा नको दाखवू... मग मुद्दाम मला चिडवायला लागला... मग दाखवला फोटो ... फोटो नाही आवडला ... मग पत्ता कट त्याचा ! असं बोलून मस्त मोबाईलवर गेम खेळण्यात परत बिझी झाले...
पहिले कांदे पोहे म्हणजे भारीच होते... त्याचे आईबाबा मला पाहून गेले आणि मी मुलगा पाहिला तो फेसबुकवर...असे माझे भारी फेसबुके कांदेपोहे...



Tuesday, April 23, 2013

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जाज्वल्य पत्रकारिता


विकिलिक्सच्या या आजच्या पत्रकारी विश्वात महाराष्ट्रातील काही पत्रकारांची प्रकर्षाने जाणीव होते. ज्यांनी निव्वळ आपल्या लेखणीने अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारतीय समाजाला हादरुन सोडले. यामध्ये सर्वात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
स्वातंत्र्यपूर्व भारतात अस्पृश्यता पराकोटीस पोहोचली होती. एक वेळ कुत्र्यांना जवळ केले जाई परंतु दलितांची सावली देखील सहन होत नसे. अशा या समाजाला नरकयातनामधून मुक्त करण्यासाठी १४ एप्रिल १८९१ रोजी रामजी सुभेदारांच्या घरी भीमाचा जन्म झाला. उपजत बुद्धिमत्ता, अपार मेहनत आणि वडिलांचा एखाद्या पहाडासारखा पाठींबा या त्रयीच्या जोरावर बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले. निव्वळ शिक्षणाच्या जोरावरच आपण आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवून देऊ शकतो असा त्यांना विश्वास होता.


शिक्षण संपवून भारतात परतल्यानंतर त्यांना स्वतःलादेखील जातीयतेचे चटके सहन करावे लागले. इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याची मानसिकता तयार होत होती परंतु आपल्याच काही देशवासियांना निव्वळ जातीच्या आधारावर नित्कृष्ट ठरवून जवळ केलं जात नाही हे बाबासाहेब पाहत होते. तत्कालिन वर्तमानपत्रे देखील याविषयी मूग गिळून बसली होती. काही वर्तमानपत्रे स्वातंत्र्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करत होती तर काही इंग्रजांना वश झाली होती. ही परिस्थिती पाहून आपल्या समाजबांधवांचे, दलितांचे दुःख जगासमोर मांडण्यासाठी १९२० साली त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. मूकनायकच्या शिरोभागी संत तुकारामांचा पुढील अभंग छापला जात असे.

काय करु आता धरुनिया भीड,
निःशंक हे तोंड वाजविले,
नव्हे कोणी मुकीयांचा जाण,
सार्थक लाजून नव्हे हित...!

या अभंगामधून त्यांची मूकनायक विषयीची भूमिका स्पष्ट होते. मूकनायक सुरु केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजेच १२ अंकानंतर मूकनायकाची सर्व सूत्रे सहकाऱ्यांवर सोपवून उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले. सहा वर्षांनी भारतात परतल्यानंतर बहिष्कृत भारत सुरु करण्यामागची भूमिका मांडताना ते म्हणतात, आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यात तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग याच्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.

दलित समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी बहिष्कृत समाजाचे नेतृत्व करण्याचे महतकार्य त्यांच्याकडे आले. खरेतर बहिष्कृत भारत हे त्यांना वृत्तपत्र करायचे नव्ह्ते तर चळवळीचे मुखपत्र बनवायचे होते. त्याप्रमाणे मनुस्मृतीचे दहन आणि चवदार तळ्याचा सत्याग्रह यांच्यासाठीच त्यांनी बहिष्कृत भारत निर्माण केले. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची तुलना त्यांनी १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या घटनेशी आपल्या अग्रलेखातून केली. आपण करत असलेली कृती किती ऐतिहासिक आहे, याची त्यांना पूरेपूर जाण होती. या घटनेनंतर बहिष्कृत भारताचा नायक अशी त्यांची प्रतिमा बनली. त्यामुळे निव्वळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील इंग्रजी व प्रादेशिक वृत्तपत्रांमधून बहिष्कृत भारताचा नायक काय म्हणतो, याची दखल घेतली जाऊ लागली. बाबासाहेबांमधला लढाऊ पत्रकार बहिष्कृत भारतमधून आपल्याला भेटतो. त्यांच्या लेखनामध्ये जोश, आवेश, थेट मुद्द्याला हात घालून वाचकांना खिळवून ठेवण्याचे कसब होतेच, परंतु वैचारिक तारतम्यदेखील होते. उदारमतवाद आणि सदनशीर मार्ग हा त्यांच्या विचारांचा आणि कृतीशिलतेचा गाभा होता. म्हणूनच बहिष्कृत भारताच्या दुसऱ्या वर्षापासूनच्या प्रत्येक अंकात लोकहितवादींची शतपत्रे पुनर्मुद्रीत केली गेली. स्वकीयांविरोधातला हा बाबासाहेबांचा लढा बहिष्कृत भारताच्या शिरोभागी असणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या पुढील ओवींमधून उदधृत होतो.

आता कोदंड घेऊनि हातीं
आरुढ पा इथे रथी,
देई अलिंगन वीरवृत्ती, समाधाने
जगी किर्ती रुढवीं,
स्वधर्माचा मानु वाढवी,
इया भारा पासोनि सोडवी,
मेदिने हे आता पार्था निःशंकु होई
या संग्रामा चित्त देई,
इथ हे वांचुनि कांही बोलो नये.     

अशा या समाज हितासाठी व राष्ट्रीयहितासाठी लढणाऱ्या लढाऊ पत्रकारास 
विनम्र अभिवादन !

Wednesday, April 17, 2013

रिलेशन विथ पब्लिक

रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक पर्यायांमध्ये आज तीव्र स्पर्धा आणि ‘नो व्हेकेन्सी’ आढळत असली तरी देखील एक नवं क्षेत्र तरुणाईला खुणावत आहे ते म्हणजे जनसंपर्क...

सरकारी खाजगी संस्था, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल एवढेच नव्हे तर वैयक्तिक पातळीवर आज सेलिब्रिटी आणि राजकीय नेते, विविध राजकिय पक्ष अशा साऱ्यांसाठी आज जनसंपर्क हा परवलीचा शब्द बनला आहे.संस्था, व्यक्तीची प्रतिमा जनमानसांत उजळ ठेवण्याचे काम जनसंपर्क अधिकाऱ्याला करावे लागते. त्याचबरोबर आपत्तीच्या काळात संस्था, व्यक्तीबाबत गैरसमज पसरु नयेत यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याला सतर्क रहावे लागते.

वृत्तपत्रे आणि इतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीं सातत्याने संपर्क ठेवून  संस्थेच्या कार्यक्रमाची माहिती, छायाचित्रे, इतर माहिती वेळोवेळी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य जनसंपर्काच्या कक्षेत येते. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फेसबुक,ट्विटर, लिंक्ड इन, ब्लॉग, वेबसाईट याद्वारे जनमत जाणुन घेणे, संस्थेच्या कामगारांसाठी अंतर्गत नियतकालिकांचे प्रकाशन करणे, पत्रकार परिषदांचे आयोजन करणे आणि संकटकाळात कंपनीच्या हिताच्या दृष्टिने नियोजनबद्ध उपाययोजना करणे यामध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याचा  सिंहाचा वाटा असतो.

बाजारातील इतर स्पर्धक कंपन्या, त्याची उत्पादने यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाला पुरविणे आणि कंपनिच्या प्रगतीसाठी वक्तृत्व, लेखन, सादरीकरण अशा तिन्ही पातळीवर पारंगत असणे हे जनसंपर्क अधिकाऱ्याचे कौशल्य असते.

जनसंपर्क विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या अनेक सरकारी, तसेच खाजगी संस्था आहेत. मुंबईतील काही संस्था -
मुंबई विद्यापीठ, संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग
अभ्यासक्रम : पदव्युत्तर अभ्यासक्रम( जनसंपर्क )
हेल्थ सेंटर बिल्डिंग, विद्यानगरी कॅम्पस, कलिना,
सांताक्रुझ , संपर्क - २६५२६०६८
कालावधी : २ वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
सेट झेव्हियर्स कॉलेज आणि सेंट झेव्हियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन
अभ्यासक्रम : पदव्युत्तर डिप्लोमा ( जनसंपर्क )
कालावधी : १ वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
संपर्क : २२६२१३६९
स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग ऍण्ड कम्युनिकेशन
अभ्यासक्रम : डिप्लोमा ( जनसंपर्क आणि जाहिरात )
कालावधी : २ वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
संपर्क : २६२५०६०८
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग
अभ्यासक्रम : डिप्लोमा ( जनसंपर्क आणि जाहिरात )
कालावधी : १ वर्षे
संपर्क : ६५०४६००१

याशिवाय, सोफिया पॉलिटेक्निक, पेडर रोड के.सी. कॉलेज, एन. एम कॉलेज, विलेपार्ले, वेलिंगकर इन्स्टिट्यूट, एसएनडीटी,जुहू या संस्थामधून जनसंपर्क विषयासाठीचे पदवी अभ्यासक्रम चालवले जातात.

सकारात्मक दृष्टिकोन ही जनसंपर्क क्षेत्रातील महत्वाची गुरुकिल्ली आहे. रोजची आव्हाने, सुसंवादातून सातत्याने संभाषण, निटनेटके व्यक्तिमत्व या भांडवलाच्या जोरावर तुम्ही आपले यशोमंदिर देशातच काय तर विदेशातही उभारु शकता.....

साभार - मनोज वराडे



  

Saturday, February 16, 2013

भेट ‘रत्नाकर मतकरी’ची...

पार्क- शिवाजींचा 
दर्जेदार लेखन कौशल्य असणारे साहित्यिक रत्नाकर मतकरी यांची ओळख तर सगळ्यांनाच ज्ञात आहे. नाटक, कथा, एकांकिका, बालनाट्य, ललित लेख, कादंबरी या साहित्यातून आपण त्यांना पाहिले आहे. इतकेच नाही तर ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक ,निर्माते आणि चित्रकार देखील आहेत. आज यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे काल त्यांची भेट झाली चक्क शिवाजी पार्कमध्ये  ...    

संध्याकाळचा वेळ पार्कात घालवणे हे काय नवीन नाही मला सध्या सवयच झाली आहे . राज साहेबांच्या बंगल्यासमोरचा कट्टा म्हणजे माझी नेहमीची जागा, तिथेच बाजूला बसणारा एक जेष्ठ नागरिकांचा नेहमीचा ग्रुप, ओळखीचा नव्हता पण चेहरे ओळख असावी इतकाच... बरेचदा बहुतेक कलाकार फेरफटका मारताना इथे दिसतात, कलाकारांना पाहणं हे अगदीच नॉर्मल होतं कारण मिडीया मधले असल्यामुळे त्यांचं आकर्षण असं काहीच उरलंच नव्हतं. राज साहेब, अतुल परचुरे, प्रिया बापट, सचित पाटिल आणि बरेच चेहरे जे आपण टिव्हीवर पाहतो ते पार्कात मी पाहिलेच होते.  पण एखाद्या साहित्यिकाला भेटणं कधी झालंच नाही. नेमका आज तो क्षण समोर होता. 

आज या नेहमीच्या ग्रुप मध्ये एक गृहस्थ आले होते बऱ्याच वेळ ते छान गप्पा मारत होते... ते त्यांच्या मित्रांना कविता ऎकवत होते... मी एकटीच होते त्यामुळे  शांतपणे ते सगळं ऐकत होते, अचानक मला रत्नाकर मतकरीची आठवण आली...कारण बाजूला असणारे जेष्ठ नागरिक हे रत्नाकर मतकरीच असल्याचा भास मला झाला... मी लगेच  नेट वर त्यांचा फोटो सर्च मारला... तर पक्का वाटला की हे म्हणजे तेच आहेत.. थोडा वेळ विचार करुन मी त्यांच्याशी बोलायचा निर्णय घेतला. जर हे तेच असतील तर ही संधी आहे त्यांना भेटण्याची त्यांच्याशी बोलण्याची... आणि हे जर ते नसतील तर काय? तर..एक अनुभव घ्यायचा फक्त ... विचार झाला पक्का आणि भिडले थेट त्यांना ... सर तुम्ही रत्नाकर मतकरीच आहात का? कारण तुमचा चेहरा त्यांच्यासारखाच आहे मी खरंच आता नेटवर सुद्धा पाहिलं.  ते जरा हसले आणि म्हणाले, बेटा मी रत्नाकर मतकरी नाही... ते तर खूप मोठे आहेत वयाने आणि विचाराने... मी दिसतो त्यांच्यासारखा पण मी नाही ...थोडंसं वाईट वाटलं मला पण एका नवीन व्यक्तीची ओळखही मला झाली होती ते गृहस्थ होते माझ्या सोमैया कॉलेजमधील मनाली लोंढे या प्रोफेसरचे सासरे... त्यांच्याशी गप्पा मारताना स्वतःमधील आत्मविश्वास अधिकच वाढल्याची जाणीव झाली होती. त्यांच्याशी गप्पा छान झाल्या मी नेहमीच येते का असं त्यांनी मला विचारलं पण मी नेहमीच नाही तर फक्त गुरुवारी किंवा शुक्रवारीच येते असं म्हणाले ... नक्कीच पुन्हा भेटू तुला मी माझ्या ग्रुपशी ओळख करुन देतो म्हणाले... असं म्हणून त्यांनी निरोप घेतला, ह्या भेटीमध्ये ग्रेट असे काही नव्हते पण तरी माझा शिवाजी पार्कातला एकांत संपलेला होता.. परत एकदा नवीन विचारांना मार्ग मिळाला होता...ही भेट रत्नाकर मतकरींशी नव्हती...पण त्यांच्या एखाद्या पुस्तकामध्ये शोभावी अशीच...आगळी वेगळी...                    

Tuesday, February 12, 2013

टर्निंग पॉंईट ऑफ लाईफ...


टर्निंग पॉंईट ऑफ लाईफ
टर्निंग पॉंईट हा प्रत्येकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. नोकरी, आई-बाबा, मित्र मैत्रिण सगळ्याबरोबर सुखात जगत असताना नेमकं आपण एका नवीन नात्यात गुंफतो. प्रेम, भावना, आपलं माणूस या सगळ्या कल्पणांना पंख मिळण्याचं हे वय ... आणि मग या पंखाना बळ येते ते म्हणजे तो’ किंवा ‘ती’ आयुष्यात आल्यावर. मग सुरु होतो आपल्या स्वतःच्या आयुष्याचा प्रवास ... आयुष्यात घेतलेले निर्णय हसवता हसवता कधी रडवू लागतात हे कळतच नाही. प्रत्येक वेळी भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बरोबर असतोच असे नसले तरी आपल्या सुखाचा आणि दुखांचा अंदाज घेता येत नाही हे मात्र खरं आहे.

प्रेमात पडण्याचं वय नसतं असं कितीही म्हटले तरी, प्रेमात पडून प्रेमाबद्दल सिरियस होण्याचं वय असतं हे तितकच खरं आहे. आपल्या आयुष्यातही असंच होतं. प्रत्येकजण आयुष्याच्या एका वळणावर येऊन लाईफ एनजॉय करताना खरं प्रेमाच्या शोधत तर असतातच, नशीबाने काहीना मिळते तर काहीना आपला शोध चालूच ठेवावा लागतो. आणि प्रेम काय असं शोधून नायं मिळत ना... अगदी मनापासून होत कधीतरी एकदाच... आजच्या काळात प्रेमप्रकरण असणं ही दुर्मीळ गोष्ट राहिलेली नाही. नवीन मित्र किंवा मैत्रिण झाली की प्रत्येकाचा पहिला एकच प्रश्न असतो..तुझा बीफ जीफ आहे का? काही जण प्रेमात पडतात, धडपडतात, पुन्हा माणसं जोडतात, नव्या नात्यात नव्याने जगतात. जुनी नाती तुटली असली तरी नवी नाती मनाने जपण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं आपल्या आजूबाजूला होत असतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम जडण्याआधी दुसर्‍या कुणावर तरी प्रेम जडलेलं होतं, ही भावना असुरक्षितता निर्माण करणारी असू शकते, पण भावनेला आपण नको इतकं महत्त्व देतो आणि आपलं असणारं प्रेम गमावतो.

आज ‘ती’ने तीच्या आयुष्यातील तो पण  असाच गमवला, त्याच्या  नात्यातली विश्वासहार्यता संपली म्हणून नातं संपलं... ती
 त्याच्याबरोबर प्रेमाचं नातं जगायला शिकली. प्रेमात पडणं आणि काहीतरी फिल करणं हे सगळं त्याच्यासोबतच अनुभवलं. तिला तिचं आयुष्य, सुख त्याच्याबरोबर राहण्यात मिळत होतं. प्रत्येक क्षणी त्याची सोबत असावी असंच वाटलं तिला, तिच्या हसण्याचं कारण फक्त तोच असावा... असं अगदी आनंदी आयुष्य जगत असताना नातं तुटते ते प्रेम आहे की नाही हे स्पष्ट करण्यावरुन, पण एकमेकांच्या भावना त्यांना कधीच समजल्या नाहीत, ज्या प्रेमाची सुरवात झाली होती ते प्रेम हरवलं ते त्यांच्यात होणाऱ्या रोजच्या भांडणामध्ये... तिच्याकडून झालेल्या चुका त्याने प्रेमाने माफ कराव्या आणि त्याने एखादी चूक केली की उगाच रागावून बसायचं असं मुद्दाम तिचा हट्ट. पण यावेळी ‘त्या’ची मोठी चूक होती म्हणून ‘ती’ खरचं रागवते पण ‘तो’ समजूत काढण्यासाठी कधीच परतला नाही... त्याला ‘ती’ समजून घेण्यास कमी पडली की ‘तो’च तिला समजू शकला नाही हा मला आजही पडलेला निरुत्तरीत प्रश्न. 

अशी प्रेमाबद्दलची उदाहरण आपल्याला नेहमीच आजूबाजूला दिसत असतात. पण ‘नात्यां’चा खरा अर्थ ज्यांना उलघडतो ते नक्कीच आपल्या नात्याचा अभिमान करुन ते टिकवण्याचा आणि ‘त्या’ नात्यातच जगण्याचा प्रयत्न करतात. 

आपल्याला एखादी व्यक्ती आवडते म्हणून आपण त्याच्या प्रेमात पडतो
, नातं निर्माण करतो. त्यामुळे नातं निर्माण झाल्यानंतर तो बदलला पाहिजे अशी अपेक्षा बाळगणं जरा अवास्तव आहे. त्यामुळे नातं, माणसांना बदलण्यासाठी निर्माण करायचं नसतं. नात्यातल्या स्नेहामुळे माणूस बदलला तर गोष्ट निराळी. आणि असं झालं तरच आपण त्याच्यासोबत सुखात राहु शकतो हेच खरं. असा टर्निंग पॉंईट प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच या पॉंईटला नकारात्मक न घेता सकारत्मक पद्धतीनं घेतलं की आयुष्य आजूनही सुंदर आणि चांगलं वाटू लागतं... आपण खऱ्या मनानं जपलेलं नातं जवळ नसलं तरी ते नातं आपण जगलोय आणि ते कायम आपलंच होतं आणि राहील असं समजून जगायचं... यापेक्षा मोठं सुख अजून काय असेल....  

Tuesday, January 29, 2013

माई ! एक भेट


माई
प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. पण प्रत्यक्षात उतरविणारे खूप कमी असतात. माझ्या बाबतीत मात्र जरा वेगळं घडत होतं. दोन वर्षांपूर्वी हजारो मुलांची आई असलेल्या त्या माऊलीला पाहिलं...ऐकलं...आणि मी माझ्या उराशी एक स्वप्न जपलं. माईनां भेटण्याचं... सिंधुताई सपकाळांना भेटण्याचं.
ते स्वप्न अवघ्या दोन वर्षात प्रत्यक्षात साकारलं, निव्वळ भेटायचंच नव्हे तर माईंना कार्यक्रमस्थळी घेऊन आणण्याची जबाबदारीच्या रुपाने... आमचा नवीन प्रोजेक्ट ‘द्रौपदी से दामिनी’ या संकल्पनेवर आधारित एका गाण्याचं प्रकाशन ‘माईं’च्या हस्ते आम्ही करणार होतो. आणि याच निमित्ताने आमची भेट झाली. माईंना भेटणार म्हणून आदल्यादिवशी तर मला झोपच लागली नाही. मी त्यांच्याशी काय बोलणार, त्यांचा स्वभाव कसा असेल, एवढा सगळा व्याप त्या कशा सांभाळत असतील. एखादी स्त्री एवढी दु:खे पचवून एवढी निश्चल कशी राहू शकते... असे एक ना अनेक  प्रश्न डोक्यात चालूच होते...प्रश्नांचा विचार करता करताच मला झोप लागली.
माई पुण्यावरुन येऊन ठाण्यातील एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. मी ठाण्यात राहणारी असल्यामुळे त्यांना घेऊन येण्याचं ‘मोठ्ठं’ असं काम माझ्यावर सोपवण्यात आलं... मी नाही जाणार त्यांना आणायला असं मी माझ्या सहकाऱ्यांना बजावलं होतं, परंतु एकीकडे त्यांच्यासोबत त्यांना जाणून घेता येईल या विचाराने सुखावले देखील होते.... दोन वर्षापूर्वी मी स्वतः पुण्याला एका इव्हेंटसाठी गेले होते तेव्हा माईंना मी दुरुनच पाहिलं होतं... यांच्यासोबत मला वेळ घालवायचा आहे, फोटो काढायचा आहे असं मी माझ्या एका मित्राला असंच गंमत म्हणून म्हणाले होते... पण आज माझ्याकडे ती संधी स्वतः आली होती.
माई आणि मी 
माईंचा मुलगा विनय याच्याशी मी सकाळी बोलले की, मी १०.३० पर्यंत येईन तुम्हांला न्यायला... मी पोहोचले तेव्हा हॉटेलमधील लोक देखील ‘माई’सोबत फोटो काढण्यास उत्सुक होती... त्यांचं फोटोसेशन चालूच होतं ... तितक्यात विनयभाऊनी माईनां सांगितले... माई, या मॅडम आपल्याला घेण्यासाठी आल्या आहेत... आपण निघूया...  माई मला म्हणाल्या चल बाळा... तु पुढे बस आणि रस्ता दाखव आपण कसं जायचं ते... अरे बापरे...आता मला स्वतःला रस्ता माहीत नव्ह्ता आणि आता मी कसा यांना रस्ता दाखवू पहिला प्रश्न माझ्या डोक्यात आल माईनां भेटल्यावर... माईची गाडी अस्तावस्त तर होती त्यात जसं काही त्याचं छोट ऑफिस असावं असंच मला वाटलं... वर्तमानपत्राचे बंडल, कार्यक्रम नोंदणीच्या वह्या, पाण्याच्या बॉटल्स अजून बरचं काही... मग माई मला म्हणाला.. पोरी तुझं नाव काय.. व्यवस्थित घेऊन जाशील ना आम्हाला... आम्ही एकतर गावाकडचे, आमच्या ड्रायव्हरला रस्ता नाही माहित, तुच सांग नीट... माईंचें बोलणं ऐकून तर माझ्या पोटात गोळा आला. पण ठाणे ते अंधेरी असा प्रवास मी बसने केला होता त्यामुळे मला बऱ्यापैकी माहीत होता. मी हो हो म्हणाले त्यांना... नंतर माई पुस्तक वाचण्यात दंग होत्या. मध्येच विनयभाऊ कार्यक्रमाविषयी त्याचा वेळ लोकांना देत होता.
माईंचें  बारावी परिक्षा संदर्भातले वक्तव्य काही वर्तमानपत्रातून आले होते. महाराष्ट्र टाईम्सची बातमी माईनां पाहायची होती. विनय ने मला विचारले इंटरनेट आहे का तुमच्याकडे... मी हो म्हणाले... पण माझं लक्ष होतं ते रस्त्याकडे... रस्ता चुकला तर वाट लागली असाच विचार डोक्यात चालू... तरी स्मार्ट फोन असल्यामुळे ई-पेपर शोधला पटकन, आणि माईला दाखवला. बातमीची हेडलाईन मी वाचून दाखवली.. माईंनी फोटो पाहिला...आणि फोटो छान आहे ना असं विनयला म्हणाल्या... अगदी आपण जसं गप्पा मारतो ना तसंच त्या बोलत होत्या... मजा मस्ती हसतं खेळतं वातावरण चालू होतं... माईंचा नवा फोन होता त्यांचं रिंगटोन कोणतं ठेवू माई असं विनय ने विचारलं... ठेवं की चागलं.. नाय तर गुर्र्गुर्र वाजतं नुस्त तसं ठेव... माई मला म्हणाल्या अगं आपण जातोय ना बरोबर की जातोय आपण मागल्याबाजूला..कल्याणला जायचा रस्ता दिसतोय हा ... मी घाबरले तर होतेच पण त्या हसत होत्या माझी खेचतायेत हे माझ्या लक्षात नाही आले पण नंतर सांगितले मी नीट चालोय आपण माई... पण मी पुढे मला माईचा ओरडा बसणारच आहे हे लक्षात आलं होतं. माईईई... मला माफ करा हा! मला पण रस्ता नाही कळत आहे.. पण मी तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाते हा काळजी करु नका. अगं मुंबई भुलभुलैया आहे रस्ता भटकलो की आपण भटकतच राहु... माई असं म्हणाल्या खऱ्या पण हे वाक्य मनाला भिडलं.. खरंच ही मुबई ना एक भुलभुलैया आहे कोण कसं असेल याचा अदांजच करता येत नाही.मी तर विचारातच होते पण तितक्यात विनय ने माईंला सांगितले की कोणीतरी त्याच्या ओळखीतले आहेत त्याचे वडील गेले.. तर माईंनी त्यांना दिलासा द्यायला लगेच फोन लावायल सांगितले.. फोनवर अगदी हळव्या मनाने माई समोरच्या व्यक्तीचे सात्वन करत होत्या, त्यांच्याशी बोलता बोलता माईंचे डोळेपण पाणावले होते. हसता हसता हळव्या झालेल्या माई पण मी पाहिल्या होत्या आज...
माईंची ही विविधांगी रुपे त्या प्रवासात मी अनुभवली. एक स्त्री हजारो जणांची माता कशी झाली हे उमगले. नऊवारीतल्या या माईचा उत्साह पाश्चिमात्य वस्त्रे धारण करणाऱ्या कोणत्याही स्त्रीला लाजवेल असाच होता. इंग्रजीचा गंध नाही. पायात साधी चप्पल. डोक्यापासून ते अगदी अंगठ्यापर्यंत अंगभर ल्यालेली नऊवारी साडी. पण आत्मविश्वास मात्र कोणाही कॉर्पोरेट मध्ये वावरणाऱ्या तरुणीसारखा. आवाजात तोच धारदारपणा. त्यांचं हे रुप पाहून मला आपल्या शहरी बायकांवर हसू आलं. चौथी सीट मिळाली नाही म्हणून भांडणारी, एखाद्या सिरीयल मधल्या नटीला तिचा नवरा सोडून गेला म्हणून हळहळणारी... चारजणी जमल्या कि एकमेकांच्या सासूंची उणीदुणी काढणारी... एखाद्या मुलीला कोणी छेडत असेल तर तिला मदत न करता उलट   तिच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडविणारी... किती चाकोरीबद्ध आयुष्य जगायला लागलोय आपण... आपल्याच हाताने आपलं स्रीत्व हरवून बसतोय की काय असं वाटू लागलंय... पण माईंना आज ऐकून...प्रत्यक्षात पाहून आणि वास्तवात अनुभवून कोणीतरी हे स्त्रीत्व जपतंय याची साक्ष पटली. माई आपल्या या स्त्रीत्वास माझा भावपूर्ण मुजरा...