महान कवी कालिदास यांनी आपल्या एका महाकाव्यात एक असे कवन रचले आहे की ज्यामध्ये प्रेमी आपल्या प्रेमिकेला ढगांमार्फत संदेश पाठवितो. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ ही म्हण का तयार झाली असावी याचा प्रत्यय या कवनातून येतो. मार्क झुकेरबर्ग याने कदाचित कालिदासांचे हे कवन वाचले असावे आणि या कवनामधूनच स्फूर्ती घेऊन त्याने फेसबुक निर्माण केले असावे.
ज्या तरुणाला फेसबुक माहित नाही तो तरुण आजच्या तरुणाईच्या दृष्टीकोनातून ‘गावंढळ’ ठरतो. पूर्वी पाहूणे घरी आले तर घरातला मुलगा वा मुलगी टी. व्ही बघते, असे दृश्य असायचे. पण सहस्त्रकानुसार तरुणाई पण बदलली. साधन बदलले. टी.व्ही ऐवजी आज मुलगा वा मुलगी फेसबुक वर असते. त्याला पाहुण्यांशी गप्पा मारायला वेळ नसतो पण त्याचवेळी कधीही न पाहिलेल्या, कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी तो मनमोकळेपणे ‘चॅट’ करत असतो.
चे गव्हेरा, फिडेल कॅस्ट्रोंना आदर्श मानणाऱ्या, गव्हेरा सारखी हेअर स्टाईल ठेवणाऱ्या, खिशात दमडी नसताना प्रेयसीला चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा करणाऱ्या पिढीची ही नेक्स्ट जनरेशन आहे. ही नेक्स्ट जनरेशन पण क्रांती घडवते, व्यवस्था बदलवून टाकते. पण येथेही साधन बदलले. रस्त्यावर उतरुन हातात दगड न घेता निव्वळ फेसबुक वरुन तो एकाचवेळी हजारो जणांना ‘मेसेज’ करतो आणि एका बलाढ्य राष्ट्रामध्ये सत्तांतर घडवितो. ४५ वर्षांहून अधिक काळ रखडलेलं एक विधेयक संमत होण्यासाठी तो सरकारवर दबाव आणतो.
आज एखाद्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवली जात नाही, तर त्या कार्यक्रमाचं रुपांतर ‘इव्हेंट’ मध्ये होऊन ज्याला निमंत्रण पाठवायचे असेल त्यास ‘टॅग’ केले जाते. पूर्वी आपलं मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचा एकतर सन्मान केला जात असे वा त्यास शिव्यांची लाखोली वाहिली जात असे. मते व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या मतास अनुकूलता दर्शविण्यासाठी त्या मतास ‘लाईक’ केले जाते वा ‘कमेंट’ दिली जाते.
फेसबुक हे विश्वच वेगळं आहे, फेसबुक वर एखाद्या मित्राशी तास न तास ‘चॅट’ केले जाते पण तोच जर समोर आला तर दहा मिनीटामध्ये संवाद संपतो. प्रेमात पडलेल्या जोडप्यांची समीकरणे देखील आज बदलली आहेत. जोडप्यामधलं एक ‘चॅट’ द्वारे इतरांशी भावनिक बंध जुळवू पाहतो. पण दुसरा मात्र फेसबुक मधून आपला खरा ‘फेस’ शोधत असतो. हे असं का घडावं? म्हणजे आपण तांत्रिकदृष्ट्या गब्बर झालो पण भावनिक दृष्ट्या दरिद्री होत चाललोय, त्याचं काय. तंत्रज्ञानाच्या मागे लागून आपण आपल्या जीवनाचं तंत्र हरवत चाललोय, वेळ काढून जरा आपल्या आयुष्याच्या हरवत असलेल्या क्षणांना ‘पोक’ करु या.
No comments:
Post a Comment