Tuesday, July 2, 2013

वकिलांच्या उ - ज्वल भविष्याचे उज्ज्वल निकम...



उज्ज्वल निकम पुरस्कार स्वीकारताना  
गेल्या रविवारी म्हणजे ५ मे २०१३ ला कल्याणला जाण्याचा योग आला... खरं निमित्त होतं  मिडियातील एका मित्राच्या वेबसाईटचं उदघाटन... पण कार्यक्रम होता कल्याण डोबिंवली महापालिकेतर्फे  सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या भव्य  नागरी सत्काराचा . महापौर वैजयंती गुर्जर- घोलप यांनी हा जाहिर सत्कार समारंभ आयोजित केला होता. 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट असो, खैरलांजी प्रकरण असो वा कसाबचा खटला असो या सगळ्या खटल्यांत आपल्या वाकचातुर्याने, प्रभावीपणे बाजू मांडण्याच्या  कार्यशैलीमुळे सर्व दोषीना शिक्षेपर्यत पोहचविल्याची उज्ज्वल निकम यांची  कामगिरी आपण सर्वांना परिचित आहेच. 
सदर कार्यक्रमाला कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजयंती गुर्जर-घोलप, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर, प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे, स्थायी समिती सभापती प्रकाश पेणकर, सभागृह नेते रवी पाटील, महिला बाल-कल्याण समिती सभापती वैशाली दरेकर-राणे आणि स्थानिक नगरसेविका उषा वाळंज आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते... या सगळ्यांना ऐकण्याची आणि भेटण्याची माझी पहिलीच वेळ... 

प्रचंड इच्छा होती ती उज्ज्वल निकम यांना ऐकण्याची.... तशी त्यांची आणि माझी भेट आधी ही झाली होती, मी आयबीएन लोकमत मध्ये असताना...एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उज्ज्वल निकम आले होते... एक पत्रकार म्हणून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती... परंतु तो कार्यक्रम संगीतावर आधारित असल्याने त्यांच्याशी त्याव्यतिरिक्त संवाद साधता आला नाही.  पण आज तो योग साधता येणार होता... मात्र आज माझी भूमिका वेगळी होती... निव्वळ एक पत्रकारच नव्हे तर एक उद्योजिका या नात्याने मी त्यांना भेटू शकणार होते.... उज्ज्वल सरांना ऐकण्याची त्यावेळची  अपुरी राहिलेली इच्छा आज पूर्ण होणार याचा आनंद होता. 

कसाबला फाशी झाली? कधी, कशी, कुठे... मग त्याला अटक झाल्यावर नक्की काय झाले त्याच्याबाबतचे अनेक प्रश्न जसे माझ्या मनात होते तसेच तिथे कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येकाच्या मनात असतील हे नक्कीच... जणू काही उज्ज्वल सरांनी भरभरुन बोलावे त्यांचे सगळे अनुभव आम्हाला सांगावे असेच सगळ्यांनाच वाटत होते... महापौर वैजयंती गुर्जर- घोलप तर उज्ज्वल सरांना म्हणाल्या देखील,  आज तुम्हाला हवा तितका वेळ घ्या... आम्हा सगळ्यांना तुमचं बोलणं, तुमचे अनुभव ऐकायचे आहेत... आणि सुरुवात झाली मंतरलेल्या क्षणांना...उज्ज्वल सरांच्या व्याख्यानाला...

पुरस्कार स्विकारताना पण तो विचार करुनच आपण स्विकारतो... भविष्यात ज्याच्याकडून आपण पुरस्कार स्विकारला त्यांनाच उद्या कोर्टात  भेटायला नको... असा षटकार मारताच संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले...
लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलांना खूपच डाउन मार्केट... असं म्हणत त्यांनी त्यांना सगळ्य़ात पहीली केलेली कवीता सांगितली बायकोला अनुसरुन केली होती. बराच वेळ बोलून त्यांनी रजा घेतली. त्यांचे अनुभव आम्हाला बरंच काही शिकवून गेले... हा नवा अनुभव आमच्या गाठीशी आल्याने समाधान मिळाले.