Tuesday, April 23, 2013

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जाज्वल्य पत्रकारिता


विकिलिक्सच्या या आजच्या पत्रकारी विश्वात महाराष्ट्रातील काही पत्रकारांची प्रकर्षाने जाणीव होते. ज्यांनी निव्वळ आपल्या लेखणीने अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारतीय समाजाला हादरुन सोडले. यामध्ये सर्वात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
स्वातंत्र्यपूर्व भारतात अस्पृश्यता पराकोटीस पोहोचली होती. एक वेळ कुत्र्यांना जवळ केले जाई परंतु दलितांची सावली देखील सहन होत नसे. अशा या समाजाला नरकयातनामधून मुक्त करण्यासाठी १४ एप्रिल १८९१ रोजी रामजी सुभेदारांच्या घरी भीमाचा जन्म झाला. उपजत बुद्धिमत्ता, अपार मेहनत आणि वडिलांचा एखाद्या पहाडासारखा पाठींबा या त्रयीच्या जोरावर बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले. निव्वळ शिक्षणाच्या जोरावरच आपण आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवून देऊ शकतो असा त्यांना विश्वास होता.


शिक्षण संपवून भारतात परतल्यानंतर त्यांना स्वतःलादेखील जातीयतेचे चटके सहन करावे लागले. इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याची मानसिकता तयार होत होती परंतु आपल्याच काही देशवासियांना निव्वळ जातीच्या आधारावर नित्कृष्ट ठरवून जवळ केलं जात नाही हे बाबासाहेब पाहत होते. तत्कालिन वर्तमानपत्रे देखील याविषयी मूग गिळून बसली होती. काही वर्तमानपत्रे स्वातंत्र्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करत होती तर काही इंग्रजांना वश झाली होती. ही परिस्थिती पाहून आपल्या समाजबांधवांचे, दलितांचे दुःख जगासमोर मांडण्यासाठी १९२० साली त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. मूकनायकच्या शिरोभागी संत तुकारामांचा पुढील अभंग छापला जात असे.

काय करु आता धरुनिया भीड,
निःशंक हे तोंड वाजविले,
नव्हे कोणी मुकीयांचा जाण,
सार्थक लाजून नव्हे हित...!

या अभंगामधून त्यांची मूकनायक विषयीची भूमिका स्पष्ट होते. मूकनायक सुरु केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजेच १२ अंकानंतर मूकनायकाची सर्व सूत्रे सहकाऱ्यांवर सोपवून उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले. सहा वर्षांनी भारतात परतल्यानंतर बहिष्कृत भारत सुरु करण्यामागची भूमिका मांडताना ते म्हणतात, आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यात तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग याच्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.

दलित समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी बहिष्कृत समाजाचे नेतृत्व करण्याचे महतकार्य त्यांच्याकडे आले. खरेतर बहिष्कृत भारत हे त्यांना वृत्तपत्र करायचे नव्ह्ते तर चळवळीचे मुखपत्र बनवायचे होते. त्याप्रमाणे मनुस्मृतीचे दहन आणि चवदार तळ्याचा सत्याग्रह यांच्यासाठीच त्यांनी बहिष्कृत भारत निर्माण केले. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची तुलना त्यांनी १७८९ च्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या घटनेशी आपल्या अग्रलेखातून केली. आपण करत असलेली कृती किती ऐतिहासिक आहे, याची त्यांना पूरेपूर जाण होती. या घटनेनंतर बहिष्कृत भारताचा नायक अशी त्यांची प्रतिमा बनली. त्यामुळे निव्वळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील इंग्रजी व प्रादेशिक वृत्तपत्रांमधून बहिष्कृत भारताचा नायक काय म्हणतो, याची दखल घेतली जाऊ लागली. बाबासाहेबांमधला लढाऊ पत्रकार बहिष्कृत भारतमधून आपल्याला भेटतो. त्यांच्या लेखनामध्ये जोश, आवेश, थेट मुद्द्याला हात घालून वाचकांना खिळवून ठेवण्याचे कसब होतेच, परंतु वैचारिक तारतम्यदेखील होते. उदारमतवाद आणि सदनशीर मार्ग हा त्यांच्या विचारांचा आणि कृतीशिलतेचा गाभा होता. म्हणूनच बहिष्कृत भारताच्या दुसऱ्या वर्षापासूनच्या प्रत्येक अंकात लोकहितवादींची शतपत्रे पुनर्मुद्रीत केली गेली. स्वकीयांविरोधातला हा बाबासाहेबांचा लढा बहिष्कृत भारताच्या शिरोभागी असणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या पुढील ओवींमधून उदधृत होतो.

आता कोदंड घेऊनि हातीं
आरुढ पा इथे रथी,
देई अलिंगन वीरवृत्ती, समाधाने
जगी किर्ती रुढवीं,
स्वधर्माचा मानु वाढवी,
इया भारा पासोनि सोडवी,
मेदिने हे आता पार्था निःशंकु होई
या संग्रामा चित्त देई,
इथ हे वांचुनि कांही बोलो नये.     

अशा या समाज हितासाठी व राष्ट्रीयहितासाठी लढणाऱ्या लढाऊ पत्रकारास 
विनम्र अभिवादन !

Wednesday, April 17, 2013

रिलेशन विथ पब्लिक

रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक पर्यायांमध्ये आज तीव्र स्पर्धा आणि ‘नो व्हेकेन्सी’ आढळत असली तरी देखील एक नवं क्षेत्र तरुणाईला खुणावत आहे ते म्हणजे जनसंपर्क...

सरकारी खाजगी संस्था, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल एवढेच नव्हे तर वैयक्तिक पातळीवर आज सेलिब्रिटी आणि राजकीय नेते, विविध राजकिय पक्ष अशा साऱ्यांसाठी आज जनसंपर्क हा परवलीचा शब्द बनला आहे.संस्था, व्यक्तीची प्रतिमा जनमानसांत उजळ ठेवण्याचे काम जनसंपर्क अधिकाऱ्याला करावे लागते. त्याचबरोबर आपत्तीच्या काळात संस्था, व्यक्तीबाबत गैरसमज पसरु नयेत यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याला सतर्क रहावे लागते.

वृत्तपत्रे आणि इतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीं सातत्याने संपर्क ठेवून  संस्थेच्या कार्यक्रमाची माहिती, छायाचित्रे, इतर माहिती वेळोवेळी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य जनसंपर्काच्या कक्षेत येते. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फेसबुक,ट्विटर, लिंक्ड इन, ब्लॉग, वेबसाईट याद्वारे जनमत जाणुन घेणे, संस्थेच्या कामगारांसाठी अंतर्गत नियतकालिकांचे प्रकाशन करणे, पत्रकार परिषदांचे आयोजन करणे आणि संकटकाळात कंपनीच्या हिताच्या दृष्टिने नियोजनबद्ध उपाययोजना करणे यामध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याचा  सिंहाचा वाटा असतो.

बाजारातील इतर स्पर्धक कंपन्या, त्याची उत्पादने यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाला पुरविणे आणि कंपनिच्या प्रगतीसाठी वक्तृत्व, लेखन, सादरीकरण अशा तिन्ही पातळीवर पारंगत असणे हे जनसंपर्क अधिकाऱ्याचे कौशल्य असते.

जनसंपर्क विषयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या अनेक सरकारी, तसेच खाजगी संस्था आहेत. मुंबईतील काही संस्था -
मुंबई विद्यापीठ, संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग
अभ्यासक्रम : पदव्युत्तर अभ्यासक्रम( जनसंपर्क )
हेल्थ सेंटर बिल्डिंग, विद्यानगरी कॅम्पस, कलिना,
सांताक्रुझ , संपर्क - २६५२६०६८
कालावधी : २ वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
सेट झेव्हियर्स कॉलेज आणि सेंट झेव्हियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन
अभ्यासक्रम : पदव्युत्तर डिप्लोमा ( जनसंपर्क )
कालावधी : १ वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
संपर्क : २२६२१३६९
स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग ऍण्ड कम्युनिकेशन
अभ्यासक्रम : डिप्लोमा ( जनसंपर्क आणि जाहिरात )
कालावधी : २ वर्षे
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
संपर्क : २६२५०६०८
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग
अभ्यासक्रम : डिप्लोमा ( जनसंपर्क आणि जाहिरात )
कालावधी : १ वर्षे
संपर्क : ६५०४६००१

याशिवाय, सोफिया पॉलिटेक्निक, पेडर रोड के.सी. कॉलेज, एन. एम कॉलेज, विलेपार्ले, वेलिंगकर इन्स्टिट्यूट, एसएनडीटी,जुहू या संस्थामधून जनसंपर्क विषयासाठीचे पदवी अभ्यासक्रम चालवले जातात.

सकारात्मक दृष्टिकोन ही जनसंपर्क क्षेत्रातील महत्वाची गुरुकिल्ली आहे. रोजची आव्हाने, सुसंवादातून सातत्याने संभाषण, निटनेटके व्यक्तिमत्व या भांडवलाच्या जोरावर तुम्ही आपले यशोमंदिर देशातच काय तर विदेशातही उभारु शकता.....

साभार - मनोज वराडे