विकिलिक्सच्या या
आजच्या पत्रकारी विश्वात महाराष्ट्रातील काही पत्रकारांची प्रकर्षाने जाणीव होते.
ज्यांनी निव्वळ आपल्या लेखणीने अवघा महाराष्ट्रच नव्हे तर भारतीय समाजाला हादरुन
सोडले. यामध्ये सर्वात अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल ते म्हणजे भीमराव रामजी
आंबेडकर अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
स्वातंत्र्यपूर्व
भारतात अस्पृश्यता पराकोटीस पोहोचली होती. एक वेळ कुत्र्यांना जवळ केले जाई परंतु
दलितांची सावली देखील सहन होत नसे. अशा या समाजाला नरकयातनामधून मुक्त करण्यासाठी
१४ एप्रिल १८९१ रोजी रामजी सुभेदारांच्या घरी भीमाचा जन्म झाला. उपजत बुद्धिमत्ता,
अपार मेहनत आणि वडिलांचा एखाद्या पहाडासारखा पाठींबा या त्रयीच्या जोरावर
बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले. निव्वळ शिक्षणाच्या जोरावरच आपण आपल्या
समाजबांधवांना न्याय मिळवून देऊ शकतो असा त्यांना विश्वास होता.
शिक्षण संपवून
भारतात परतल्यानंतर त्यांना स्वतःलादेखील जातीयतेचे चटके सहन करावे लागले.
इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याची मानसिकता तयार होत होती परंतु आपल्याच काही
देशवासियांना निव्वळ जातीच्या आधारावर नित्कृष्ट ठरवून जवळ केलं जात नाही हे
बाबासाहेब पाहत होते. तत्कालिन वर्तमानपत्रे देखील याविषयी मूग गिळून बसली होती.
काही वर्तमानपत्रे स्वातंत्र्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करत होती तर काही
इंग्रजांना वश झाली होती. ही परिस्थिती पाहून आपल्या समाजबांधवांचे, दलितांचे दुःख
जगासमोर मांडण्यासाठी १९२० साली त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरु केले.
मूकनायकच्या शिरोभागी संत तुकारामांचा पुढील अभंग छापला जात असे.
काय करु आता धरुनिया भीड,
निःशंक हे तोंड वाजविले,
नव्हे कोणी मुकीयांचा जाण,
सार्थक लाजून नव्हे हित...!
या अभंगामधून त्यांची मूकनायक विषयीची भूमिका स्पष्ट होते.
मूकनायक सुरु केल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजेच १२ अंकानंतर मूकनायकाची
सर्व सूत्रे सहकाऱ्यांवर सोपवून उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले. सहा वर्षांनी
भारतात परतल्यानंतर बहिष्कृत भारत सुरु करण्यामागची भूमिका मांडताना ते म्हणतात,
आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यात तसेच
त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग याच्या स्वरुपाची चर्चा होण्यास
वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.
दलित समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी बहिष्कृत समाजाचे
नेतृत्व करण्याचे महतकार्य त्यांच्याकडे आले. खरेतर बहिष्कृत भारत हे त्यांना
वृत्तपत्र करायचे नव्ह्ते तर चळवळीचे मुखपत्र बनवायचे होते. त्याप्रमाणे
मनुस्मृतीचे दहन आणि चवदार तळ्याचा सत्याग्रह यांच्यासाठीच त्यांनी बहिष्कृत भारत
निर्माण केले. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची तुलना त्यांनी १७८९ च्या फ्रेंच
राज्यक्रांतीच्या घटनेशी आपल्या अग्रलेखातून केली. आपण करत असलेली कृती किती ऐतिहासिक
आहे, याची त्यांना पूरेपूर जाण होती. या घटनेनंतर बहिष्कृत भारताचा नायक अशी
त्यांची प्रतिमा बनली. त्यामुळे निव्वळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर
देखील इंग्रजी व प्रादेशिक वृत्तपत्रांमधून बहिष्कृत भारताचा नायक काय म्हणतो,
याची दखल घेतली जाऊ लागली. बाबासाहेबांमधला लढाऊ पत्रकार बहिष्कृत भारतमधून
आपल्याला भेटतो. त्यांच्या लेखनामध्ये जोश, आवेश, थेट मुद्द्याला हात घालून
वाचकांना खिळवून ठेवण्याचे कसब होतेच, परंतु वैचारिक तारतम्यदेखील होते. उदारमतवाद
आणि सदनशीर मार्ग हा त्यांच्या विचारांचा आणि कृतीशिलतेचा गाभा होता. म्हणूनच
बहिष्कृत भारताच्या दुसऱ्या वर्षापासूनच्या प्रत्येक अंकात लोकहितवादींची शतपत्रे
पुनर्मुद्रीत केली गेली. स्वकीयांविरोधातला हा बाबासाहेबांचा लढा बहिष्कृत
भारताच्या शिरोभागी असणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या पुढील ओवींमधून उदधृत होतो.
आता कोदंड घेऊनि हातीं
आरुढ पा इथे रथी,
देई अलिंगन वीरवृत्ती, समाधाने
जगी किर्ती रुढवीं,
स्वधर्माचा मानु वाढवी,
इया भारा पासोनि सोडवी,
मेदिने हे आता पार्था निःशंकु होई
या संग्रामा चित्त देई,
इथ हे वांचुनि कांही बोलो नये.
विनम्र अभिवादन !