Tuesday, July 5, 2011

‘उत्तरायण’


आपल्या आयुष्यात नव्यानेच नाती जुळतात तर काही जुनीच नाती आपण नव्याने पुन्हा जगू लागतो. असंच काहीस जुनं नातं नव्याने जगणारे जोडपे मला भेटले. आजकाल मला शनिवारी ऑफिस सुटल्यावर एखाद्या शांत आणि रम्य ठिकाणी जाण्याची सवय लागली आहे...माझ्या ऑफिसपासून काही अंतरावर आहे दादर चौपाटी ...दररोज नाही पण आठवड्यातून एकदातरी आपण रिलॅक्स होण्यासाठी जावं असं प्रत्येकाला वाटते....आपल्या सोबतीला कोणी नाही म्हणून आपण असं एकटं फिरणं खरंतर टाळतो....पण एकट्यानं असा अनुभव प्रत्येकानं घ्यावा....दादर चौपाटीलगतच एक ज्ञानेश्वर पार्क आहे....अप्रतिम पार्क आहे हा, इकडे येणारा अगदी लहानापासून ते म्हाताऱ्यापर्यत सगळेच काही ना काही विचारात, गप्पा करण्यात, मस्ती करण्यात गुतंलेला असतो. त्या दिवशीच अशाच वातावरणात मी एकटी होते,आजुबाजुच्या सगळ्या हालचाली मी पण न्याहाळत होते...समोरच एक मुलांचा ग्रुप होता...त्यांच्या बोलण्यावरुन कळाले नुकतेच दहावी पास होऊन कॉलेजला जाण्याची तयारीत आहेत...मस्त गप्पा टप्पा मस्ती करण्यात दंग असलेला हा घोळका मला माझ्या फ़्रेंन्ड्ची आठवण करुन गेला...या पार्क मध्ये येणारा प्रत्येक हा वेगवेगळ्या वयोगटातला आहे...फक्त प्रेमीयुगुलंच गार्डनचा पुरेपुर वापर करतात असे अजिबात जाणवत नाही....दोन मैत्रिणी..किंवा दोन मित्र अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर बोलतायेत...आजी आजोबा शांत बसले आहेत असं चित्र नेहमीचंच.... या पार्क मध्ये माझी नेहमीची जागा तिथे बसून अथांग समुद्र पाहता येतो... अशा वातावरणात स्वतःला रमवताना अचानक एक दृश्य पाहायला मला मिळाले ते म्हणजे...आजकालच्या तरुण पिढीलाही लाजवणारे असं...एका व्हिलचेयर वर बसलेली एक सुंदर अशी अगदी उतारवयात आलेली स्त्री आणि तिच्या सोबत तिचा सोबती....दोघांनी समुद्र कडे तोंड केले होते...या वयात पण ते नवीन स्वप्न रंगवण्यात दंग होते....माझं मन हे त्यांनाच पाहण्यात गुंतले होते....त्यांचे काही फोटो काढण्याचा पण मी प्रयत्न केला पण हवे तसे काही जमले नाही...त्यांच्याकडे लक्ष देण्याचा विचार पण केला पण फार कुतुहल वाटत होते मला त्यांचे...मग त्यांचाशी बोलण्यासाठी मी त्यांना नमस्कार केला आणि माझी ओळख सांगितली...तसे लांबून पाहताना वाटणारे ते रागीट आजोबा मनाने फारच हळवे निघाले ...आजीचे नाव सुमती तर आजोबाचे नाव विश्वास...मला त्याच्याशी बोलताना खूप मस्त अनुभव आला...माझ्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ होती की एका अनोख्या लोकांशी जाऊन बोलण्याची... ते दोघेही अगदी भारावून गेले होते...बोलता बोलता आजोबा मला सांगून गेले की सुमतीला कॅन्सर आहे... दोन मिनीटासाठी अगदी मी स्तब्धच झाले होते. पण आजीच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देणारे होते....त्या एकटक समुद्राकडे पाहत होत्या...नंतर आमच्यात गप्पा रंगत आल्यावर आजोबा म्हणाले आम्ही रोज इथे येतो... इथे वेळ घालवायला सुमतीला फार आवडते...आणि त्याचं कारणही तसंच आहे ...आमचं लव्ह मॅरेज आहे, मी इकडेच दादर चौपाटीवर प्रपोझ मारला होता... त्या दिवसापासून हिची ही सगळ्या आवडती जागा आहे... इकडेच बसून आमच्या आयुष्याची सुरवात आम्ही केली... स्वप्नवत जग जगायला शिकलो... आणि आज म्हातारपणी देखील आहे ते आयुष्य जगतोय जुन्या आठवणी सोबत....हे सगळे ऐकताना आजीचे डोळे पाणावले होते...पण त्या काही बोलू शकत नव्हत्या...आजीने आजोबाचा हात घट्ट हातात धरला आणि एक स्मितहास्य केले... आता मला कळत नव्हते, आजी काय म्हणतेय... पण आजोबा लगेच म्हणाले...अगं ती म्हणतेय खरंच जुने दिवस खूपच मस्त होते. आपण अजूनही तसेच आहोत... आणि तेच दिवस आपण पुन्हा या वयात जगतोय... खरंतर त्यांचे बोलणे ऐकून मला फारच ऑकवर्ड वाटत होते... ते दोघे आता रोमॅन्टिक मूड मध्ये आले होते... हळूहळू दोघेही जून्या आठवणीत गुंतले... ."चला आजोबा निघते, आजी येते मी...जमल्यास पुन्हा भेटु असं म्हणत त्यांच्या नकळत मी त्यांचा निरोप घेतला...
सूर्यनारायणाच्या साक्षीने त्या दोघांच्या नात्याचे जणू काही ‘उत्तरायण’ सुरु झाले...